Monthly Archives: ऑक्टोबर 2007
चिरंजीव मेगास्टार

सामान्यतः आंध्र प्रदेशात नेहमी दिसणारे हे चित्र. चित्रपटसृष्टीतील कलाकार म्हटले की त्यांची लफडी, नखरे अशाच बातम्या (आवडीने) वाचायची आपल्याला सवय असते. तेलुगु सुपरस्टार चिरंजीवी याच्याबद्दल गेल्या आठवड्यात आलेल्या बातम्या याला अपवाद नव्हत्या. त्याच्या मुलीने पळून जाऊन लग्न केल्याने माध्यमांनी त्याला मोठी प्रसिद्धी दिली. आपल्याकडच्या लोकांनीही त्याची चविष्टपणे चर्चा केली. कोट्यवधी प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असलेला, मोठ्या मुलीचे थाटामाटात लग्न करून देणारा, निवृत्तीची भाषा बोलणारा आणि आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी चॅरिटी संस्था चालविणारा चिरंजीवी मात्र या संपूर्ण प्रकरणात फुकट बदनाम झाला.
आंध्र प्रदेशात तुम्ही कोणालाही जाऊन विचारा, चिरंजीवी हे नाव काढताच तुम्हाला वेगळी ट्रिटमेंट मिळालीच म्हणून समजा. हैदराबादेत फिरत असताना 1111 या क्रमांकाची मोटार जाताना दिसली तर बेलाशक समजा, की चिरंजीवी चालला आहे. चाहत्यांमध्ये चिरु या नावाने ओळखल्या जाणारा चिरंजीवी हा तेलुगु प्रेक्षकांचा जीव की प्राण. चिरुच्या चित्रपटांसाठी गर्दी झाल्याने काही जणांचा जीव गेल्याच्या घटनाही घडल्या आहेत. कोनिदेला शिव शंकर वरा प्रसाद हे नाव तुम्हाला ओळखीचं वाटतं का? नाही ना? अहो, या नावाचीच व्यक्ती देश-परदेशांत चिरंजीवी या नावाने ओळखली जाते. पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील मुगल्तुर येथे 22 ऑगस्ट 1955 रोजी चिरंजीवीचा जन्म झाला. वडिल वेंकट राव पोलिस अधिकारी असल्याने ते बदलीच्या गावी असत. त्यामुळे आजी-आजोबांकडे चिरु लहानाचा मोठा झाला. बी. कॉम. ची पदवी घेतल्यानंतर अकाऊंटन्सीचा कोर्स करण्यासाठी तो मद्रासला दाखल झाला. “पुनादिराल्लु’ नावाच्या एका सिनेमात काम करण्यासाठी यावेळी त्याला ऑफर आली. त्याने कॉलेजच्या आपल्या प्राचार्यांना आजोबा वारल्याचे खोटेच सांगून सुट्टी घेतली.
या चित्रपटातील पहिल्या दृश्यात चिरंजीवीला पाय धुण्याचे काम होते. त्यावेळी त्याने आधीचे दृश्य काय होते, अशी विचारणा केली. तेथील दिग्दर्शकांनी त्या दृश्याची कल्पना चिरंजीवीला दिली. त्याने मग तेथीलच थोडी धूळ घेऊन पायावर रगडली. त्याची ही कृती सिनेमाटोग्राफर पाहत होता. तो चिरंजीवीकडे आला आणि त्याला म्हणाला, “”एक दिवस तू मोठा स्टार होशील.” तेथूनच चिरंजीवीच्या मनात अभिनेता होण्याची ठिणगी पडली. याच वेळेस तेथील फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये त्याने नाव नोंदविले. यावेळी त्याची एका सिनियरशी घनिष्ठ मैत्री झाली. पुढे चालून चिरुप्रमाणेच त्याचा हा मित्रही दक्षिण भारतातील मोठा सुपरस्टार म्हणून नावा रूपाला आला. तो सुपरस्टार म्हणजे आपला रजनीकांत उर्फ शिवाजीराव गायकवाड!
