‘कॉलगंधर्व’ फोलपटराव

Blog post by devidas deshpande

आपल्या गजकर्णमधुर आणि शू-श्राव्य मोबाईल साधनांसह आपल्याशी गप्पा मारण्यासाठी, म्हणजेच आपल्या कानाचे पडदे किती रिश्टर स्केलचा धक्का पचवू शकतात याची पडताळणी करण्यासाठी आज आपल्यासोबत प्रवास करत आहेत ‘कॉलगंधर्व’ फोलपटराव . जरा कान इकडे करा पाहू. शिवाय बॅटरी सोडून वागणारे आपापले हँडसेट खिशातच ठेवा पाहू. आज ते आपल्याला काही अनमोल मार्गदर्शन करणार आहे.

आम्हीः फोलपटराव, अहो फोलपटराव. हा, आता तुमचं इकडं लक्ष इकडे गेलंच आहे तर आम्ही काही प्रश्न विचारावे का

फोलपटरावः मी नाही म्हण्लं तरी तुमी काय ना काय विचारणारच. तर विचारा काय तुम्हाला वाटत असंल तर. फक्त माझ्या वाजणाऱ्या मोबाईलबद्दल काही बोलू नका.

आम्हीः नाही म्हणजे कर्णाला जशी कवच कुंडले, तशी तुमच्या कर्णाला ही मोबाईलचे कवचच की. तर त्याबद्दलच बोलायचं होतं.

फोलपटरावः त्याचं असं आहे बगा, का दहा-वीस वर्षांपूर्वी माराष्ट्रात कर्णा नावाचा एक प्रकार होता. काही लोक त्याला लावूड स्पीकर म्हणायचं. त्याचाच अवतार आहे हा मोबाईल. म्हणजे जुना वाल्वचा रेडिओ जाऊन ट्रांझिस्टर, आन ट्रांझिस्टर जाऊन आता एफेम आला ना तसं. हे एफेम बाकी ऑटोतच जास्त ऐकू येतं. मग त्याला रेडिओ का म्हण्तात, रोडियो का नाही, हा आमचा म्हण्जे माझा प्रस्न आहे. (फोलपटरावांच्या तोंडात लालसर चोथा फिरताना दिसतो. भर गर्दीत शहर वाहतुकीची बस हेलकावे खाते आहे, तशी त्यांची लालसर जीभ त्या चोथ्यातून दंत्य आणि तालव्याचे आघाडी सरकार चालविण्याचा प्रयत्न करते.)

आम्हीः आमचा कर्ण प्राचीन काळातला होता. असो. अर्थ कळाला नाही तरी तुमच्या कानापर्यंत आमचे शब्दं पोचतात, याचा आम्हाला आनंद आहे. पण मंत्र्यांचं भाषण आकड्यांनी थबथबलेलं असतं, टीव्हीवरील मालिका नेहमी संकटग्रस्त असतात तसं तुमचे मोबाईल नेहमी आवाज का करतात. संगीताचा तुम्हाला असा रेल्वे किंवा बसमध्ये उमाळा का येतो?

फोलपटरावः अहो, संगीताचं काय म्हणता. ती आहेच भारी…

आपला नेम परत चुकला आहे. शब्द फोलपटरावांपर्यंत जातायत पण त्यांचा अर्थ पोचत नाही, असं वाटतंय. त्यामुळे आपण परत त्यांना तोच प्रश्न विचारूया. ते परत उत्तर देतायत…

फोलपटरावः त्याचं काय आहे, खरी कला लोकांमधेच फुलते. आपण जे ऐकतो, ते आणखी लोकांनी ऐकावं, त्यांनाही आनंद व्हावा, यासाठी असं पब्लिकमधे गाणं लावावंच लागतं. आता पब्लिकमधे लावल्यावर त्यांना नाराज का करावं, म्हणून ते दणक्यात लावावं लागतं. आनंद वाटल्याने वाढतो ना…

प्रश्नः हो, पण तुम्हाला जो आनंद वाटेल तो इतरांना वाटेलच असं नाही..

फोलपटरावः असं कसं बोलता तुम्ही. आनंद वाटून घेण्यावर वाढतो. आमच्यासारखे आनंदमार्गी जेवढे आहेत, त्यांच्या मोबाईलवर सार्वजनिक वाजणारी गाणी बघा एकदा. अगदी गिनी-चुनी गाणी दिसतील, म्हण्जे ऐकू येतील. याचा अर्थ बहुतके लोकांना ती आवडतात. आता थोड्या काही लोकांना नाही आवडत. ते गेले उडत. सोपं आहे. काय आहे साहेब, तुम्हा लोकांना पब्लिकमधे कसं राहावं ते कळत नाही. आता बगा, मागे ते वॉकमन नावाचं एक डबडं होतं. ते कुणी वापरत तरी होतं का. तुम्हाला वाटतं त्याची किंमत खूप होती म्हणून. तसं नाही. त्याचा आवाज होत नव्हता, त्यामुळे उठाव नव्हता त्याला. या माबोईलवर बगा आमची सोय झाली. परवा तर आमच्या गावठाणात भजनी मंडळाला नेहमीची लोकं आली मी. फक्त आमचं तात्या आणि त्यांचे दोन साथीदार. मी त्यांना दिला हँडसेट आणि लावली त्याच्यावर भजनं. त्यांना सांगितलं तुम्ही फक्त साथ द्या. आदल्या दिवशी गायब झालेली मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन विचारू लागली, का काल फारच जोरदार भजन झालं. आले तरी किती लोकं?

