एक डायरी गरजेची

दिवस एक, सकाळी नऊ
सकाळी उठलो. चांगल्या तब्येतीसाठी प्रत्येक माणसाने सकाळी उठणे गरजेचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरै उरकून वर्तमानपत्रे चाळायला सुरवात केली. जगाचे भान यायचे असेल, तर वर्तमानपत्राचे वाचन आवश्‍यक ठरते. वर्तमानपत्रात त्याच त्या बातम्या होत्या. हे लोक काही चांगलं, संदेशात्मक का छापत नाहीत? काय त्या आयटी का फायटीतल्या लोकांना भरपूर पगार मिळतो म्हणतात. काय उपयोग आहे त्याचा…त्या पैशाचा का चांगला उपयोग होतो? उधळपट्टी करतात लेकाचे! कपडे काय घेतात, बूटं काय घेतात! आमच्याकाळी नव्हतं असं!सूनबाईनं चहा दिला. पहिला घोट घेतला न्‌ काहीतरी खटकल्यासारखं झालं…””सूनबाई, चहात केशर नाही का टाकलं परवा ते आणलेलं…,” तिला म्हणालो..””हां, ते प्रतीकनं परवा आणलेलंच नं…हिमाचलला गेला होता तेव्हा…” तिनंही उत्तर देताना प्रश्‍नच टाकला.आता ते केसर कोण आणलं, हा प्रश्‍न निरर्थकच नव्हता का? ते चहात टाकायला हवं होतं. तसं सांगितलं तिला मी, तेव्हा कुठं पुन्हा केसर टाकलेला चहा देते म्हणाली.त्यानंतर दुपारपर्यंत काहीच काम नव्हतं. काही वेळ टीव्ही पाहत बसलो. त्यावरही चांगले कार्यक्रम नेमके आपल्याला वेळ नसतानाच लागतात ना…त्यामुळं आलमारीतून काढून पुस्तकं चाळायला सुरवात केली. कॉलेजमध्ये शिकवत होतो तेव्हा काय लोकांनी एक एक पुस्तकं भेट दिली होती…वा! आता लोकं पुस्तक प्रकाशनाला बोलावतात आणि नवी पुस्तके देतात…ती वाचवत नाहीत. काय करणार? आज रविवार, त्यामुळं संध्याकाळी दोन तीन कार्यक्रम आहेत. तिथे भाषणं होतीलच. त्यामुळं आता झोपतो.
दुपारी चार
दुपारची वामकुक्षी घेतली की कसं ताजतवानं वाटतं. झोपेतून उठलो तेव्हा नात (मुलीची मुलगी) भेटायला आली होती. कुठल्याशा कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. महिन्याला अठरा-एकोणीस (आवंढा) हजार पगार आहे. म्हणजे आमच्या प्रतीकसारखंच. त्याच्यासारखंच हीही खरेदी, वगैरे हूंऽऽ…तिला म्हणालो, “”बाई गं, बचत कर. चांगली पुस्तके वाच…”तर ती म्हणाली, “”आजोबा, दर महिन्याला दोन हजार रुपये म्युच्युअल फंडात टाकते. दोन हजार प्रॉविडंड फंडात जातात. महिन्याला एखादं तरी पुस्तक घेतेच…आता परवाच “जावा अँड एचटीएमएल’ घेतलं. बाकी “गुगल बुक्‍स’वर वाचते…आणखी काय हवं…'”मला काही सांगता आलं नाही…हातात पैसा खळखळू लागल्यानं तरुण पिढी मोठ्यांचा आदर ठेवेनासी झाली आहे. तरुण पिढीत संस्कार रुजविणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यानंतर माझ्या कार्यक्रमाला निघण्याची वेळ झाली. नातीकडे कार आहेच. तिला म्हणालो, “”मला सोड कार्यक्रमाला…’तर ती म्हणाली, “”आजोबा, मला जायचंय एका ठिकाणी.”शेवटी सुनेनं आग्रह केला म्हणून मला सोडायला तयार झाली…
रात्री दहा
एक पुस्तक प्रकाशन होतं. कुठल्याशा लेखकानं म्हाताऱ्यांसाठी (हल्ली त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात) लिहिलं आहे…मी गेलो तेव्हा कार्यक्रमस्थळी मोजकीच मंडळी होती…कार्यक्रमासाठी मला मानधनाचा चेक देणारे श्री. हसरे, मानधन देण्यासाठी माझ्याशी घासाघीस करणारे श्री. रडके…अशी आयोजकांपैकी मंडळी होती. कार्यक्रमाला वेळ होता त्यामुळं त्यांना जाऊन म्हणालो, “”प्रवासखर्चाचं पाकिट?”त्यांनीही दिलं. मात्र त्यातही दहा रुपये कमी असल्याचं घरी किट फोडल्यावर कळालं. हल्ली हे नेहमीचंच झालं आहे…त्यानंतक एक एक पाहुणेमंडळी येऊ लागली. गेल्या महिन्यात कुठल्याशा संस्थेचं पारितोषिक मिळाल्यानं अचानक प्रकाशात आलेला एक जण दीपप्रज्वलनासाठी होता. (सूत्रसंचालन करणाऱ्याचा गॅरेजचा धंदा असल्यानं कार्यक्रमात गंमतच झाली. त्याने ऐनवेळी दीपप्रज्ज्वलनाऐवजी “जीपप्रज्ज्वलन’ असा शब्द वापरला.) मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.कार्यक्रम यथातथाच झाला. मी भाषण केलं. आपलं भाषण म्हणजे नेहमी रंगणारा वीडाच! मी म्हणालो, “”बदलत्या काळात जागतिकीकरण हे वास्तव असून, त्यानुसार परिस्थिती बदलत आहे. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबीयांशी जोडून घ्यावे. स्वस्थ कुटुंबासाठी परस्परांतील संवाद गरजेचा असून, ज्येष्ठ नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.” ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांच्या आशा-आकांक्षा समजून घ्याव्यात, असंही मी म्हणालो. त्याला खूप प्रतिसाद मिळाला, असं टाळ्यांवरून तेव्हा वाटलं. (सभागृहात मुद्दाम “इको इफेक्‍ट’ची यंत्रणा लावण्यात आली होती, असं मला नंतर समजलं!)अशा रितीने दिवस छान गेला…आता झोपावे…सकाळी लवकर उठायचे असेल, तर लवकर झोपणे आवश्‍यक आहे……..