चिरंजीवीने 1977 मध्ये “प्रणाम खरीदु’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. हनुमानाचा भक्त असल्याने त्याने पडद्यावर चिरंजीवी हे नाव घेतले. “मोसगाडू’, “47 रोजुलु’ आदी चित्रपटांमधून मात्र त्याने खलनायक रंगविले. जितेंद्र, जयाप्रदा यांच्या भूमिका असलेला “कैदी’ हा सिनेमा तुम्हाला आठवतो का? हा चित्रपट मुळात “खैदी नं. 786′ या चित्रपटाचा रिमेक होता. याच चित्रपटातून मारधाड करणारा ऍक्शन हिरो म्हणून चिरंजीवीने स्वतःची ओळख निर्माण केली. आता टीव्ही चॅनल्स आणि सीडीच्या जमान्यात तेलुगु, तमिळसारख्या भाषांतील अनेक चित्रपट हिंदीत डब करून आपल्यापुढे आणले जात आहेत. मात्र 1980 आणि 90 च्या दशकात चिरंजीवीच्या अनेक सिनेमांचे हिंदीत रिमेक झाले. अनिल कपूरचे अनेक सिनेमे चिरंजीवीच्या चित्रपटांचे रिमेक होते. चिरंजीवीच्या “जमाई मजाका’चा “जमाई राजा’, “घराना मोगुडु’चा “लाडला’, “रौडी एमएलए’चा “लोफर’ असे अनेक रिमेक आपण पाहिले. हे सर्वच चित्रपट हिट झाल्याचं तुम्हाला आठवत असेलच.
हाणामारीच्या चित्रपटांबरोबरच चिरुने त्यावेळी ब्रेक डान्सची वेगळीच आवृत्ती पडद्यावर साकारण्यास सुरवात केली. त्यामुळे त्याच्या चाहते तर वाढलेच, शिवाय त्याची अनेकांनी नक्कलही करण्यास सुरवात केली. 1990 मध्ये चिरंजीवीने “प्रतिबंध” चित्रपटातून हिंदीत प्रवेश केला. त्याला प्रचंड यश मिळाले. रामी रेड्डीचा “स्पॉट नाना’ सर्वांच्या डोळ्यांत भरला तेवढाच चिरुचा जिगरबाज पोलिस इन्स्पेक्टर प्रेक्षकांना आवडला. या चित्रपटाच्या यशानंतर लगोलग “आज का गुंडाराज’ आला. चिरंजीवीचा “हिटलर’ (1995) हा सिनेमा आला आणि तेलुगु चित्रपटांमध्ये त्याला मेगास्टार या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर आंध्र प्रदेशात त्याचे स्थान इतर कोणाहीपेक्षा मोठे झाले. यानंतर चिरुच्या यशस्वी चित्रपटांची लाटच तेलुगुत आली आणि एकापाठोपाठ त्याचे चित्रपट तिकिटबारीवर गल्ला करू लागले.
खरं तर तेलुगु चित्रपटसृष्टीला “टॉलिवूड’ची स्वतःची ओळख देण्याचे काम चिरंजीवीने केले होते. त्याच्या पूर्वी एन. टी. रामाराव आणि अक्किनेनी राघवेंद्र राव हे तेलुगु चित्रपटांचे मोठे स्टार होते. मात्र चिरंजीवीला सुपरस्टारपदाचे एकछत्री राज्य लाभले. तेलुगु भाषेत चिरुनामा म्हणजे पत्ता. चिरंजीवीच्या चिरु नावातही टॉलिवूडचा पत्ता लपला आहे. रजनीकांत याच्या प्रमाणेच तोही अध्यात्मात रमणारा माणूस आहे. सुमारे तीस वर्षे चित्रपटसृष्टीत काढूनही कोणत्याही वादात न सापडलेला चिरु लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊन बसला. लोक त्याला “अन्नया’ (मोठा भाऊ) या नावाने ओळखू लागले. त्याच्या या लोकप्रियतेवर गेल्या वर्षी पद्मभूषण किताब देऊन भारत सरकारने शिक्कामोर्तब केले. अथेन्स येथे 2004 साली झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान “कोका कोला’ कंपनीने चिरंजीवीला खास पाहुणा म्हणून आमंत्रित केले होते.