पुढचा प्रश्न विचारण्याआधीच मोबाईलराव उर्फ फोलपटरावांच्या हातातील खेळण्याला कंठ फुटतो. ‘बेकरार प्यार है आजा,’ असं कुठली तरी महिला आळवू लागते आहे. ती रडारड ऐकून थोड्या वेळाने आतडी तुटायला लागतात. आळवणे आणि आवळणे या क्रियापदांमध्ये इतका निकटचा संबंध का, हे आता आजूबाजूच्या लोकांना लक्षात येऊ लागतं आहे. या बयेनं आणखी अंत पाहण्यापूर्वीच शांतता प्रस्थापित करण्याचा एक प्रयत्न म्हणून पुढचा प्रश्न फोलपटरावांना विचारूया.

प्रश्नः असं चार लोकांमध्ये वाजवायचंच असंल तर एखादं प्रसन्न गाणं टाळावं, याची दीक्षा तुम्हाला कोण देतं?

फोलपटरावः त्याचं म्हणजे आम्ही बाळकडूच पिलेलो असतो म्हणा ना. अशी खुशीची गाणी आम्ही ठेवितच नाही ह्यांडसेटमधे. नकोच ती किटकिट. एकदा ह्यांडसेटमधेच ठेवली नाही तर वाजणार कशी? कार्डातच नाही तर स्पीकरात कशी येणार? काय? पब्लिकमध्ये असलो का अगदी दुःखी, रडकी गाणी वाजवायची. परवा असाच पीएमटीत जाताना मी वाजवत होतो. शिवाजीनगरला उतरताना एक जवान जवळ आला. मला काय म्हण्ला, का आजवर मी म्हण्जे तो नास्तिक होता. पण स्वारगेटपासून मी जी गाणी लावली त्यामुळे त्याने देवाचा धावा केला अन् त्यामुळं त्याच्या पदरी नामस्मरणाचं पुण्य पदरात पडलं. आता साधी गाणी लावली तर हे पुण्य मिळंल का सांगा?

वास्तविक आता प्रश्न खुंटायला आले आहेत. तरीही गप्प राहिल्यास परत कोणाचा तरी प्रेमभंग चव्हाट्यावर येऊन त्याच्या आत्महत्येची दवंडी पिटल्या जाईल, म्हणून आपण चर्चा चालू ठेऊया.

प्रश्नः मोबाईलवरून संगीतप्रसाराची तुमची ही तळमळ पाहून खरं तर भातखंडे आणि पलुसकर बुवांनीही हात टेकले असते व कानाची पाळी धरली असती. (जराशी वरच्या बाजूला!) तरीही आहे त्या यंत्रात तुम्हाला आणखी काय सोयी हव्या आहेत?

फोलपटरावः नाही, आहे हे मशीन मस्त आहे. पण आमचं या कंपन्यांना एकच सांगणं आहे का हॅडसेटसोबत हे कानात घालायचं कशाला देता…उगीच खर्च वाढतो. त्यापेक्षा विदाऊट हे (म्हणजे इअरफोन!)द्या तेव्हा हँडसेट आणखी स्वस्त होतील. पुन्हा मोबाईल विकतानाच त्यात अशी गाणी घालायला सांगितलं पाहिजे. म्हण्जे आमच्यासारख्या लोकांचे कष्ट वाचतील…

फोलपटराव त्यांच्या मागण्या मांडत असतानाच आपला स्टॉप आलेला आहे. त्यामुळे त्यांना त्यांच्या असुरांबोसत मोकळे सोडून आपण त्यांच्या निरोप घेऊया. नमस्ते.

फोलपटराव ट्विटरकर

छायाचित्र सौजन्य: clker.com

फोलपटराव यांचा वास्तविक व्यवसाय पत्रकारितेचा. बातम्या देणे आणि बाता मारणे, यांत त्यांचा हातखंडा. परंतु आताशा त्यांचा जास्त वेळ ट्विटरवर जात आहे. ट्विटरवर कोण काय म्हणत आहे आणि त्यामुळे कोणावर काय परिणाम होतात, याची खबरबात घेता घेता त्यांची दमछाक होत आहे. सकाळी अभिषेक बच्चनने काय ट्वीट केलं, दुपारी ऐश्वर्याने काय म्हटलं, संध्याकाळी मोदी काय म्हणाले याच्यावर त्यांना सारखं लक्ष ठेवावं लागतं. त्यात दुसरं कोणी नवीन माणूस येऊन बातम्यांमध्ये चमकू लागलं, की यांचे वांधे होतात. त्यांचे हे काम ते कशा शिताफीने आणि किती अडचणींना तोंड देऊन करतात, हे जाणून घेऊया त्यांच्याचकडून!

