
हा हल्ला नव्हे, युद्धच

म्हणजे बघा, की आताआतापर्यंत काय व्हायचं की कुठेतरी एखादा फटाका उडावा तसा बॉंब फुटायचा अन लगेच सगळीकडे बोंबाबोंब व्हायची. पोलिस कुठेतरी एक-दोघांना उचलायचे. ते नेमके मुस्लिम निघाल्याने पुढील कारवाई काय करायची याची चिंता सरकारला लागायची. (जे बॉंब फोडल्याशिवाय जागचे सरकत नाही, ते सरकार अशी सरकारची अलिकडची व्याख्या आहे.) मग सरकार हिंदु आणि तत्सम बुळबुळीत धर्मीयांना शांतता आणि सलोखा बाळगण्याचा शहजोग सल्ला द्यायचे.
आता मात्र ती परिस्थिती पालटली. आता हिंदुंचे स्वतःचे दहशतवादी तयार झाले आहेत. आता हे पहिल्या पिढीचे दहशतवादी असल्याने फक्त सायकल किंवा मोटारसायकलींचे तुकडे करणे, एक दोन लोकं मारणे असे किरकोळ प्रकार चालू आहेत. थोड्याच काळात मात्र आपल्या या अतिरेकी बंधुंच्या कौशल्यात बऱयापैकी सुधारणा होणार आणि फुल फ्लेज्ड् दहशतवादी कारवाया करण्यासाठी ते सराईत होतील याची आम्हाला शंका नाही.
बाकी हिंदु दहशतवाद्यांची उपद्रवक्षमता काहीशी वादग्रस्त असली तरी त्यांची दखल मात्र अगदी व्यावसायिक दहशतवाद्यांसारखी घेतली जात आहे. आता हेच बघा ना, कोणत्याही घटनेत एखाद्या संशयिताला पकडला, की कशा त्यांच्या शेजाऱयांच्या नाही हो, आम्हाला कधी वाटलंच नाही तो असं काही करत असेल म्हणून, या छापाच्या बातम्या येतात. तो संशयित शाळेत असताना कसा कुशाग्र विद्यार्थी होता, सोसायटीत सगळ्यांना मदत करायचा वगैरै कहाण्या येऊ लागतात. आपल्या हिंदु अतिरेकींबाबतच्या अशा अनेक कथा येऊ लागल्या आहेत. म्हणजे काय, भर रस्त्यातून येता जाता तो ओरडून सांगायचा की मी अतिरेकी आहे, मी अतिरेकी आहे असं अजूनतरी कोणी म्हणालेले नाही, याचा अर्थ आपले अतिरेकी योग्य मार्गावरून जात आहेत.
हिंदु लोकांनी असेच नवनवीन बॉम्बस्फोट घडवून आणले, की मग त्यांनाही आपले खरे जीवन दहा अकरा शतकांपूर्वीच्या कल्पनांनुसार चालवायला हवे, असा साक्षात्कार होईल. पुराणातील कायदे हेच जगाचा उद्धार करू शकतील, हे दाखवून देण्यासाठी हिंदु अतिरेकीही वेबसाईट, ब्लॉग अशा अत्याधुनिक साधनांचा वापर करू लागतील. त्यांचा उद्देश माणसं मारण्याचा नव्हता तर ते गरीब आहेत आणि नोकरी धंदा नसल्याने टाईमपास म्हणून त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगायला अनेक राजकारणी पुढे येऊ लागतील. मग आधी मुळात दहशतवाद्यांना पकडू न शकलेले आणि पकडलेल्यांना शिक्षा न देऊ शकलेले सरकार लोकांना (म्हणजे स्फोटात मरणे शक्य न झालेल्यांना) शांतता पाळण्याचे आवाहन करू शकेल. त्यामुळेच म्हणा, गर्व से कहो अतिरेकी है.