हिंदुस्थानचा बॉस कोण?

एकाच दिवशी दोन पोस्ट लिहिण्याचे खरे तर जीवावर आले होते. मात्र ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत हा लेख वाचला आणि लिहिण्याची उर्मी आवरली नाही. सध्या शिवाजीचे दिवस आहेत. त्यामुळे रजनीकांतवर सर्वच जण लिहित आहेत. संजय राऊत यांनी रजनीकांत बद्दल छान लिहिले आहे. त्यातील काही माहिती तर मलाही नवीन होती. केवळ राजबहादूर यांच्याबरोबरच नव्हे; तर बंगळूरमधील सर्वच जुन्या मित्रांशी रजनीकांत यांनी मैत्री जपली आहे. त्यांच्या या नम्रपणामुळेच लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
एकच गोष्ट! ही चूक लोकसत्तातील एका लेखातही झाली होती आणि श्री. राऊत यांच्या लेखातही झाली आहे. ‘शिवाजी’ चित्रपटात रजनीकांत ‘मी महाराष्ट्राचा हिरो’ आहे, असे कधीही म्हणत नाही. तो म्हणतो, ’नान पराशक्ती हिरो.’ (मी पराशक्तीचा हिरो आहे.) पराशक्ती हा शिवाजी गणेशन यांचा तमिळमधील ‘माईलस्टोन’ चित्रपट आहे. त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही.
दुसरे म्हणजे रजनीकांत यांच्या यशात त्याच्या मराठी असण्याचा काही संबंध नाही. आपण मराठी असल्याचे त्यांनी कधी लपविलेही नाही आणि मराठी असल्याची वृथा फुशारकीही मारलेली नाही, हे त्यांचे मोठेपण! रजनीकांत महाराष्ट्रात राहिले असते, तर त्यांना आजचे वैभव पहायला मिळाले असते का, हा खरा प्रश्न आहे.
बाकी मराठीत रजनीकांत यांच्याबद्दल मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक आहे. तो लेख येथे वाचता येईल.
http://saamana.com/2007/June/24/Link/Utsav_1.htm

शिवाजीचा पोवाडा

एक ऐतिहासिक परीक्षण
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची ग ग ग ग गऽऽऽऽऽऽ
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची, रडक्‍या चित्रपटांची
पिक्‍चर्सचा धंदा कसला हो जी जी धंदा कसला हो जी जीऽऽ
त्यात आला आता ‘बॉस शिवाजी’ हो जी जीऽऽ आला शिवाजी हो जी जीऽऽ
शाहिर ः काळा कभिन्न रजनीकांत, त्याला मानी कोणी ना कलावंत
तो गेला तमिळनाडूत, अन्‌ सुपरस्टार झाला हो जी जी झाला हो जी जीऽऽ
त्याने घेतले सोळा कोटी, त्याची चर्चा किती पराकोटी
पिक्‍चर यायची खोटी, बुकिंग फुल्ल झाली हो जी जी फुल्ल झाली हो जी जीऽऽ
त्याला बघायला ही गर्दी, त्यात होते किती दर्दी, त्यात काहींना ऍलर्जी तमिळ चित्रपटांची जी जीऽऽ
तमिळ चित्रपटांची गोष्ट, ग ग ग ग ग गऽऽऽ तमिळ चित्रपटांची गोष्ट भली आगळी, रित सारी वेगळी, तोंडे जरी काळी, कला लई भारी त्याचंच रूप शिवाजी र जी जी शिवाजी र र जी जी
शाहिर ः अरुमुगम शिवाजी एनआरआय, त्याला परदेशी पडेना चैन
द्याया गरिबांना शिक्षण, तो येई मायभूमी परतून जी र जी जी जी र जी जीऽऽ
त्यास करती विरोध कितीक, देई लाच ठायी ठाय
त्यापायी होई कफल्लक, अन्‌ मागे भीक जी र जी जी जी र जी जीऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत ग ग ग ग गंऽऽऽऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत चुटकीसरशी, करे मतलबाची पूर्ती त्याच्या ईस्टाईलने जी जी ईस्टाईलने जी जीऽऽ
शाहिर ः या स्टोरीतच त्याची लवस्टोरी, त्याला मिळे एक गोरी पोरी
तिचे साधेपण लई भारी, शिवाचीचा जीव घेई,
घेऊन सवे नातेवाईक, शिवाजी पोचे तिच्या घरी
नाना करून गंमती जमती, लग्नास करे राजी
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती ग ग ग गऽऽऽऽ
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती त्यात जाई निम्मा वेळ नंतर सारा खेळ जी सारा खेळ जी जी
शाहिर ः म्हाराजा, यानंतर येई कथेला वेग
शिवाजी’ लई जोरदार, दाखवी अंगचा प्रताप
त्याच्या स्टाईलला नाही तोड, जगावेगळी मारधाड
दुश्‍मनांना नाही पारावार, त्यांच्या उरावर शिवाजीचे वार
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप ग ग ग गऽऽऽऽ
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप साडे तीन तासांचा खेळ दाखवी ‘दि एंड’ प्रेक्षक पडती बाहेर वाजवीत शीळ हो जी वाजवीत शीळ हो जी जी हो जी जी
शाहिर ः पिक्‍चरचा डायरेक्‍टर शंकर, त्याच्या यशाची वर कमान
आता मात्र सुटला तोल, सुपरस्टार ठरे वरचढ
त्यातही काही प्रसंग, आणती सिनेमात रंग
गाणी मात्र जोरदार, त्याला रहमानची जोड
देखणा सोहळा हो जी जीऽऽ सोहळा हो जी जीऽऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल ग ग गऽऽऽ ग गऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल, चाले हाऊसफुल त्यातच त्याचे यश हो जी जीऽऽ त्याचे यश हो जी जीऽऽ