प्रश्नः फोलपटराव, आपण ट्विटरवर किती दिवसांपासून वावरत आहात?
उत्तरः तसे फार दिवस झाले नाहीत. काही महिन्यांपूर्वी आमच्या प्रतिस्पर्धी वाहिनीने एक बातमी केली होती ट्विटरवर एका नटीने केलेल्या खरडलेल्या कसल्याशा दोन ओळींवर त्या वाहिनीने सहा तास किल्ला लढविला. मी सकाळी बाहेर गेलो, एका राजकीय पक्षाची सभा होती असाईनमेंटसाठी. ती आटोपून परत आलो तरी यांचं तेच दळण चालू होतं. मी मनात हिशेब केला, की हे बरं आहे. आम्ही ऊन्हा-ताणात हिंडायचं आणि लोकांच्या बातम्या करायच्या. त्यापेक्षा संगणकापुढे बसायचं आणि काही मोजक्या लोकांच्या बातम्या करणं केव्हाही सोपं. मग मीही ट्विटरवर एक खातं काढलं. जेव्हढ्या म्हणून नट-नट्या, संगीतकार, खेळाडू, राजकीय नेते (हे अगदीच हाताच्या बोटावर मोजण्याइतके) आणि नामी पत्रकार सापडले, त्यांच्या मागे लागलो (म्हणजे फॉलोइंग सुरू केलं हो!).

प्रश्न: मग आता तुमचं काम खूपच सोपं झालं असेल ना?
उत्तर : नाही हो. पूर्वी म्हणजे कार्यक्रम किंवा पत्रकार परिषद करायची असायची, तर आम्हाला नेमकी जागा माहित असायची. आता हे ट्विटरवर वावरायचं म्हणजे, किती लोकांवर लक्ष ठेवायचं, काय काय पाहायचं याची यादी करायची म्हटली तरी दमछाक होते. नुसतं चित्रपट कलावंत घेतले, तरी अख्खा दिवस पुरत नाही. अन् सगळेच काही कामाचं ट्विट करत नाहीत. त्यामुळे कधी कधी कंटाळा येतो. यात आणखी एक अडचण आहे. या ट्विटरवर फ़क्त १४० अक्षरांत सगळं म्हणणं उरकावं लागतं. आता मला सांगा, ज्या दिवशी कुठल्याही महामार्गावर अपघात होत नाही, मध्यमवर्गीय किंवा श्रीमंत किंवा परदेशी महिलेवर बलात्कार झालेला नसतो, एकही नेता मनोरंजन करण्य़ाच्या मूडमध्ये नसेल त्यावेळी एकेका दिवसाची खिंड आम्हाला या १४० शब्दांवर लढवावी लागते. सुदैवाने आमच्यापैकी कोणी अजून धारातिर्थी पडले नाही.

प्रश्न: मग तुमच्या या बातमीदारीला लोकांचा कसा प्रतिसाद आहे?
उत्तर: भरपूर. लोकांना खूप आवडतं ट्विटर आणि फ़ेसबुकच्या बातम्या. परवा, मुंबईच्या ज्या भागात जोरदार पाऊस झाला, लोकांच्या घरात पाणी शिरलं. तशाही अवस्थेत एक नवी नटी ट्विटर वापरू लागली आहे, ही आमची बातमी लोकांनी पाण्यात बसून पाहिली. परवा तर गंमतच झाली. ’रावण का झोपला,’ याबाबत ट्विटरच्या वापरकर्त्यांची एक चर्चा चालू असल्याची बातमी आम्ही ’चालू’विली. त्यावर एका प्रेक्षकाने आम्हाला एसएमएस केला: ’अरे, रावण कसा झोपेल? झोपणारा तो कुंभकर्ण!’ अशा अनेक गंमती आमचे प्रेक्षक व वाचक करतात. कारण ट्विटरवरून दिलेल्या बातम्या त्यांना स्वतःशी निगडीत वाटतात. लोकांच्या भावभावनांशी त्या जोडलेल्या आहेत.

प्रश्न: परंतु अशा बातम्यांना कितपत भवितव्य आहे, असं तुम्हाला वाटतं?
भवितव्य म्हणजे, आता यातच भवितव्य आहे. आज मोदींनी लोकांच्या उखाळ्यापाखाळ्या इथे काढल्या. उद्या नेतेगण ट्विटरवरून सांगतील, ’मी आयपीएलच्या दरम्यान, कोट्यवधी रुपये कसे पचविले, शिक्षण संस्थांच्या नावे कसे पैसे लाटले….’ इ. मग त्यावेळी शोध पत्रकारिता म्हणजे, अशा एकावर एक कडी रहस्य बाहेर काढणारे अकाऊंट शोधणारी पत्रकारिता असा अर्थ होईल. त्यामुळे आम्हा ट्विटरकरांना काही काळजी नाही.

