वाघनखांचा शिर ‘पेच’

इंग्रजी पत्रकारितेत आलो, तेव्हा कोणत्या बातम्या कराव्या लागतील किंवा मी करेन, याबाबतीत इतरांइतकीच मलाही शंका होती. मात्र गेल्या महिन्यात मी दिलेल्या दोन बातम्यांमुळेच मला स्वतःला मी करत असलेल्या कामाबाबत अभिमान वाटत आहे। पहिली बातमी विंचूरकर वाड्याच्या बाबत होती. माझी गेली पोस्टही त्याचसंबंधात होती. ती बातमी पुणे मिररमध्ये आल्यानंतर मुंबई मिररनेही छापली. राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांचा त्यात उल्लेख असल्याने त्यांनी या वृत्ताची दखल घेतली. ते स्वतः गणेशोत्सवाच्या काळातच पुण्यातील विंचूरकर वाड्यात येऊन गेल्याचे मला कळाले. तेव्हा त्यांच्याकडे यासंबंधात फॉलो-अपसाठी विचारणा करण्याची जबाबदारी साहजिकच येऊन पडली.
विविध मार्गांनी आर. आर. आबांशी संपर्क साधल्यानंतर, यथावकाश मूळ बातमीचा इम्पॅक्टही छापला. त्याचवेळेस आणखी एक मोठी बातमी माझ्या हाताला लागली. ती म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न चालू असल्याची.
आता ही बातमी मूळातच एवढी मोठी होती, की ती अगदी व्यवस्थित तयारी करून, सर्व माहिती करून आणि खातरजमा करूनच द्यावी लागणार होती। त्यामुळे आधी लंडनच्या विक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियमकडून आधी यासंबंधात माहिती मागवली. ‘कदाचित शिवाजी महाराजांची असणारी वाघनखे आमच्या संग्रहात आहेत. ती प्रदर्शनासाठी पाठविण्याबात आम्हाला विनंती करण्यात आली आहे. सुरक्षेची खात्री पटल्यानंतर आम्ही अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांचे उत्तर आले. अर्धे काम त्यात फत्ते झाले!
आता जबाबदारी होती आबांना स्वतःला विचारण्याची. त्यासाठी त्यांना फॅक्स केला, फोन करायचा प्रयत्न केला मात्र उत्तर काही आले नाही. त्यावेळी गणेशोत्सव चालू असल्याने साहेब गणपती पहायला गेले आहेत, असे त्यांचे कर्मचारी सांगायचे. (होय, असंच सांगायचे.) शेवटी जलसंपदा विभागातील यांत्रिकी विभागाच्या कार्यक्रमासाठी आबा येणार आहेत, असे कळाले तेव्हा तिथेच त्याना गाठायचे ठरविले. त्याच कार्यक्रमाच्या संबंधात मानार हाऊसची एक बातमी दिलेली असल्याने तिथंही अर्धे काम झाले होतेच.

त्या कार्यक्रमात तानाजी खोत याच्यासोबत नेट लावून बसलो. चार मंत्र्यांची बडबड, एका राजकीय कार्य़कर्त्याची चापलूसगिरी आणि काही सरकारी अधिकाऱयांची लाचारी सहन केल्यानंतर आबा व्यासपीठावरून उतरताना त्यांना गाठले. पाऊस मी म्हणत होता आणि इकडे आमच्या बातमीदारीचा कस लागत होता. कार्यक्रमाला आलेल्या अन्य सात-आठ बातमीदारांना झुकांडी देऊन, एकदाचा आबांचा कोट आम्हाला मिळाला.

“प्रस्ताव दिला होता त्यांना. आम्ही सुरक्षा पुरवावी अशी त्यांची मागणी आहे. ती फाईल चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली आहे,” आर. आर. पाटील म्हणाले आणि आमचे घोडे गंगेत न्हाले (म्हणजे शेजारून वाहणाऱया मुळा नदीत) नंतर जेवणावर ताव मारला तरी पोट आधीच भरले होते.

त्यानंतर इतिहास तज्ज्ञांना विचारावे, तर बाबासाहेब पुरंदरे अमेरिकेला गेलेले. त्यामुळे त्यांच्या आधीच्या एका लेखातूनच माहिती घेतली. निनाद बेडेकर यांना फोन केला तर त्यांचे म्हणणे असे, की शिवाजी महाराजांनी अफझलखानाला वाघनखांनी नव्हे, तर तलवारीने मारले होते. कवी परमानंद यांनी लिहिलेल्या शिवभूषषण ग्रंथात ही माहिती दिल्याचे त्यांनी सांगितले. महाराजांची वाघनखे आहेत, याचेही ठोस पुरावे नसून, नंतरच्या बखरींनी वाघनखांचा उल्लेख केल्याचे त्यांनी सांगितले. हा एक नवाच पेच निर्माण झाला होता. होता म्हणजे आहे. त्यात विकिपेडियावर शिवाजी महाराजांच्या वाघनखांचे म्हणून जे छायाचित्र आहे, ते म्हैसूरचे असल्याचे त्या फलकावर लिहिले आहे.