आवस वाडा होऽऽ मायऽ

आवस वाडा होऽऽ मायऽ…पिंकीच्या आय, चिंकीच्या माय…आवस वाडा होऽऽऽआमच्या लहानपणी खेडेगावात वाडा होता गं बाय! शंभरी गाठलेला; पण एखाद्या चिवट म्हाताऱ्यासारखा होता गं आय….डग म्हणत नव्हता गं. वाड्याचा दरवाजा खूप मोठा आणि त्याला एक छोटा दिंडी दरवाजा होता हां! दिंडी दरवाजातून वाड्यात दिवसभरी वर्दळ असे गं बाय… त्यावेळी आया आपल्या पोरींवर अन्‌ बापडे तरण्या पोरांवर नजर ठेवत असत गं बाय! मोठा दरवाजा वाहनांसाठी मात्र उघडला जाई. दरवाजातून आत गेलं, की ते फरशीचे मोठे अंगण दिसं ग माय. याच अंगणात माझ्या आयचं आणि शेजारणीचं कितीदा पाण्यासाठी भांडण झालं. एकदा तर तिथेच त्यांच्या भांडणात मी आयचा हात रोखायला गेले, नि आयनं हिसका दिला नि मी पडले…केवढी खोक आली मला…बाबांनी मला डॉक्‍टरकडे नेऊन मलमपट्टी केली…त्याचा खर्चही भांडण झालेल्या काकूंकडून वसूल केला हां…एवढी भांडणं होऊनही आम्ही 7-8 कुटुंबं मात्र कितीतरी वर्षं गुण्यागोविंदाने राहत होतो. वाडा तसा दोन मजलीच. याच अंगणात आमचीही मुले मनसोक्त खेळली. नंतर थांबवावी लागली त्यांची, ही बात वेगळी! मुलींनी भोंडला केला. खूपदा…त्यावेळी हीऽऽऽ गर्दी जमायची इथे…मुलींचीही अन्‌ मुलांचीही….आता नाही रायलं गं…बायका मंगळागौर-हरितालिकेचे खेळ खेळल्या. त्यांच्यात त्यावेळी किती संवाद होई! त्या संवादामुळे वाड्यातील नवरोबा मंडळीना कितीदा पगार कमी पडला हो, काय सांगायचं? पेठेतले व्यापारी तर कितीदा म्हणत, या बायकांचे सण रोज रोज का नसतात म्हणून.अंगणात आमच्या अंगतीपंगती होत. आता कुठं राहिल्या हो आता तशा पंगती. परवाच तर माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची पार्टी थ्री-स्टार हॉटेलमध्ये दिली. त्यावेळी इतकी आठवण झाली त्या पंगतीची. काय सांगू बायांनो…आमच्या पंगतीमध्ये पुरुषमंडळीही सहभागी होत. आमच्या आया मात्र घरातूनच डोकावून पाहत…घरी गेल्यावर आई विचारी हो, कशी होती त्या चिंगीच्या आईने केलेली भाजी? बरी होती ना? आपल्यासारखी नव्हती ना, वाटलंच मला…मेली कूपनचं तेल वापरते पंगतीच्या दिवशी…असं आई बोलायची गं…मी मात्र चिंगीच्याच ताटातली भाजी जास्त खात असे, हीहीहीही!आम्ही उन्हाळ्यात अंगणातच झोपत असू. मात्र बाबा न दादा रात्रभर झोपत नसत. त्यांना थंडी सहन होत नसे. आम्ही सकाळी उठलो ना, की ते खालीच झोपलेले दिसत. गणपतीत घरोघरी आरत्या आणि प्रसादांची अगदी धमाल असे. गणपतीपेक्षा आम्हीच मोदक जास्त खात असू. बघा हो बाय, काय आमच्या वाड्यात जगण्याची गंमत होती?आता कोणतरी या वाड्यात रहायला पायजे गं बाई! आता आम्ही शहरात राहतो. आमचा स्वतःचा फलॅट आहे. मुलगा स्टेटस्‌मध्ये राहतो. इकडे येणं होत नाही गं….वाड्याच्या आठवणी लिहून वेळ काढते गं बाय…त्यामुळे आता वाड्याची देखभाल करायला, लक्ष द्यायला कोणीतरी रहायला पाहिजे गं बाय….कोणीतरी लक्ष द्या गंऽऽऽ