फोलपटरावांचा लोकलप्रवास

डीडीच्या दुनियेत फोलपटराव त्या दिवशी अंमळ खुशीतच होते. त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. त्यांनी घराबाहेर पाय ठेवला तेव्हाच त्यांना माहित होतं, की सरकारने आपले खरे कर्तव्य गांभीर्याने मनावर घेतले आहे. त्यामुळे शहराच्या रस्त्यारस्त्यावर चोख बंदोबस्त असून, एक नागरिक या नात्याने आज आपल्या केसालाही धक्का लागणार नाही. सकाळी घरातून जसे निघालो तसेच वन पीस घरी परतणार आहोत. कुठे बाँबस्फोट होणार नाही का कुठे दंगल होणार नाही. रस्त्यावर फारसे पोलिस नसतीलच आणि जे असतील त्यांची जरब गुन्हेगारांवर असणार आहे. आपल्या पाकिटातील ऐवज कोणी चोरू नये म्हणून वाटा घेण्यासाठीच पोलिस उभे आहेत, असे लोकांनाही वाटणार नाही.

अशा रितीने गगनात मावत नसलेल्या आनंदाचा हवाई प्रवास थांबवून फोलपटरावांनी रेल्वे स्टेशनवर पाय ठेवला. त्यावेळी स्टेशनवर अगदी सगळं कसं शिस्तीत चाललं होतं. ऑटोरिक्षा वाट चुकल्यासारख्या रस्त्यात थांबल्या नव्हत्या, का मुसंडी मारणाऱ्या डुकरासारख्या टॅक्सी आवारात ठाण मांडून बसल्या नव्हत्या. आपले सांस्कृतिक संचित मांडून बसलेले भिकारी नव्हते, का उंदरावर झेप घेण्यासाठी सज्ज असलेल्या मांजरांसारखे ट्रॅव्हल एजंट उभे नव्हते. मुख्य म्हणजे फोलपटराव स्टेशनमध्ये शिरत असताना वाट कशी सगळी मोकळी होती. तिकीट काउंटरवर गटार तुंबल्यासारखी लोकांची रांग नव्हती का नाल्यात अडकलेल्या प्लॅस्टिकच्या थैल्यांसारखी कोणाची धक्काबुक्कीही नव्हती.

त्याच वेळेस फोलपटरावांना आपण घरातून फारसे पैसे न घेताच हवाई प्रवास केल्याचं लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब एका टॅक्सीवाल्याला हात करून एटीएमचा रस्ता धरला. जवळचं भाडं असूनही टॅक्सीवाल्याने किंचितही कुरकुर न करता फोलपटरावांना अदबीने ‘चला, साहेब’ असं म्हटलं. माता-भगिनींचा उद्धार न करता टॅक्सीवाल्यानं त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधल्याने फोलपटरावांना अगदी गदगदून आलं. त्यांना जवळपास हुंदकाच आला होता, पण त्यांनी तो खूप प्रयासाने आवरला. इतके दिवस मराठीत बोलण्याची उबळ त्यांनी जशी आवरली होती, तसाच त्यांनी हा हुंदकाही आवरला. एटीएममध्येही रांग नसल्याने त्यांनी लगेच पैसे काढले.

परत येऊन बघितले, तर तेव्हाही तिकीटबारीवर सामसूम होती. आज रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप आहे का, अशी शंकाही त्यांच्या मनाला चाटून गेली. मात्र आज आम आदमींचे राजे फोलपटरावच येणार म्हटल्यावर संपावर गेलेले कर्मचारीही खास कामावर रूजू झाले असते, हे त्यांना माहितच होतं. त्यामुळे त्यांनी काउंटरवर जाऊन शंभराची नोट सरकवली. पलिक़डच्या मराठी माणसाने (होय, तो मराठी होता आणि चक्क सुहास्य वदनाने उभा होता.) फोलपटरावांची नोट घेऊन त्यांना मुकाट्याने चिल्लर परत केले. त्याने त्याच्या नेहमीच्या शैलीत आयमायचा न काढता असे वर्तन करण्याचे कारण फोलपटरावांना माहित होते, ते म्हणजे त्यांच्यावर आयचा वरदहस्त होता.

कोणत्याही प्रकारची वाट न पाहता फोलपटरावांना सहज गाडी मिळाली. आता त्यांना कुठेही ऑफिसमध्ये जायचे नव्हते, दिसल त्या गाडीत त्यांना बसायचे होते त्यामुळे गाडीसाठी खोळंबा होण्याचा त्यांचा प्रश्नच नव्हता. वारूळात येरझारा घालणाऱ्या मुंग्यासारखे लोकं गाडीच्या डब्याला चिकटले नव्हते. त्यामुळे अगदी सावकाश आणि तब्येतीने फोलपटरावांनी डब्यात प्रवेश केला. कोणताही सव्यापसव्य त्यांना करावा लागला नाही का झटापटींमुळे त्यांना इजा झाली नाही. डब्यात असलेल्या इनमीन दहा पंधरा लोकांनी अगदी दोन्ही हात पसारून फोलपटारावांचे स्वागत केले. त्यातलं कोणीही गुजराती किंवा हिंदी बोलत नव्हतं. सगळे अगदी शुद्ध मराठी बोलत होते. त्यातल्या एकाने लगेच सरकून फोलपटरावांना खिडकीशी जागा करून दिली. पुढल्या दोन ते तीन मिनिटांत लोकलच्या खडखडाटासोबतच फोलपटराव आणि त्यांच्या सहप्रवाशांच्या गुजगोष्टी सुरू झाल्या. त्यातल्या काहिंनी तर फोलपटरावांना, “तुमच्यासारखे सामान्य लोक प्रवास करतात त्यामुळे या लोकलची शान आहे,” असंही सांगितलं. त्यामुळे फोलपटरावांना उगीचच अंगावर मुठभर मांस चढल्यासारखे झाले.