स्वतःबाबत चिरंजीवी म्हणतो, “”मी मदर तेरेसा बनण्यासाठी किंवा लोकांनी मला आध्यात्मिक म्हणावं, यासाठी काही करत नाही. मला वाटतं म्हणून मी ते करतो. लाखो लोकांचे प्रेम मिळाल्यानंतर, एवढे मोठे स्थान प्राप्त केल्यानंतर एखाद्याच्या आयुष्याला काहीतरी मोठा उद्देश असायलाच पाहिजे.”
चिरंजीवी जेवढा चित्रपटांसाठी ओळखला जातो त्याहून जास्त आंध्र प्रदेशात सामाजिक कार्याबद्दल त्याची ओळख आहे. नऊ वर्षांपूर्वी त्याने “चिंरजीवी चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना केली. ब्लड बॅंक (रक्तपेढी )आणि आय बॅंक (नेत्रपेढी) चालविण्याचे काम हा ट्रस्ट करतो. आंध्र प्रदेशात या रक्तपेढीने आतापर्यंत 96 हजार लोकांना मदत केली आहे आणि नेत्रपेढीने एक हजार लोकांना मदत केली आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये हैदराबादमध्ये “चिरंजीवी चॅरिटेबल फाउंडेशन’चे उद्घाटन करण्यासाठी तेव्हाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. कलाम आले होते.
सकल कुक्कुरे यदि स्वर्गे जाय…
काय?
वाचनाच्या बेटावरील श्रद्धेचा शोध

माझ्या या निष्कर्षांना खोटं ठरवंल, असं काहीही घडलं नाही, त्यामुळे हे सर्व ईश्वरानेच घडविले आहे, ही भावना माझ्या मनात आणखी प्रबळ होऊ लागली-त्यानेच मला या दयनीय परिस्थितीत आणून ठेवले आहे, कारण त्याच्याकडे माझ्यावरच नाही, तर जगातील वस्तुमात्रावर स्वामित्व गाजविण्याची शक्ती आहे. त्यानंतर लगेच विचार आला-ईश्वराने माझ्यासोबत असे का केले? मी असे काय केले होते?
तंटाभक्तांची तंटमुक्ती
– रामराम म्हादबा, उठलासा नव्हं?
– हां उठलो हाय…काय काम काढलं सकाळच्या पारी?
– काय नाय. काल काय तू लय दंगा केला म्हणं ग्रामसभेत…मी वाईच तालुक्याला गेलो व्हतो. आल्यावर बायलीने सांगितलं…तवा म्हणलं सकाळचं जाऊन समक्षच विचारावं…एक घाव ना दोन तुकडे…काय?
– आरं बाबा, आता मलाच बोल लावा दंगा केलान म्हणून. आरं अख्ख्या गावाला पूस काल काय झालं त्या सभेत. त्या ग्रामसेवकाला न सरपंचाला असा फाडला ना आडवा न उभा…ज्याचं नाव ते. टीव्ही लावू देत नाही XXX
– आरं म्हादबा, असं डोसक्यात काय पाई राख घालून घेतो रे बाबा? आरं त्या टीव्हीची मामलत ती काय अन तू भांडणं काय पाई करतो रं? काय झालं तं सांग बाबा समदं…तवर वहिनी बी चहा आणतील… – हे बग भाऊ, काल गांधी जयंती म्हून आपल्याकडं ग्रामसभा होती, हे तर तुला ठावं होतंच. आपलं काय ठरलं होतं का गावात तंटा करायचा नाय, भांडण करायचा नाय…त्यासाठी तं ही सभा बोलाविली होती..खरं का नाय…आता तुला म्हायत हाय भाऊ, का सरपंच किती डांबरट अन ग्रामसेवक किती आतल्या गाठीचं बेणं हायंत…गावात तीन पिढ्यांपासून लीडरकी हाय आमच्या घराण्याची…गेल्या विलेक्शनला विपरीत घडलं अन हा कावळा खुर्चीत जाऊन बसला. म्या म्हण्लं…जाऊ दे. परत्येक कुत्र्याचे दिस असतात. तं यानं काय केलं का ग्रामसभेचं आवताण मला द्यायला नको? बरं नाय दिलं…तरी बी म्या गेलो…का म्हण्लं गाव आपलं हाय…गावातली शांती आपली हाय….