“शिवाजी’ दिसे दिन रजनी

`शिवाजी’ रिलीज झाला आणि सर्वांची ताणलेली उत्सुकता पुन्हा पहिल्या स्थितीत आली. गेली दोन वर्षे चोहोकडे केवळ “शिवाजी’च्याच चर्चेचे साम्राज्य होते. त्यात मुख्य मुद्दा होता तो म्हणजे रजनीकांतला सोळा कोटी रुपये मानधन मिळाल्याचा. ऋतिक रोशनला अलीकडेच पाच चित्रपटांसाठी आठ ते दहा कोटी रुपये मिळाल्याच्या बातमीच्या पार्श्‍वभूमीवर हा आकडा म्हणजे अगदी “छप्परफाड’च होता. त्यामुळे याच अंगाने चित्रपटाची चर्चा झाली. जणू काही रजनीकांतला पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम मिळाली होती. सात वर्षांपूर्वी “पडैयप्पा’च्या वेळेस मी वाचले होते, की टेरिटरी हक्क आणि मानधन मिळून रजनीकांतला वीस कोटी रुपये मिळतात. सात वर्षांत त्याची किंमत घटण्याऐवजी वाढलीच आहे. मात्र सोळा कोटींचे तुणतुणे वाजविणाऱ्यांचे खरे दुखणे वेगळेच होते. त्यांच्या दृष्टीने खरे कलावंत ते बॉलिवूडचेच आणि जे काय पैसे, महत्त्व मिळणार ते त्यांनाच! त्यामुळे रजनीकांतला एवढे पैसे मिळतात म्हणून लगेच अनेकांना कंठ फुटला. मराठी प्रेक्षकांच्या दृष्टीने तर ही फारच मोठी गोष्ट होती. मराठी पडद्यावर तीस तीस वर्षे “अभिनय’ करणारे कलावंत पैसा मिळतो म्हणून हिंदी मालिकांमध्ये नोकर-चाकरांची भूमिका करताना पाहणाऱ्यांसाठी तर हा अकल्पनीय फटका होता. रजनीच्या सोळा कोटींची पराकोटीची चर्चा करणाऱ्या कुठे माहित असणार, की तो चित्रपटासाठी मानधन आधी घेत नाही. प्रत्येक चित्रपटासाठी तो फक्त एक हजार रुपये “टोकन अमाऊंट’ घेतो. त्यानंतर चित्रपटाला यश मिळाले, की वितरणाच्या हक्कांतून आपला वाटा मिळवितो. त्याच्या “मुथु’ने (1995) जपानमध्ये 35 ते चाळीस कोटींचा धंदा केला होता. म्हणजे बघा, तमिळनाडू आणि तेलुगुत तो किती कमावत असेल. जितका यशात सहभागी तितकाच अपयशातही, हा नियमही पाळणारा रजनीच! म्हणूनच “बाबा’ (2003) चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही, तेव्हा त्याने सर्व वितरकांना त्यांचे पैसे परत केले होते. (रजनीचा चित्रपट म्हणजे वितरकांनाही मोठीच रक्कम गुंतवावी लागते. “शिवाजी’च्याच बाबतीत बोलायचे, तर केरळमधील केवळ पलक्काड जिल्ह्यासाठी त्याच्या वितरणाचे हक्क सतरा कोटींना विकले गेले. आंध्रातील एका -एका भागासाठी साठ-साठ कोटींची बोली लागल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच वाचनात आल्या होत्या.)
“शिवाजी’ चित्रपटाला आलेला खर्च शंभर कोटी रुपयांच्या घरात आला असल्याचे बोलले जाते. त्यातही दम नाही. “शिवाजी’चा निर्देशक शंकर आहे. शंकर हा खर्चिक, भव्य आणि फॅंटसीमय चित्रीकरणासाठी आणि सामाजिक महत्त्वाच्या मुद्यांवर व्यावसायिक चित्रपट काढणारा प्रतिभावान निर्देशक म्हणून ओळखला जातो. “जंटलमन’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून त्याने स्वतःची आगळी ओळख उभी केलेली आहे. भारतीय चित्रपटांना संगणकीय करामतींची ओळख शंकरच्याच “कादलन’ (1994-हिंदीतील “हमसे है मुकाबला’) या चित्रपटातून झाली. त्यानंतर कमल हासनला वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाच्या वेशभूषेत त्यानेच सादर केले होते. “इंदियन’ (1996-हिंदीतील “हिंदुस्तानी’) नावाच्या या चित्रपटात कमल हासन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट झाल्याचे एक “स्पेशल इफेक्‍ट’चे दृश्‍य होतेच. त्यानंतर “जीन्स” (1998) या त्याच्या चित्रपटात एका गाण्याचे चित्रीकरण जगाच्या सात आश्‍चर्यांच्या पार्श्‍वभूमीवर करून त्याने खळबळ उडवून दिली. “मुदलवन’ (1999-हिंदीत “नायक’ (2002)) हाही चित्रपट त्यावेळचा “बिग बजेट’ चित्रपटच होता. “शिवाजी’च्या अगोदरचा शंकरचा लेटेस्ट चित्रपट म्हणजे “अन्नियन’ (2005-हिंदीत अपरिचित). हा चित्रपट अठरा कोटींच्या खर्चाने काढला होता. या चित्रपटात तर त्याने संगणकीय करामतींची बरसातच केलेली! “ब्लॉकबस्टर’ म्हणून समाविष्ट झालेला हा चित्रपट फ्रेंच भाषेत डब झालेला एकमेव भारतीय चित्रपट आहे.
“शिवाजी’ची आणखी एक खासियत म्हणजे त्याला संगीत ए. आर. रहमानचे आहे. रजनीच्या चित्रपटाला संगीत देणे म्हणजे एक मोठी सन्मान असल्याचे तमिळ चित्रपटसृष्टीत मानले जाते. रहमानला “95 सालीच “मुथु” आणि त्यानंतर “99 साली “पडैयप्पा’ व नंतर “बाबा’मधून ही संधी मिळाली. मात्र “चंद्रमुखी’ (2050) या रजनीच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटाला संगीत विद्यासागरचे होते. त्यामुळे “शिवाजी’साठी त्याला पुन्हा संधी मिळणे, ही त्याचे तमिळ चित्रपटसृष्टीतील पुनरागमन मानले जाते. दक्षिण भारतीय चित्रपटांतील (खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीतीलच) तीन बडी नावे एकत्र आल्याने “शिवाजी’ची बाजी मोठी झाली. मात्र या तिघांच्याही विशिष्ट कर्तृत्वाबाबत माहिती नसणारी माणसंच त्यांच्याबाबत बोलत असल्याने “कोटी’चीच बात मोठी झाली. नही सुवर्णे ध्वनीस्तादृक यादृक कांस्ये प्रजायते…
आता “शिवाजी’च्या कथेबाबत…तमिळ चित्रपटांमध्ये ज्यांनी रजनीकांत पाहिला आहे, त्यांना रजनीच्या चित्रपटात कथा कितपत महत्त्वाची असते, हेही माहित असतं. प्रसिद्ध क्रिकेटपटू डब्लू. जी. ग्रेस यांचा एक किस्सा आहे…ग्रेस हे मैदानावरील त्यांच्या दांडगाईबद्दल प्रसिद्ध होते. एकदा ते फलंदाजीसाठी मैदानावर उतरले असताना लवकरच बाद झाले. पंचांनी ग्रेस यांना बाद दिल्याचा इशारा केला, मात्र ग्रेस जागेवरून हटले नाहीत. त्यावेळी पंच म्हणाले, “”तू बाद आहेस, मी निर्णय दिला आहे.” त्यावर ग्रेस म्हणाले, “”तो निर्णय मागे घे. हे लोकं (प्रेक्षक) माझी फलंदाजी पहायला आहे आहेत, तुझे निर्णय पहायला नाही.” रजनीच्या चित्रपटांची “कथा’ वेगळी नाही…रजनी म्हणजे हवेत सिगारेटी फेकून तोंडात झेलणारा व मरतानाही ती तोंडातून न काढता (गिरफ्तार), बंदुकीच्या गोळीमागे पळणारा (त्यागी) किंवा तत्सम माकडचेष्टा करणारा अभिनेता (?) असे काही चित्रपटरसिक मानतात. “प्रागैतिहासिक’ किंवा “अश्‍मयुगातील’ चित्रपट पाहून त्यावर मते बनविणारी ही मंडळी असतात. रजनी म्हणजे स्टाईल, हे कितीही खरं असलं तरी असं म्हणतात, की “Rajni don’t do thing stylishly, but what he does becomes style.’ रजनीकांत याच्या चित्रपटाबाबत एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास असं म्हणता येईल, “पूर्ण मनोरंजन.’ साठ-साठ वर्षांच्या म्हाताऱ्या चार चार तास रांगेत उभं राहून चित्रपटाचं तिकिट काढतायत, असं दृश्‍य एरवी दिसत नाही अन्‌ ते रजनीकांतच्या चित्रपटालाच दिसते याचं कारण हे आहे. रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटात थोडीसा कौटुंबिक, थोडासा हास्याचा, थोडासा मारामारी आणि त्याची नेहमीची “स्टाईल’, हा सर्वच मसाला भरलेला असतो. त्यामुळेच त्याच्या चित्रपटात पूरेपूर मनोरंजन मिळणार, याची खूणगाठ मनाशी बांधूनच, तसा विश्‍वास मनी बाळगूनच प्रत्येक प्रेक्षक त्याच्या चित्रपटाला जातात, हे त्याच्या प्रदीर्घ यशाचं कारण आहे. अन्‌ त्याहूनही महत्त्वाचं, मोठं कारण म्हणजे….
त्या विश्‍वासाला क्‍वचितच तडा जातो…!