साधारण अर्धा तास प्रवास केल्यानंतर फोलपटरावांना त्या सुखावह प्रवासाचा कंटाळा आला. त्यांचा ‘एक उनाड दिवस’ पुरा झाला होता. एक चांगल्यापैकी स्टेशन बघून त्यांनी सहप्रवाशांचा निरोप घेतला आणि ते डब्यातून खाली उतरले. तिथे मात्र त्यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या धक्याला सामोरे जायचे होते. तिथे काही मंडळी कसलेतरी झेंडे घेऊन उभी होती. तो सगळा जमाव फोलपटरावांच्या दिशेने धावत आला आणि त्यांच्या गळ्यात एक जाडजूड हार घातला. सामान्य मध्यमवर्गीय असल्याने फोलपटरावांना हा सगळा प्रकार नवा होता.

भांबावलेल्या स्वरातच त्यांनी विचारले, “हे काय आहे?”

जमलेल्या मंडळींनी एका स्वरात उत्तर दिले, “आणखी एक दिवस कोणताही अपघात किंवा घातपात न होता लोकलचा सुरक्षित प्रवास केल्याबद्दल आम्ही तुमचा सत्कार करत आहोत.”

फोलपटराव भावनादुखीग्रस्त

image

नमस्कार मित्रहो, ज्यांच्या दुखावलेल्या भावनांची वेदना सगळ्या महाराष्ट्रात आज ठसठसत आहे अशा कार्यकर्त्यांना आपण भेटणार आहोत. या कार्यकर्त्यांचे नाव महत्त्वाचे नाही, कारण काही वर्षांनी ते सगळ्यांना एक नेते म्हणून परिचित होणार आहेत. समाजाच्या संवेदनशीलतेचा वातकुक्कुट म्हणून त्यांची आता ख्याती पसरत आहे. त्यांच्याच तोंडून त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

प्रश्नः कार्यकर्ते साहेब, आम्हाला एक सांगा, तुमच्या भावना दुखावण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचे निमित्त लागते

कार्यकर्तेः आमच्या भावना या लाईटबल्बमधील तारेसारख्या असतात. त्या नाही का विजेच्या थोड्याशा चढउतारानेही विरघळतात. आमच्याही भावनांनाही थोड्याशा हालचालीने लगेच धक्का पोचतो. एखादा शब्द, वाक्य, लेख, कथा, कादंबरी, चित्रपट, व्हिडिओ…इतकंच काय कोणी काही बोललं नाही तरी आमच्या भावना दुखावतात. आमच्या शहरातील एका प्रसिद्ध गल्लीचे नाव चुकीच्या पद्धतीने छापले म्हणून आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. दोन महिने तो मुद्दा आम्ही लावून धरला आणि एका वर्तमानपत्राला माफी मागायला लावली.

सहा महिन्यांपूर्वी सगळ्या पेपरनी आमच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून आम्हाला राग आला. आता गेला महिनाभर एक अक्षरही छापून आलं नाही. मग आमचा तिळपापड होणार नाही तर काय? सध्या महाराष्ट्रात थंडी जास्त पडली असल्यामुळे भावना दुखावल्या आहेत की काय, याची वैद्यकीय तपासणी चालू आहे. त्या तपासणीचा अहवाल आल्यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही थंडीमुळे दुखावलेल्या भावनांवर उपचार करण्याचा विचार करू.

प्रश्नः आम्हाला उत्सुकता आहे ते हे जाणून घ्यायची, की आपल्या भावना दुखावल्या आहेत हे नक्की कसं कळतं

कार्यकर्तेः त्याला नक्की असं ठोस उत्तर देता येणार नाही. खरं सांगायचं म्हणजे ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल, असं काहीही वाचण्याची तसदी आम्ही घेत नाही. एवढं कशाला, आम्हाला अनुकूल असलेलं काही वाचण्याचेही काम आम्ही करत नाही. आमचे इतर माहितगार लोक असतात. त्यांच्या डोळ्यांखालून बरंच काही जात असतं. त्यातलं काही डोक्यात गेलं, की आम्हाला संकेत मिळतात. असे हात शिवशिवू लागले, की आता वेळ आल्याचे आम्हाला कळते. हा, काही बाबतींत मात्र आम्ही अगदी ‘जाती’ने लक्ष घालतो. त्याला इलाज नाही. बऱ्याचदा काय होतं, की इतरांची जास्त विचारपूस होऊ लागली की आम्हालाही मैदानात उतरावं लागतं. एकुणात सांगायचं म्हणजे त्याचं खास असं लक्षण नाही.