विक्टोरिया अँड अल्बर्ट संग्रहालयाने ते छायाचित्र खरे आहे अथवा नाही, याबाबत काहीही भाष्य केलेले नाही। मात्र मूळ वाघनखांचे छायाचित्र मला पाठविल्याचा मेल पाठविला. पण त्यात छायाचित्राची लिंक नाही. संग्रहालयाच्या संकेतस्थळावर शोध घेतला असता वाघनखांचे (टाईगर क्लॉ) एक वेगळेच छायाचित्र दिसते. मात्र त्यात महाराष्ट्र किंवा शिवाजी महाराजांचा उल्लेख नाही. असा हा घोळ आहे. अन तरीही, वाघनखांची बातमी ही माझ्या पत्रकारितेचा शिरपेच आहे!

विंचूरकर वाड्याची दुरवस्था

वघ्या महाराष्ट्रात आज गणेशोत्सव साजरा होत आहे. उत्साहाच्या या काळात, ज्या ठिकाणी या उत्सवाने बाळसे धरले, जेथे तो वाढला ती जागा मात्र आज दुर्लक्ष आणि निष्काळजीपणाची बळी ठरत आहे. बहुतेकांना तर या जागेचे महत्त्वही माहित नाही. अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार असलेली ही वास्तु अगदी मोडकळीस आलेल्या अवस्थेत उभी आहे.

विंचूरकर वाडा ही तशी पेशवेकालीन वास्तु. पेशव्यांच्या सरदारांपैकी असलेले विठ्ठ्ल शिवदेव यांनी बांधलेला हा वाडा सुमारे १६,००० चौ। फुट आकाराचा आहे. लोकमान्य टिळक येथे १८९२ पासून १९०७ पर्यंत राहत होते. याच काळात लोकमान्यांनी १८९४ साली पहिल्या सार्वजनिक गणपतीची स्थापना केली. लोकमान्यांच्याही आधी भाऊ रंगारी आणि त्यांच्या सहकार्‍यांनी गणपतीची स्थापनी केली होती. मात्र त्याला सार्वजनिक आणि सुसंगत रूप मिळाले लोकमान्यांमुळे. त्यावेळी लोकमान्य टिळक कायद्याच्या विद्यार्थ्यांचे शिकवणी वर्ग घेत असत. त्यामुळे या गणपतीला ‘लॉ क्लासचा गणपती’ म्हणून ओळखले जात असे. लोकमान्य गायकवाड वाड्यात जाईपर्यंत येथेच सार्वजनिक गणपती बसत असे.

आज मात्र हा वाडा अगदीच दुर्लक्षित अवस्थेत उभा आहे। गेल्या वर्षी महाराष्ट्राचे घोषणाशूर गॄहमंत्री आर। आर. पाटील यांनी या वाड्याला भेट दिली होती. त्यावेळेपासून या वाड्याबद्द्ल मला उत्सुकता होत्ती. त्यानंतर गणेशोत्सवाच्या काळात आम्ही या वाड्याला भेटही दिली होती. तेव्हा तिथली अवस्था पाहून मन जरा खट्टूच झाले. त्यामुळे यंदा बातमी करण्याची संधी मिळाली, तेव्हा या वाड्यावर मी लक्षच ठेवून होतो. बातमी करण्यासाठी गेलो तेव्हा कळाले, की वाड्याचा ताबा मुळात या गणेश मंडळाकडे नाहीच आहे. ‘लोकमान्य टिळक प्रथम प्रस्थापित गणपती ट्रस्ट’ या मंडळाला गणपतीच्या केवळ दहा दिवसांसाठी ताबा मिळतो. इतर वेळी खादी ग्रामोद्योग मंडळाकडे हा ताबा असतो. या मंडळाचे कर्मचारी सामान ठेवण्यासाठी या खोलीचा वापर करतात, असे कळाले. ट्र्स्ट्चे एक विश्वस्त रविंद्र पठारे यांनी सांगितले, की गेल्या वर्षी तर या कर्मचार्‍यांनी खोलीतील ऐतिहासिक तसबिरी बाहेर काढण्याची मजल गाठली होती. हे ऐकून मी मराठी माणसांच्या इतिहास प्रेमाला मनातूनच साष्टांग दंडवत घातला.
पठारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा वाडा विकल्याचे त्यांच्या कानावर आले आहे. “पुढच्या वर्षी गणपती बसवू का नाही, याची आम्हाला शंकाच आहे,” पठारे म्हणाले तेव्हा परिस्थिती किती बिकट आहे, याची जाणीव झाली।
केवळ गणपतीच नाही, आणखी एका ऐतिहासिक घटनेमुळे या वाड्याला महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही महत्त्व आहे. स्वामी विवेकानंद यांचे या वाड्यात काही दिवस वास्तव्य होते. लोकमान्य टिळक मुंबईहून पुण्याला येताना त्यांची आणि स्वामींजीची भेट झाली होती. स्वामींजीच्या विद्वत्तेने प्रभावित झालेले लोकमान्य त्यांना घरी घेऊन आले. याच विंचूरकर वाड्यातील एका खोलीत स्वामीजी राहत होते. काही दिवस वास्तव्य केल्यानंतर स्वामीजी कोणालाही न सांगता एके दिवशी निघून गेले. अशा या विलक्षण घटनेची माहिती आज केवळ मोजक्या लोकांना आहे. आमच्या वर्तमानपत्राने घेतलेल्या लोकांच्या मुलाखतीतून हीच माहिती समोर आली. खरे तर स्मृतीस्थळ म्हणून वर्षभर सुरू असावे, अशी योग्यता असलेली ही वास्तू आज शेवटच्या घटका मोजत आहे. ‘कालाय तस्मै नम:’ दुसरे काय?