शोधू कुठे मी “शिवाजी

आता काय करावे, कुठे जावे…काय वाचावे…काही सुचत नाहीये! सकाळपासून तीन पेप्रं वाचून झाली…आठ चॅनेल रिमोटवर फिरवून झाले. त्यातील सर्व जाहिराती आणि अधून-मधून बातम्याही पाहिल्या…अनेकांना विचारले, “”तुम्ही पाहिले का?” सर्वांनी नकारार्थी माना वेळावल्या. असं घडलंच कसं?
मुंगीने मेरुपर्वत तर गिळला नाही ना…
एक्‍सप्रेस रेल्वे वेळेवर तर धावली नाही ना…
“पीएमटी’ रिकामी येऊन स्टॉपवर योग्य जागी तर थांबली नाही ना…
नाही ना?? मग हे सर्व सुरळीत होत असताना असं का व्हावं…?
माझी प्राणप्रिय बातमी आज का छापून आली नाही…गेल्या वर्षीपासून पेप्रांमध्ये वाचतोय…त्यातही रजनीकांतचे जुने फोटोच पाहतोय…”शिवाजी’ येतोय…”शिवाजी’ येतोय…कालपर्यंत तर येत होत्या बातम्या…आता का नाही आल्या…पहिल्यांदा वाचलं होतं…रजनीकांतला सोळा कोटींची बिदागी मिळालीय…मला किती पराकोटीचा आनंद झाला…त्यानंतर कितीदा तरी कोटी म्हणजे किती शून्ये, याचा अंदाज घेत होतो…त्यानंतर काही दिवस तर काहीच छापून आलं नाही…
मात्र तेव्हा “शिवाजी’च्या बातम्यांची सवय नव्हती, त्यामुळे फारसे चुकल्यासारखे वाटत नव्हते. त्यानंतर वाहिन्यांवर रजनीच्या चाहत्यांची हलती चित्रे दिसू लागली. तेव्हा मला त्याचा लळाच लागला ना! नंतर मीही “शिवाजी शिवाजी’ करायला लागलो. मला आपलं वाटलं रजनीकांतनं शिवाजी महाराजांचं कामच केलंय.. महाराजांवर महाराष्ट्राचा कॉपीराईटच ना! त्यामुळे दुसरं कोणी त्यांचं नाव वापरू शकतं, ही कल्पनाच नाही! हवेत तलवार फेकून महाराज गनीमांना “हातोहात’ लोळवतायेत, अशी दृश्‍येही मला दिसू लागली. गेल्या महिन्यांपासून मात्र चोहीकडे “शिवाजी’ न्‌ “शिवाजी’च दिसू लागले. मला तर काय करावे न्‌ काय करू नये, असं झालं.
तेव्हाच कळालं रजनीकांत “शिवाजी’ आहे मात्र “शिवाजी’ नाही…. म्हणजे झालं काय, का मित्रांसोबत बोलताना आपण सोळा कोटींचीच बात काढली ना (एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या फक्त पैशाबद्दलच दिलखुलास बोलतो), तर कोणीतरी म्हणालं, की तो मराठी आहे…हे आणखी काही विपरीतच. तमिळ, म्हणजे एकूणच मराठी आणि हिंदी सोडले तर आपल्याला सगळे हिरो “कोंगाडी’च…नाही म्हणायला तो आपल्या अमिताभच्या काही पिच्चरमध्ये दिसला होता, पण “अमिताभ के सामने रजनीकांत की क्‍या औकात…’ इंटरनेटवर त्याच्या स्टाईलबद्दलचे जोक फॉरवर्ड करण्यापुरते त्याचा फार फार तर संबंध! सांगायचं म्हणजे काळ्या काळ्या ढूऽऽसमधला एक, आपण नेहमी टिंगल करतो तो कोंगाडी हिरो मराठी आहे, तो तिकडे एवढा पैसा कमावतो म्हटल्यावर माझ्या तर पोटातच ढवळायला लागलं. अन्‌ त्याचं नाव शिवाजी गायकवाड आहे म्हटल्यावर तर एवढा हेवा वाटला…आयला, आपण एवढे गोरे, अर्धवट हिंदी बोलणारे अन्‌ इथं खितपत पडलोय. तो तिकडे खऱ्याने पैसा ओढतोय.
गेल्या महिन्यापासून तर बाबा “शिवाजी’बाबत खूपच ऐकायला आलं…त्यात पुन्हा सोळा कोटींचीच बात होती. आणखीही काही बाता होत्या. आमच्या दोस्त तर ते तमिळनाडूतील रसिक पाहून “खी खी’ हसायलाच लागले. त्यांना कळेचना हे खूळ म्हणायचं का वेड? इकडं मी टीव्ही आणि पेपरमध्ये रोज “शिवाजी’च्या बातम्या वाचत होतो. औरंगजेबाने “शिवाजी’वर ठेवली नसती अशी पाळत मी “शिवाजी’च्या बातम्यांवर ठेवली होती. चॅनेल आणि टीव्हीच्या सौजन्याने मलाही रोज काहीतरी खुराक मिळत होता. पण मला एक कळत नव्हतं, रजनीसाठी एवढी किंमत मोजायला त्याच्या मागच्या पिच्चरमध्ये असं काय होतं? त्याबाबत मात्र कोणीही बोलत नव्हतं. मी मात्र रोज बातम्या वाचायचो. मजा यायची. इतकं की, “इट शिवाजी, स्लीप शिवाजी’ अशी माझी अवस्था झाली. रोज बातम्या, रोज आलटून पालटून फोटो…