गेल्या आठवड्यातीलच गोष्ट. आमच्या एका ज्येष्ठ सदस्यांच्या कुत्र्याला कोणीतरी ‘हाड हाड’ म्हटल्याने आमच्या संघटनेत तीव्र नाराजी पसरली. आता ते कुत्रं तर काय आम्हाला तोंडाने सांगू शकत नव्हतं. त्यामुळे दोन दिवस आम्हाला ती घटना कळालीच नाही. दोन दिवसांनी एका पोराने आम्हाला ती घटना सांगितली. त्या दिवशी आम्ही ‘बोळ रोको’ करून त्या घटनेचा निषेध केला. अशा काही आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी आम्हाला उशिराने लक्षात येतात. त्याच्यावर आम्ही उशिराने आवाज उठवतो.

प्रश्नः तुमचा हा नाराजीचा ताप चढायची लक्षणे नसतील तर मग उतरण्याची तरी काय लक्षणे आहेत?

कार्यकर्तेः आमचं म्हणजे बघा वाळूसारखं आहे. गरम जितक्या चटकन होते तितकंच शांतही होतं. समजा काही वावगं झालं, की फटकन आम्ही निषेध नोंदवतो. त्यासाठी फार विचार करण्याची गरज नसते. तसंच आमच्या दुखावलेल्या भावनांवर मलमसुद्धा मुबलक मिळतो. चार पेपरनी बातम्या लावल्या, एखाद्याने फोटो छापला, कोणा चॅनलने बाईट घेतला की जे काय वाईट वाटलं असेल ते आम्ही रद्दबातल करतो. इतकं सोपं आहे ते. त्यात सरकारने दखल घेऊन आम्हाला बोलावले, तर दुखावलेल्या भावनांना अत्यानंदाचा मुलामा चढतो.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आमच्याकडे एका शाळेने सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सक्ती केली. आता पालिकेच्या शाळेने अशी सक्ती करणं बरं आहे का, तुम्हीच सांगा. मग आम्हीही घेऊन गेलो एक ‘शिष्ट’मंडळ त्या शाळेवर. तुम्हाला सांगतो, त्याला एवढी प्रसिद्धी दिली सगळ्यांनी. नंतर महापौरांनीही सांगितलं, असं नाही करता येणार. लगेच पंधरा दिवसांनी आम्ही आमच्या मंडळातर्फे महापौरांचा सत्कार केला.

आमची काही दुश्मनी नाही हो कोणाशी. फक्त समाजाच्या भल्यासाठी आम्हाला करावं लागतं हे सगळं.

फोलपटरावांच्या मुलाखती

फोलपटराव राजकारणी भाग 2

प्रश्नः सध्याच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात
फोलपटरावः याबाबत मी अजून काही ठरविले नाही. ठरवू या. कसे आहे, काही झाले तरी आम्ही निवडणुकीच्या वेळेस प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच असतो. प्रॉब्लेम निवडणुकीनंतर येतो. आम्ही मुंबईत अडकून अडतो आणि कार्यकर्त्यांना वाटते, की साहेब आपल्याकडे लक्षच देत नाही. आता लोकं आम्हाला लक्षानुलक्ष देत असताना गावाकडे कसे जाणार?

प्रश्नः नाही, आम्ही पक्षाच्या बाजूने या अर्थाने विचारतोय.
फोलपटरावः तसे नाही. आता एवढे पक्ष बदलल्यानंतर मला कुठल्या पक्षाचे कौतुक वाटणार. आताच नवीन निघालेल्या एका तिसऱ्या अडगळीतील चौथ्या आघाडीत मी सामिल झालो. त्याची एक वेगळीच गंमत आहे. त्यांच्या नेत्याने मला विचारले, “फोलपटराव, या पक्षात किती दिवस राहणार” मी उत्तर दिले,”पक्ष पंधरवडा” (परत तेच हासणे.)त्यामुळे सध्यातरी कुंपणावर बसायचे आणि निवडणुकीनंतर शेत खायचे, म्हणजे कोणाला पाठिंबा द्यायचे ते ठरविणार असा विचार आहे.

प्रश्नः या निवडणुकीसाठी तुमचा काही अजेंडा, धोरण आहे का?
फोलपटरावः आमच्यासारखे जे ग्रासरुटचे कार्यकर्ते असतेत, त्यांच्याकडे धोरण नसतं. असतो तो बेत. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने निवडणुका जिंकायच्या, कोणता घोडा विनच्या जवळ आहे तो निवडायचा आणि त्याच्या नावाने तिकिट घेऊन जॅकपॉटची सोय करायची, हा आमचा बेत आहे.