– आरं म्हाद्या, पर तु तं सांगत होता का पाटलांच्या शांतीवर तू आताशा लाईन मारीत न्हाय म्हणून…
– ती शांती न्हाय रं भाऊ…बायकोशप्पथ लगीन झाल्यापासून म्या कोण्या बी मुलीकडं नजर उचलून पाहत नाही…आन तुला म्हणून सांगतो…आताशा ‘त्या’ शांतीत बी दम रायला नाही…ते जाऊ दे…तं तुला सांगत होतो आपल्या गावच्या शांतीचं म्हणजे बापूंनी सांगितलेल्या शांतीचं…तं ती शांती हवी म्हणून सभेला गेलो…
– आरं सभा तंटा मिटविण्यासाठी…तू गेला शांतीसाठी…अन तिथं करून आला मारामारी…? आरं ह्याला म्हणायचं तरी काय?
– सांगतो…सभेला समदा गाव जमला व्हता…त्यात सरपंचानं मिजास मारायला त्याच्या बायका पोरांना बी बोलाविलं होतं…तं मी विचारलं का हे एवढं लटांबर हितं कशाकरता. आता यात काय चूक हाय काय. तवा बसली ना दातखीळ सरपंचाची. तोंडातून शब्द फुटत नव्हता xxxच्या. तवा तं ग्रामसेवक मंदी पडला. त्याच्याखातर मी बी जरा आवरलो…का की आपन बी गेल्या वख्ताला बायकोला नेलंच व्हतं की तिथं…तं त्यानंतर वग सुरू केला का बेट्यांनी…सभा जमली तंटा मिटविण्यासाठी आन हे बोलू लागले हागणदारीचं…का गावात हागणदारी बंद कराया पायजे…परत्येकाने शौचालये बांधावीत…
-मंग तुला कायची अडचण रं बाबा? हागणदारी तं हागणदारी…तुला कायचा प्रोब्लम?
– प्रोब्लम आरं काय नाही…पण मी म्हन्तो, आन मी त्या दोगांच्या बी तोंडावर सांगितलं का बाबा, हागणदारीचा प्रश्न आमच्या घरात आम्ही संपविला आहे…इथं तुमी शांततेचं बोला…तं दोघं बी जोक् मारू लागले की रं…एक म्हन्ला का हागणदारीत शांतीच असती न्हवं…दुसरा काय म्हन्ला मायतंय का? त्यो म्हन्ला का तुमच्या आख्ख्या फॅमिलीनं हगायचं बंद केलं का? आता आसं कुनी बोलल्यावर तुझं टाळकं सरकणार नाय का? तं माझं बी टकुरं सराकलं…तरीबी मी शांत व्हतो…
– आरं मग भांडण कामून झालं?
– आरं ते समदं आपल्या मास्तरांचं झेंगट हाय…त्यानंच सांगितलं का टीव्हीवर आबांचं प्रवचन चालू हाय अन आबा आपल्याला शांततेचं महत्त्व सांगतायत…तर मंग काय…तुला तं माहितंय…ग्रामसेवकावर लायन मारण्यासाठी सरपंचानं टीव्हीला हात की रे घातला…आता मात्र आपला स्टॅमिना संपला व्हता बरं का! मी मोठ्यांदा आवाज काढून सांगितलं का पयले ही सभा व्हयंल अन त्येच्यानंतरच ज्याला हवा त्यानं टीव्ही बघावा…यात काय खोटी हाय काय?
– नाय….बिल्कुल नाय.