माझा एक मित्र होता. तो रजनीकांतला रजनी म्हणायचा…त्याच्या पिच्चरच्या गमती सांगायचा…आम्ही त्याला हसायचो. त्यातच काल ती बातमी आली…”शिवाजी’ची दोन आठवड्यांची तिकिटे विकली गेली आहेत. इतकं बरं वाटलं. आता तर चॅनेल आणि बातम्यांचा पाऊस सुरू झाला म्हणा ना…रजनीकांत असा आणि रजनीकांत तसा…रजनीकांत आणि अमिताभ…रजनीकांत आणि त्याचे मानधन…रजनीकांत आणि त्याची स्टाईल…अशा कितीतरी बातम्या, रिपोर्ट…एका चॅनेलवर तर “आय ऍम रजनीकांत’ नावाची स्पर्धाच सुरू केली होती…मलाही त्यात भाग घ्यावासा वाटला…असं सगळं छान छान “शिवाजी’चे “रजनी साम्राज्य’ स्थापित झाले होते. काल तो पिच्चरही रिलीज झाला….अन्‌ आज? आज मात्र कोणीही बातमी देत नाहीये…
अरे झालं काय…दोन वर्षांपूर्वीसारखं पुन्हा रजनीकांत गायब? मग आम्ही काय करायचं? आता कुठं माहिती घ्यायची? कुठं जाऊ? कुठं माझी तल्लफ भागवू? आता टक्कल पडलेल्या रजनीकांतचे फोटो कुठं पहायचे? त्याच्या पिच्चरसाठी आलेल्या खर्चाची चर्चा कुठं करायची? हा अन्याय आहे. दररोज “शिवाजी’ची एकतरी बातमी वाचली किंवा ऐकली पाहिजे.
मग एकच बातमी रोज छापली तरी चालेल!!!

संयुक्त द्विभाषिक अमेरिका?

हा माझा दोन वर्षांपूर्वीचा लेख आहे. त्यावेळी ‘सकाळ’च्या ‘लक्षवेधी’ सदरात तो छापून आला होता. आता त्यात काही सुधारणा करायच्या आहेल. त्या मी करेनच. तोपर्यंत ही सेवा रुजू करून घ्यावी.
अमेरिकन संस्कृतीचा डंका जगभर वाजत असताना व त्यामुळे जगभरातील मूळ भाषांच्या अस्तित्वावर गदा येत असताना, खुद्द अमेरिकेत मात्र द्विभाषिक व्यवस्थेचे पडघम वाजू लागले आहेत. शेजारच्या कॅनडाप्रमाणेच अमेरिकेतही इंग्रजीसह अन्य एका भाषेला व्यवहारभाषा म्हणून मान्यता मिळायची चिन्हे आहेत. ही दुसरी भाषा असणार आहे स्पॅनिश. सध्याच अमेरिकन जनतेला विमानांचे आरक्षण करताना, व्यवसायासाठी दूरध्वनीचा वापर करताना किंवा बॅंकेत व्यवहार करताना अनेक पर्यांयापैकी एका भाषेची निवड करावी लागत आहे. “हिस्पॅनिक लोकांची संख्या वाढण्यापूर्वी आम्हाला अशा गैरसोयीला तोंड द्यावे लागत नव्हते,’ अशी तक्रार अमेरिकन जनता करू लागली आहे. दक्षिण अमेरिकेतील स्पॅनिश भाषक निर्वासित मोठ्या संख्येने अमेरिकेत स्थलांतर करत असतात. त्यांच्यामुळे स्पॅनिश भाषकांची संख्या नजीकच्या काळात इंग्रजी भाषकांच्या संख्येला ओलांडून जाण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. हा धोका इंग्रजी भाषकांनी एवढ्या गांभीर्याने घेतला आहे, की “यू. एस. इंग्लिश’ या नावाची संघटनाच स्थापन करण्यात आली आहे. इंग्रजीला अमेरिकेची राष्ट्रीय भाषा जाहीर करावे, अशी या संघटनेची मागणी आहे. अमेरिकेची एकात्मता टिकविण्यासाठी हे आवश्‍यक आहे, असे या पक्षाच्या लोकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षी अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान जॉर्ज डब्लू. बुश यांनी हिस्पॅनिक समूहात प्रचार करताना अनेकदा स्पॅनिशमध्ये बोलण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचे मुख्य स्पर्धक जॉन केरी यांनीही तोच मार्ग चोखाळला होता. अमेरिकेच्या आजूबाजूला स्पॅनिश भाषक देशांची मोठी संख्या आहे. तिथून सातत्याने निर्वासित येत असल्याने, त्या भाषेला “मरण’ नाही, असे भाषातज्ज्ञांचे मत आहे. अमेरिकेच्या जनगणना खात्याने मार्च महिन्यात प्रसिद्ध केलेल्या अंदाजानुसारही, 2050 सालापर्यंत देशात हिस्पॅनिक-अमेरिकन वंशाच्या लोकांची संख्या तिपटीने वाढण्याची शक्‍यता आहे. या वंशाच्या लोकांची संख्या सध्या 3 कोटी 60 लाख आहे, ती 10 कोटी 30 लाख होईल. लोकसंख्येत त्यांचा वाटा 24.4 टक्के असेल, असे या खात्याने म्हटले आहे. मूळ अमेरिकनांचा वाटा सध्या 69.4 टक्के आहे, तो 2050 मध्ये 50.1 टक्‍क्‍यांपर्यंत खाली येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे पुढील शतकात अमेरिकेत जाण्यासाठी TOFEL प्रमाणेच TOSFL परीक्षा द्यावी लागल्यास नवल नाही.

