सीएम जाए पर बच्चन न जाए!

Amitabh Satakar साहित्य संमेलनाच्या मांडवातून आताच परतलो आहे. पहिल्यांदा चांगली वार्ता. संमेलनाच्या मांडवात प्रचंड म्हणावी अशी गर्दी पुस्तकांच्या दालनात होती. एकीकडे अमिताभ बच्चनचा कार्यक्रम चालू असतानाही दृष्ट लागाव्या अशा उत्साहाने लोकं पुस्तकांची चळत पाहत, न्याहाळत, हाताळत होते. माझ्यासारख्या काकदृष्टी माणसाला हा एक कल्चर शॉक होता. लोकांनी किती पुस्तके विकत घेतली, कोणत्या प्रकारची विकत घेतली हा वेगळा मुद्दा आहे. मात्र मुद्रीत माध्यमं हळूहळू कालबाह्य होत असल्याची समजूत करून घेतलेल्या मला, एवढ्या मोठ्या संख्येने पुस्तके पाहण्यासाठी का होईना, येताहेत ही एक धक्कादायक गोष्ट आहे.

बरं, हे नुसतेच पुस्तकांचे दालन नव्हते. पुण्यात पुस्तक प्रदर्शन ही फार मोठी कौतुकाची गोष्ट नाही. मात्र विस्तार, प्रतिनिधीत्व आणि पुस्तकांची संख्या-प्रकार यादृष्टीनेही हे दालन अन्य प्रदर्शनांपेक्षा वेगळे होते. मला खरोखरच आवडले ते.  अगदी राज्य शासनाच्या स्टॉलवरील कन्नड साहित्य परिचय या पुस्तकानेही मला भूरळ घातली होती. मात्र अशा प्रकारची पुस्तके नेटवर सर्रास मिळत असल्याने मी तो मोह टाळला. बाहेर आलो तोवर पडद्यावरचा अभिनयसम्राट खरोखर महाराष्ट्र माझा मी महाराष्ट्राचा हा हुकुमी मंत्र आळवून समोरच्यांवर भुरळ पाडण्यात यशस्वी झाला होता.

अलीबाबाच्या गोष्टीत एक शीळा उघडण्यासाठी पासवर्ड होता. तसाच महाराष्ट्रात हे वरील चार शब्द बोलले की  टाळ्यांचा खजिना हमखास. बाहेर वाटेल ते पुरस्कार स्वीकारून महाराष्ट्रात मात्र स्वतःच्या मनाप्रमाणे मंत्र्यांना नाचविणाऱ्या म्हाताऱ्या नट्याही हे चारच (त्यापेक्षा जास्त बोलले की पैसे कट!) शब्द बोलून अनेकांना डोलवायला लागतात. “68 वर्षांपैकी 38 वर्षे मी महाराष्ट्रात राहिलो,” हे बच्चन यांचे बोल चॅनेलवर ओथंबून गळायला सुरवात झाली आहे. उद्या वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावर त्याचे ओरखडे दिसू लागतील. चार दशकांत महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात शून्य योगदान देणाऱ्या व्यक्तींकडून मराठीचा गौरव ऐकून अंगावर रोमांच उठावेत, इतकी का अमृतात भेसळ झाली आहे? बच्चन महाशयांनी विंदा, ज्ञानेश्वर, एकनाथ अशा अनेकांचा उल्लेख केला. सुरेश भटांच्या ओळी म्हटल्या. कौशल इनामदारांचा सत्कार केला. आयुष्यभर मेकअपमनचं काम केलेल्या कामगाराकडे, कारकीर्दीत मुख्य भूमिका मिळेनाशा झाल्यावर बच्चन महाशयांनी मराठी चित्रपट केला. वरच्या भाषणातील संत-कवींची माहिती लिहून देणाऱ्यास ते पुढेमागे एखादी जाहिरात फुकट करून देतील, अशी अपेक्षा करूया.