प्रश्नः म्हणजे तुम्ही घोडेबाजाराचे बोलताय…
फोलपटरावः अहो, कसले घोडे आणि कसले काय. हा सगळा शिरगणतीचा प्रताप आहे. निवडणुकांमध्ये लोकांनी गाढवं निवडून द्यायची आणि तुम्हा पत्रकारांनी त्याला घोडेबाजार म्हणायचं, कशाला ही प्रथा पाडता. लोकांच्या फायद्यासाठी आली चार डोकी एकत्र आणि केलं पाच वर्षे तुमचं मनोरंजन, त्याला तुम्ही काय टॅक्स लावणार का. त्यामुळं आम्ही घोडेबाजाराचं बोलत नाही, आम्ही बोलतो प्रॅक्टिकलचं. आता तुम्ही घोडेबाजाराचं बोलताय. घोडं मेलं ओझ्याने शिंगरु मेलं येरझाऱ्यानं तुम्ही ऐकलं असंलच. तर आमचं घोडं न मरता निवडणुकीचं ओझं वाहतंय आणि राजकीय पक्षांचं शिंगरू बंडखोरीच्या, आचारसंहितेच्या येरझाऱ्यानं मरतंय. आता त्यातून या पक्षांचा निकाल लागलाच वाईट, तर आमच्यासारख्या घोड्यांनीच खांदा द्यायला पाहिजेय ना.

प्रश्नः फोलपटरावजी, तुमच्या या यशाचे रहस्य काय?
फोलपटरावजीः सक्रियता. मी नेहमी कार्यरत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तयार असतो. काही वेळेस, समस्या कमी पडू लागल्या तर केवळ सोडविण्यासाठी म्हणून मी नव्या समस्या निर्माण करतो. अखेरचा श्वास असेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आतासुद्धा तुमच्याशी मी बोलत असताना, यातले कोणते वाक्य मी बोललोच नाही असा खुलासा उद्या करायचा, याचा विचार मी करत आहे. मुलाखत संपली की त्याची तयारी झालीच म्हणून समजा.

प्रश्नः सध्या राज्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे असं तुम्हाला वाटतं?
फोलपटरावः कायदा आणि सुव्यवस्था. अहो, या राज्यात कोणाला काही धरबंदच राहिलेला नाही. कोणीही येतं आमच्या फॅक्टरीला आग लावतं, अमुक येतो गाडीवर दगडफेक करतो. अरे, कायदा हातात कशाला घेता. तो जागच्या जागी राहू द्या ना. कशाला वापरायला लावता. परवा आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाला. सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गोळ्या घातल्या, सरकारच्या आदेशाची पोलिसांनी योग्य अंमलबजावणी केली, हे कदाचित खरे असेल. मात्र त्यावेळी ते कशाच्या अंमलाखाली होते, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. परिस्थिती इतकी वाईट आहे, का परवा मी एका सभेत म्हणालो, सरकारने आता आठवड्यातील सातही वारांना जोडून एक गोळीवारही जाहीर करावा. यादिवशी राज्यात सगळीकडे गोळीबार करता येईल. बाकीच सहा दिवसतरी बरे जातील ना लोकांचे.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता?
फोलपटरावः राजकारणाचे क्षेत्र वाईट असं कोणी कितीही बोललं तरी लक्ष देऊ नका. कोटी गमावून बसताल. राजकारणात तरुण रक्ताला खूप वाव आहे. मी तर म्हणेन, तरूणांच्या रक्तावरच राजकारण चालतंय. शक्य असेल तोवर एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातल्या माणसाच्या वळचणीला जा. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर जनतेवर छाप पडायला हवी. त्यासाठी खूप पिक्चर पाहा. पिक्चरमधल्या अॅक्टरपेक्षा असा भारी अभिनय करा, की नाटकी अभिनय शिकण्यासाठी त्याने तुमच्या सभांना आलं पाहिजे. शक्यतोवर अभिनेत्रीशी चांगले (आणि नैतिकही) संबंध ठेवा. ज्या काय चळवळी, आंदोलने करायची असतील ती कोणतेही पद किंवा सत्ता मिळविण्यापूर्वीच करा. कारण कोणताही राजकारणी फक्त खुर्ची मिळेपर्यंत जंगम मालमत्ता असतो. त्यानंतर तो स्थावर मालमत्ता होतो. तुमच्या मागे असलेले लोक तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेत का तुमचा पाठलाग करायला आलेत, त्याची एकदा खात्री करा. एक लक्षात घ्या, सगळ्या नेत्य़ांना राज्यापुढच्या, मागच्यापुढच्या सगळ्याच, समस्यांची जाणीव असते. त्याची उत्तरे मात्र कोणाकडेच नसतात.