सुसंस्कृत ऋणानुबंधांची इतिश्री!

दूरचित्रवाणी वाहिन्यांनी लोकांच्या मनावर राज्य करण्यापूर्वीच्या काळात नभोवाणी केंद्रांच्या कार्यक्रमांची जगावर सत्ता होती. शीतयुद्धाच्या काळात तर विविध देशांच्या नभोवाणी केंद्रांचीच चलती होती. त्यात एक केंद्र आहे “डॉइट्‌शे वेले’ या संस्थेचे. आधी पश्‍चिम जर्मनीच्या व नंतर एकीकृत जर्मनीच्या सरकारचे प्रचाराचे साधन असणाऱ्या या केंद्राचे भारताशी विशेष नाते होते व आहे. त्यामुळेच या केंद्राला मिळणाऱ्या श्रोत्यांच्या पत्रांमध्ये, कित्येक वर्षे भारतातून येणाऱ्या पत्रांची संख्या सर्वाधिक होती. “डॉइट्‌शे वेले’ याचा अर्थ होतो “जर्मन तरंग.’ मॅक्‍समुल्लर आणि गोएथेच्या परंपरेला जागून या केंद्रावर गेल्या वर्षीपर्यंत संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण होत होते. “आकाशवाणी’व्यतिरिक्त नियमितपणे संस्कृतमधून कार्यक्रम प्रसारित करणारे ते जगातील एकमेव आकाशवाणी केंद्र होते. दर पंधरवड्याला सोमवारी संस्कृतमधून सादर होणाऱ्या या कार्यक्रमात जर्मनीतील संस्कृतविषयक घडामोडींची चांगली माहिती मिळत असे. या केंद्राचे हिंदीतील कार्यक्रम दररोज 45 मिनिटे प्रसारित करण्यात येतात, त्यातील 15 मिनिटे संस्कृतच्या वाट्याला येत असत. पूर्व आणि पश्‍चिम जर्मनीच्या एकत्रीकरणानंतर, जर्मनीचा रोख युरोपच्या एकत्रीकरणाकडे वळला. त्यानुसार या केंद्रावरूनही केवळ जर्मनीऐवजी संपूर्ण युरोपमधील घडामोडींची माहिती देण्यात येऊ लागली. त्यामुळेच जगभरच्या संस्कृतप्रेमींना विविध विद्यापीठांमध्ये चालणारे संशोधन, विविध चर्चासत्रे आदींची माहिती मिळत असे. नव्या व्यापारी प्रसारणाच्या काळात हे कार्यक्रम चालू ठेवणे “डॉइट्‌शे वेले’ला परवडेनासे झाले आहे. त्यामुळेच या केंद्राने आपले हिंदीतील प्रसारण चालू ठेवले आहे; मात्र संस्कृतमधील कार्यक्रम थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. “डॉइट्‌शे वेले’च्या हिंदी प्रसारणास सुरवात झाली 15 ऑगस्ट 1964 रोजी. त्यानंतर 3 फेब्रुवारी 1966 रोजी या केंद्रावरून संस्कृत कार्यक्रमांचे प्रसारण सुरू झाले. “आकाशवाणी’ची “सिग्निचर ट्यून’ बनविणाऱ्या अर्न्स्ट शाफर यांच्या प्रयत्नातून ते साध्य झाले होते. जगात त्या वेळी संस्कृतमधून कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एकही नभोवाणी केंद्र नव्हते. या विषयावर भारतीय संसदेत जोरदार चर्चा झाली. सरकारवर टीका झाली. त्यानंतर “आकाशवाणी’वरून संस्कृतमधून बातम्या सादर करण्यात येऊ लागल्या. “डॉइट्‌शे वेले’च्या या उपक्रमाचे भारतात भरघोस स्वागत झाले. देशातील 20 हून अधिक वर्तमानपत्रांनी या घटनेचे स्वागत केले. अलाहाबाद येथे झालेल्या जागतिक हिंदू परिषदेत “डॉइट्‌शे वेले’च्या अभिनंदनाचा खास ठराव संमत करण्यात आला. नंतरच्या काळात भारतात वाढत गेलेल्या “मॅक्‍स मुल्लर भवन’ आणि “गोएथे इन्स्टिट्यूट’चा पाया या केंद्राने घातला. आजही जोमाने चालू असलेल्या या केंद्रांवरील संस्कृत “वाणी’ नाहीशी झाल्याने मात्र सुमारे चार दशकांच्या सु”संस्कृत’ ऋणानुबंधांची इतिश्री झाली आहे.