– त्येच…मी त्येच सांगत व्हतो…तं सरपंच अन त्येच्या गुंडांनी म्होरं येऊन मलाच खुन्नस दिली…अन माझ्याम्होरं येवून मला धमकी देऊ लागले…तं मी काय मागं हटणार होतो व्हयं…मी बी त्येंना त्यांच्याच भाषेत दम दिला…ही दमबाजी चालू असतानाच दोन पोरटी टीव्हीकडं गेली अन खटका दाबला…ती सरपंचाचीच कार्टी व्हती वाटतं…XXच्यांनी टीव्ही लावला तं लावला….त्यावर फॉरिनची गाणी लावली…अन ती हालणारी चित्रं…आता मी बी ती चित्रं पाहण्यात गुंतलो अन तितक्यात कुणीतरी ठोसा लावला माझ्या थ्वबाडावर…आसला कळवळला जीव…मंग मी बी काय पाहिलं नाही…हात न पाय…वाटेल तसं फिरविलं दांडपट्ट्यासारखं…ल्हानपणापासून सकाळ संध्याकाळ चार-चार लिटर दूध पिऊन केलेली तब्येत हाय ही…काय मुकाट मार खातो का मी…हे हाण हाणला…मार खावून समदे पळाले असतील हागणदारीत…हा हा हा!
– आरं हां…तो सरपंच पडला हाय तिकडं घरात तळमळत…तुझ्या नावानं शंख करतोय…अन ग्रामसेवक रात्रीपासून गेला हाय पळून…पोलिसांत फिर्याद देतो म्हून बोंबलत होता…
– बोंबलू दे भाऊ…सरकार म्हन्तं तंटामुक्त व्हा…आता तंटा करण्याऱयांनाच गावातून हाकलल्याबिगर गावात शांती कशी राहणार? आता बघ हे बोंबल्ये दवाखान्यात हायेत तवर गावात कशी शांती ऱहाते….बघच तू…चल, तंवर आपण आदर्श कार्यकर्ता पुरस्कारासाठी अर्ज देवून येवू…!
पाण्यात न गेलेले पैसे
देवा, याही देशात पाऊस पाड
देवा, याही शहरात पाऊस पाड…
काय आहे, गेली दोन वर्षे महाराष्ट्रात पूर आणि अतिवृष्टीची परंपरा चालू आहे. त्या दोन संकटांशी झगडता झगडता तनू भागलेल्या जुन्या जर्कीनने यंदा कॉलर टाकली आणि त्याच्या रिप्लेसमेंटची तरतूद करण्याची जबाबदारी आली. आता हा योजनाबाह्य खर्च अंगावर पडल्यावर त्यासाठी हालचाली करणंही आलंच. आधीच खरेदीची काडीचीही अक्कल नसल्याची पंचक्रोशीत ख्याती! त्यात पावसाळ्याचा हंगाम बघून विक्रेत्यांनी केलेली सुगीची बेगमी. मग काय विचारता?
कण्णगीचे सौभाग्य अन करुणानिधींचे दुर्भाग्य! !
असो. मात्र करुणानिधींच्या या बडबडीमुळे त्यांचे काही चांगले कामही दुर्लक्षिले जातात. या संपूर्ण काळात मला आठवत होते सुमारे वर्षभरापूर्वी तमिळनाडूत सत्तांतरानंतर घडलेले एक सांस्कृतिक नाटक. एखाद्या देशात, राज्यात आपल्या आवडत्या अथवा कर्तृत्ववान व्यक्तीचा गौरव करणे ही सामान्य बाब आहे. ही व्यक्ती कोणती असावी, याचेही निकष सामान्यतः ठरलेले आहेत. राजकीय नेत्यांचे पुतळे सत्तांतरानंतर रस्त्यावरील धुळीत मिळाल्याची चित्रेही दिसतात. मात्र एखाद्या साहित्यकृतीतील पात्राचा पुतळा एखाद्या शहराने मानाने उभारावा, त्याला अस्मितेचे प्रतिक बनवावे आणि हा पुतळा हलविल्यानंतर त्याच्या पुनर्स्थापनेसाठी सत्तांतराचा कौल द्यावा, ही जगाच्या इतिहासात क्वचितच घडणारी घटना. ती घडली तमिळनाडूत. कण्णगीच्या पुतळ्याच्या निमित्ताने!