फोलपटांच्या मुलाखती

फोलपटराव, राजकीय नेते

भाग १
मुलाखतकारः नमस्कार, आज आपण भेटणार आहोत आपले लाडावलेले, माफ करा लाडके नेते फोलपटराव यांना. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फोलपटराव यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळेच दर निवडणुकीच्या वेळी जनताही निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भरीस घालते. यंदाच्याही विवडणुकीत ते मतदारांच्या नशिबाची परीक्षा पाहणार असल्याने आपले नशिब आजमावून पाहणार आहेत. तर या आपण त्यांच्याशी संवाद साधू या.तर फोलपटरावजी, आतापर्यंतच्या वीस वर्षांच्या काळात आपण अठरा पक्ष बदलले आणि स्वतःचे दोन पक्ष काढून विसर्जितही केले. यामागचे इंगित काय?
फोलपटरावः त्याचं असं आहे…जनतेचं कल्याण व्हायचे असेल तर राज्यात स्थिर सरकार पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दहा पक्ष तर आम्ही स्थिर सरकार याच मुद्द्यासाठी बदलले. गेल्या दहा वर्षांत तर आमची ख्यातीच अशी झाली आहे, की ज्याला आपले गव्हर्नमेंट टिकवायचे असेल, त्याला आमची मदतच घ्यावी लागते. आमची इस्त्री बसल्याशिवाय राज्याची घडीच बसत नाही म्हणा ना. दोन पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षतेसाठी बदलले. जातीय शक्तींना आमच्यामुळे मदत होऊ नये, यासाठी सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळवून घेण्याचे आमचे आधीपासून धोरण आहे. आता त्यात गफलत काय होते, का आम्ही एखाद्या पक्षात गेल्यानंतर तिथे जातीयवाद सुरू झाल्याचे आमच्या लक्षात येते. एक उदाहरण देतो. आम्ही सत्ताधारी पक्षात असताना आमच्या मतदारसंघात दंगल झाली. त्यावेळी आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो, की दंगल लवकर आटोक्यात आणा. दोषी कोण आहे, याची तपासणी करायची गरज नाही. तर गृहमंत्र्यांचे उत्तर होते, आम्हाला माहित आहे या दंगलीत कोण जातीने लक्ष घालत आहे. मग मी सत्ताधारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. शिवाय माझ्या पक्ष बदलण्याने जनतेला किती फायदा होतो,पहा ना. दरवेळी त्यांना कोरी पाटी असलेला प्रतिनिधी मिळतो. पाट्या टाकणाऱ्या प्रतिनिधीपेक्षा कोरी पाटी असणारा प्रतिनिधी केव्हाही चांगलाच ना (आपल्या विनोदावर स्वतःच हसतात.)
आणखी एक कारण आहे। आपल्या नागरिकांनी, आमच्या अनुयायांनी सर्व प्रकारच्या अनुभवांना, नवीन विचारांना सामोरे जावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठीही मला असे राजकारणातले आडवळणं घ्यावे लागले.
प्रश्नः परंतु हे सर्व पक्षांतर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केले, असे लोक म्हणतात…
फोलपटरावः लोक म्हणजे कोण हो? विरोधक! त्यांच्या म्हणण्याला कोण भीक घालतो. समोरच्या उमेदवाराच्या पाठीमागे असं काही बाही बोलण्याची रीतच असते राजकारणात. आता आम्ही काय आमच्या विरोधकांवर कमी आरोप केले. काय झालं त्याचं। तसंच असते ते. राहता राहिला प्रश्न आमच्या फायद्याचा॥ आता असं बघा, आमचा फायदा हा समाजाचा फायदा असतो. दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत पोचेपर्यंत तेरा पैसे होतो, असं राजीव गांधी म्हणायचे. आता आमच्यापर्यंत रुपयाच नाही आला तर खालच्यांना तेरा पैसे तरी मिळतील का तुम्हीच विचार करा. शेवटी आम्हाला थोडेच पैसे खावेसे वाटतात. पण लोकांचे पोट भरण्यासाठी आम्हाला तेही करावे लागते. पापी पेट का सवाल है ना!
प्रश्नः मात्र अलिकडे राज्यातील जमीनींच्या विक्रीत तसेच प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याच्या बाबतीत तुमचे नाव अनेक वादांमध्ये सापडले…
फोलपटरावः थांबा थांबा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परवा दिल्लीत मला बिहारचे एक खासदार भेटले. त्यांना मी विचारले, तुम्ही आमच्या राज्यात एवढ्या जमिनी का विकत घेत आहात. त्यांनी मला सांगितले, तुमच्याच राज्यात नाही तर मी सगळ्या भारतात जमिनी घेत आहे. कारण मला राष्ट्रीय नेता व्हायचे आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती सत्ता हे शिवाजी राजांच्या काळी ठीक होतं हो. आता सत्तेच्या किल्ल्या जमिनी ज्याच्याकडे असतात त्यांच्या हाती असते. काय आहे, विकास करायचे म्हणजे सोयीसुविधा, जागा पाहिजे. त्या ताबडतोब मिळायच्या झाल्या तर आपल्या हाती काही तरी पाहिजे ना. यासंबंधात काही वाद व्हावे, असे मला वाटत नाही. शिवाय आपला वेव्हार एकदम स्वच्छ आहे. सगळ्या जमिनी सरकारी भावाने घेतल्या आहेत, तर लोकं काय म्हणणार का सगळ्या जमिनी माझ्या भावाने घेतल्या आहेत. सगळा शब्दांचा खेळ आहे हो सारा.