जानेवारी फेब्रुवारी 2008 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बच्चन यांच्यावर शरसंधान केले नसते, तर त्यांना ही सगळी महती कळाली असती का? मनसेच्या आंदोलनावेळीस कॉंग्रेसप्रणीत माध्यम व लुडबुडी मंडळी छोरा गंगा किनारेवालाच्या बाजूने होती. त्यामुळेच विनाकारण, संबंध नसताना बच्चन यांना साहित्य संमेलनाची निमंत्रणे गेली. खासदार सुरेश कलमाडी, आमदार उल्हास पवार आणि नगरसेवक सतीश देसाई ही संमेलनाच्या आयोजकांतील कारभारी माणसे पाहिली की हा डाव लक्षात येतो. आयोजकांच्या दुर्दैवाने संमेलनाच्या वेळेपर्यंत सर्वच भूमिकांची अदलाबदल झाली. नायक बच्चन कॉंग्रेससाठी खलनायक झाले. त्यामुळे चव्हाण बिचारे ‘बच्चन के रहना रे बाब’ करत फिरत होते.

अशोक चव्हाण यांची लाचारी आपण एका बाजूस ठेऊया. (त्यांनी जशी लोकलज्जा ठेवली आहे तशी.)  मात्र वांद्रेच्या कार्यक्रमात त्यांनी आडमार्गे उपस्थित केलेला मुद्दा काय चुकीचा होता? सी-लिंकच्या कार्यक्रमात अमिताभला मानाने बोलवावे अशी कोणती मर्दुमकी त्यांनी गाजविली आहे? त्या पुलासाठी त्यांनी काही रक्कम दिली आहे का? संमेलनाहून परतताना बच्चन यांची गाडी जाईपर्यंत गेटवर चेंगराचेंगरी व्हायची बाकी राहिली होती. अनेक वृद्ध लोकांची (व त्यांची संख्या पुण्यात काही कमी नाही) जी काय गत झाली, त्यातून कुठली साहित्यसेवा आयोजकांनी केली. अमिताभला पाहण्यासाठी आलेल्या रसिकांची गुणवत्ता एका उदाहरणात दिसून येते. आपण अग्निपथ ही कविता वाचणार म्हटल्यावर प्रेक्षकांना बच्चन आता ‘अग्निपथ’मधील संवाद म्हणणार असेच वाटले. काय आरोळ्या उठल्या. पुढच्या दोन मिनिटांत मंडपात शांतता! मग आयत्या घरात घरोबा अशी त्यांना वागणूक कशासाठी. चित्रपट अभिनेत्यांनी, त्यातही बॉलिवूडच्या लाडावलेल्या दिवट्यांनी असे काय केले आहे, की समाजाच्या प्रत्येक घडामोडीत त्यांच्या उपस्थितीची आम्हाला गरज भासते आहे. धन्य ते प्रेक्षक, धन्य ते आयोजक आणि धन्य धन्य ते साहित्यसेवक!

काम करा, गाणी ऐका पण बोलू नका

KARUNANIDHIमहाराष्ट्रातील मराठी नेत्यांना, म्हणजे मराठी भाषेसाठी आग्रह धरा असं सांगणाऱ्या नेते अडचणीत आले किंवा त्यांचे युक्तिवाद खुंटले, की दक्षिणी राज्यांचे उदाहरण देण्याची त्यांची रीत आहे. दक्षिण भारतात  खासकरून तमिळनाडूत पाहा, कसा हिंदीला विरोध होतो, हे ते वारंवार सांगत असतात. मात्र हिंदीला विरोध करतानाच, हिंदी भाषकांना जी वागणूक दक्षिणेतील नेते किंवा एकूणच समाज देतो, ते अधूनमधून समोर येतं. का कोणास ठाऊक, आपल्याकडे या गोष्टींची चर्चा होत नाही.