पत्रकारितेत सहा वर्षे घालविल्यानंतरही त्यामुळेच कधी दिवाळी अंकांच्या वाटेला जायचे धाडसच झाले नाही. मात्र काही सहकाऱयांना दसरा उलटला की अगदी सुगीचे दिवस आल्याचा आनंद व्हायचा. “यंदा अकरा अंकांमध्ये हजेरी आहे आपली,” भविष्यापासून पुराणकालीन संस्कृतीपर्यंत तलवारीप्रमाणे सपासप लेखणी चालविणाऱया एका सहकाऱयांनी टाळीसाठी हात पुढे करत सांगितले होते. माध्यमांत पहिलेच वर्ष असल्याने रिकामे बसून अनेक कामे लिलया करणारी अनेक माणसे प्रत्येक संस्थेत वारत असतात, याची तेव्हा जाणीव नव्हती. त्यामुळे त्या सहकाऱयाच्या वाक्याला माझी दाद टाळीच्या स्वरूपात नव्हे तर त्यांना टाळायच्या स्वरुपात होते. मात्र अशा पद्धतीने एका अंकात ‘मी आणि माझा देव’, दुसऱया अंकात ‘एक दुर्लक्षित स्थानः मौजे टुकारवाडी’, तिसऱया अंकात ‘राष्ट्रीय एकात्मता आणि महिला मंडळांचे कार्य’ अशा नाना रितीने मजकूर पाडणाऱया लेखकांकडे भुईनळ्यांकडे पहावे तितक्याच अंचब्याने पाहतो.
गेल्या वर्षी एका दिवाळी अंकात लेख लिहिला होता. दौंड तालुक्यात प्रसिद्ध होणाऱया एका गावप्रसिद्ध (जगप्रसिद्धच्या धर्तीवर) अंकाच्या संपादकांनी अत्यंत प्रेमाने तो मागितला. माझ्याही खिशाची तब्येत तेव्हा अशीच होती, की अशा प्रकारचा कोणताही डोस त्याला चालला असता. सुपरस्टार चिरंजीवीवर लिहिलेला एक लेख मी त्या अंकात खपवला. त्या अंकाचा सगळाच प्रकार हौशी मामला असल्याने त्यात काही चुकीचे आहे असे वाटत नाही. तरीही मानधनाची रक्कम आणि लेख छापलेला अंक मला त्यावेळी मिळाला, ही त्या हौशी प्रकाशकाची व्यावसायिकता कौतुकास्पदच म्हटली पाहिजेत. कारण ‘लोकमत समाचार’ या हिंदी वर्तमानपत्राला कविता पाठविल्या होत्या तेव्हा मार्चमध्ये छापलेल्या कवितांचे मानधन (तब्बल रु. १५) मे महिन्यात मिळाले होते. पाठविलेल्या पाच कवितांपैकी नक्की कोणत्या कविता छापल्या होत्या हे मला आज बारा वर्षांनीही माहित नाही.
आता हे सांगायचं कारण म्हणजे, यंदाच्या दिवाळीत आमच्या ह्या ‘अनाघ्रात पुष्प’ अशा प्रतिभेला ऑनलाईन पंख फुटले. खऱया अर्थाने चर्चा आणि वाद करत ज्ञानाची आराधना करणाऱया ‘उपक्रम‘ या संकेतस्थळाच्या पहिल्या दिवाळी अंकात माझा लेख प्रसिद्ध झाला. भाषा आणि तंत्रज्ञान हे माझे जिव्हाळ्याचे दोन विषय. (या लेखाचे १०० हून अधिक वाचने झाल्याचे दिसते त्यावरून लोकांनाही तो भावला असावा, अशी आशा आहे.) या दोन्ही विषयांची गुंफण असणारा एक लेख लिहिला कारण या विषयावर मराठीत एकही बातमी किंवा लेख मी वाचला नव्हता. त्यामुळे गेल्या वर्षभरात बातम्यांच्या निमित्ताने मिळालेल्या माहितीच्या आधारे लेख लिहिला. विशेष म्हणजे ‘उपक्रम’च्या संपादक मंडळानेही तो प्रकाशित करण्याच्या लायकीचे मानले.