संस्कृत ते ब्राझील-एक मजेदार प्रवास

संस्कृत आणि ब्राझीलचा संबंध असू शकतो का? जगाच्या नकाशाची थोडीशीही कल्पना ज्याला आहे, त्याला या दोघांचा संबंध असल्याचे सांगितले, तर हसू नाही का येणार? अगदीच संस्कृतमध्ये सांगायचे, तर तो बादरायण संबंध असणार नाही का? मलाही असेच हसू आले होते. मात्र एरिक पॅर्ट्रिज यांच्या “संस्कृत टू ब्राझील ः विग्नटस्‌ अँड एस्सेज ऑन लॅंग्वेजेस’ या पुस्तकात हा संबंध ज्या प्रकारे दाखविला आहे, त्यावरून संशयाला जागा राहत नाही. आपण भले कितीही म्हणू, संस्कृत सर्व भाषांची जननी आहे वगैरै…मात्र त्याचा खरा पुरावा अशा उदाहरणांतूनच िदसतो.एरिक साहेबांच्या मते, संस्कृत आणि ब्राझीलचा संबंध जोडण्यास कारणीभूत आहे “भा’ हा धातू. आपल्याकडे भास्कर किंवा प्रभाकर यांसारख्या शब्दांतून “भा’हा धातू प्रामुख्याने वापरात आहे. त्याचा अर्थ आहे प्रकाशणे, चकाकणे. संस्कृत आणि युरोपीय भाषांचे सख्य तर जगप्रसिद्धच आहे. त्यामुळे “भा’ धातूवरून प्राचीन फ्रेंच भाषेत एक शब्द निर्माण झाला “ब्रेज,’ (braise) त्याचा अर्थ आहे जळणारा कोळसा. याच शब्दाचे इंग्रजीत एक रूप बनले “ब्रेझ’ (braze). युरोपीय दंतकथांमध्ये “ब्राझील’ या नावाने एक देश असून, उत्तर अंटार्क्‍टिकावरील या काल्पनिक देशात “ब्राझीलवूड’ नावाचे लाकूड मोठ्या प्रमाणात मिळते, अशी कल्पना होती. आता या लाकडाला “ब्राझीलवूड’ का म्हणायचे, तर या लाकडाचा रंग जळत्या कोळशासारखा असतो. पोर्तुगीज दर्यावदी जेव्हा ब्राझीलमध्ये पोचले, तेव्हा त्यांना तेथे असे जळत्या कोळशाच्या रंगाची अनेक झाडे आढळली. त्यामुळे त्यांनी त्या प्रदेशाला ब्राझील हेच नाव दिले.कोलंबस व त्याच्या सहकाऱ्यांनी भारतीय माणसं समजून अमेरिकेतील आदिवासींना ज्याप्रमाणे रेड इंडियन्स म्हणायला सुरवात केली, त्याच धर्तीचे कृत्य होतं हे. मात्र काही का असेना, जागाच्या पाठीवर संस्कृत कुठे ना कुठे, कोण्या ना कोण्या रुपात आहे एवढं नक्की!

गिरीश कर्नाड यांच्या कृती आता मराठीतही!

प्रसिद्ध कन्नड नाटककार आणि अभिनेते गिरीश कर्नाड यांनी लिहिलेली दहा नाट्के मराठी प्रेक्षकांसमोर येत आहेत. पॉप्युलर प्रकाशनार्फे ही नाट्के प्रकाशित होणार आहेत. यातील दोन नाट्के एकांकिका असून, ही सर्व नाट्के कर्नाड यांच्या प्रारंभीच्या कृतींपैकी आहेत.
मोठ्या संख्येने असलेल्या वाचकांपर्यंत पोचणे, हा कोणत्याही लेखकासाठी सुखाचा अनुभव असतो, असे मत यानिमित्ताने श्री. कर्नाड यांनी व्यक्त केले. मात्र त्याचवेळेस एखादी कलाकृती भाषांतरीत होत असताना त्यातील काही आस्वाद्य अंश कमी होतो, हेही त्यांनी मान्य केले.
श्री. कर्नाड यांना स्वतःला मराठी उत्तम वाचता व लिहिता येते. त्यामुळेच कन्नडमधून मराठीत येताना त्यांना कमी खळ पोचेल, असे त्यांना वाटते. “मराठी ही कन्नडचीच भाषाभगिनी आहे. त्यामुळे मूळ कृतीतील बहुतांश सौंदर्य त्यात कायम राहते, असे माझे मत आहे. अन्य द्राविड भाषांमध्ये भाषांतर होत असताना ही उणीव अधिक जाणवते. मात्र इंग्रजीत भाषांतर होत असताना ती त्याहूनही अधिक असते,” असे ते म्हणतात.
गिरीश कर्नाड यांचे नाव माहित वसेल, असा नाट्यर्सिक निरळा! आधुनिक भारतीय रंगभूमीवर प्रयोगशीलता, नाविन्य, वैचारिकता आणि वैविध्य या वैशिष्ट्यांनी उठून दिसणारी जी व्यक्तिमत्वे आहेत, त्यांमध्ये श्री. कर्नाड यांचे नाव अग्रणी आहे. मराठी प्रेक्षकांसाठीही श्री. कर्नाड यांचे नाव नवे नाही. त्यांच्या ’तुघलक’ आणि ’नागमंडल’ सारख्या नाट्कांवर एक संपूर्ण पिढी पोसलेली आहे. मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून त्यांनी केलेला संवाद, महाराष्ट्र-कर्नाटक वादाला काही काळ तरी विस्मरणात ढकलणारा ठरला होता. लेखकाला राजकीय सीमांचे बंधन नसते, हे दाखवून देणारे गिरीश कर्नाड आता थेट मराठी वाचकांच्या भेटीला येत आहेत.