आता करूणानिधींचंच घ्या ना. हिंदी आणि हिंदू विरोधावर कारकीर्द उभी करणाऱ्या करुणानिधींनी परवा हिंदी भाषक कामगारांना चेन्नईत जी जागा दाखवून दिली, ती अगदी दाद देण्यासारखीच होती. तमिळनाडू विधानसभेच्या नव्या इमारतीचे बांधकाम झाल्याबद्दल 15 मार्चला दहा हजार कामगारांना तमिळनाडू सरकारच्या खर्चाने जेवण देण्यात आले. मेजवानीच म्हणा ना. या कामगारांमध्ये बहुतांशी उत्तर भारतीय होते. त्यामुळेच या समारंभात हिंदी गाणीही लावण्यात आली होती. “हिंदू”चे संपादक एन. राम यांनी करुणानिधींना याबद्दल छेडले, तेव्हा एकाक्ष (व चाणाक्ष) कलैञर (करुणानिधींची तमिळ उपाधी) उत्तरले, की सगळ्या भाषकांनी मिळून मिसळून बोलले पाहिजे. त्यानंतरचं जे वाक्य ते बोलले ते अधिक महत्वाचे होते.

“या कामगारांना खाऊ द्या, हिंदी गाणी ऐकू द्या. पण तमिळनाडूत हिंदी बोलण्याची गरज नाही,” असॆ करुणानिधींनी जाहीर भाषणात  सांगितलं. (लिंक तमिळ भाषेतील दिली आहे मात्र त्याला इलाज नाही. दिनकरन या सन समुहाच्या पर्यायाने करुणानिधींच्याच वर्तमानपत्रात आलेलं हे जशास तसे भाषण आहे. हीच बातमी वेगळ्या स्वरूपात हिंदूत आली आहे. ) हिंदी वाहिन्या किंवा अन्य माध्यमांनी याकडे लक्ष न देणं समजता येईल. मात्र आपल्याकडच्या राजकीय पक्षांनी किंवा माध्यमांचेही इकडे लक्ष गेलं नाही. “बिहार, ओरिसा यांसारख्या राज्यांतील लोकांनी ही इमारत उभी केली आहे. त्याबद्दल त्यांना आनंद झाल्यामुळे ते नाच-गाणे करत आहेत,” असं कलैञरांचं म्हणणं आहे.

त्यांची वाक्यं पाहा आणि ते किंवा तत्सम कुठे ऐकले आहेत का, जरा आठवून पाहा. करुणानिधींच्याच शब्दांतः एखादी भाषा सगळ्या भारतभर बोलली जाऊन त्यातून एका राज्याचा दुसऱ्या राज्याशी संपर्क होणे, यावर आमचा काही आक्षेप नाही. मात्र एखादी भाषा मोठी आणि अन्य भाषा दुय्यम ही भूमिका आम्हाला मान्य नाही. दुसऱ्या राज्यातून आलेले तुम्ही, आता मनाप्रमाणे आपल्या भाषेतील गाणी ऐकली. त्याचप्रमाणे तमिळ गाणी लागली तेव्हा त्याला आक्षेप घेतला नाही. असं एकमेकांशी एकोप्याने न वागता, एखाद्याने दुसऱ्याला वरचढ असल्याचे दाखवणे, याला आमचा विरोध आहे. (आणखी एकः हिंदी कामगारांसमोर भाषण मात्र तमिळमध्येच केलं कलैञरांनी! )

आपल्याकडे राज ठाकरे किंवा बाळासाहेब ठाकरे काय सांगतात? मात्र त्यांच्याविरूद्ध काय गहजब झाला असता. करुणानिधींच्या भाषणाच्या दुसऱ्या दिवशी कॉंग्रेसचे युवराज राहुल गांधी तिथेच होते. मात्र बिहारी लोकांच्या या  अपमानाचे वारे त्यांच्या कानावरूनही गेले नाही. अजापुत्रं बलीं दद्यात्, दुसरं काय?