संत्रस्त अहमदियांची कैफियत

साहित्य संमेलनातील पुस्तकांच्या दालनात अहमदिया पंथाच्या स्टॉलवर आम्ही जरा रेंगाळलो. मुस्लिमांमधील एक पंथ असलेल्या  अहमदियांना पाकिस्तानात धर्मबाह्य म्हणून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांचा तिथे अतोनात छळ होतो. मुस्लिमांची प्रार्थनास्थळे वापरण्यासही त्यांना मज्जाव करण्यात आला आहे. एकवेळ हिंदू चालतील परंतु अहमदिया नकोत, असा तिथे दंडक आहे. एवढे वाचून-ऐकून माहीत होते. मात्र प्रत्यक्ष अहमदियांना त्याची कारणे विचारण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. ती संधी इथे मिळाली.
जगातील बहुसंख्य धर्मांच्या बहुतेक पंथांप्रमाणे अहमदिया पंथाचा जन्मही भारतातलाच. पंजाबातील लुधियाना येथे त्यांचे मुख्यालय आहे. मुस्लिम धर्मियांच्या मान्यतेप्रमाणे मुहम्मद पैगंबर हे जगातील शेवटचे प्रेषित होत. त्यांच्यानंतर कोणीही स्वतःला प्रेषित म्हणवून घेऊ शकत नाहीत. मात्र पैगंबरांच्या शिकवणीचा ग्रंथ असलेल्या हदीसमध्ये असे उल्लेख आहेत, की त्यांच्यानंतरही या जगात प्रेषित येतील. हे प्रेषित कधी येतील आणि त्यांची लक्षणे काय असतील, हेही हदीसमध्ये दिलेले आहे. त्यानुसार 19व्या शतकाच्या उत्तरार्धात पंजाबात जन्मलेले मिर्झा गुलाम अहमद कादियानी हे नव्या काळातील प्रेषित होत, अशी अहमदियांची मान्यता आहे. आज भारतात सुमारे 2 लाख अहमदिया पंथीय असून सुन्नी पंथाचा ते भाग आहेत.
या मुलभूत फरकामुळे मुस्लिमांच्या अन्य पंथातील अनुयायी अहमदियांना धर्मभ्रष्ट मानतात. स्टॉलवर असलेल्या व्यक्तींचा मात्र दावा होता, की अहमदिया पंथ हा शांती आणि सहजीवनासाठी प्रयत्नशील असलेला धर्म आहे. उस्मानाबादचे डॉ. बशरत अहमत यांचीही याच स्टॉलवर भेट झाली.
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पवित्र पैगंबर हजरत मुहम्मद यांना अल्लाहने मुसलमानांवर येणाऱ्या परिस्थितीची माहिती पूर्वीच दिली होती. त्यापैकी एक भविष्यवाणी अशी होती, की मुसलमानांच्या मनातून ईश्वरीय निष्ठा निघून जाईल. ते मुसलमान म्हणून ओळखले गेले तरीही त्यांच्यात ईश्वरीय निष्ठेचा प्रकाश राहणार नाही. जेव्हा मुसलमानांची ईश्वरीय निष्ठा सुरैयावर (कृतिका नक्षत्राचा पुंजका) जाईल म्हणजेच ईश्वरीय निष्ठा मनातून फार दूरवर गेली असेल तेव्हा फारसी लोकांमधील एक व्यक्ती ती परत आणेल.
मिर्झा गुलाम अहमद कादियानी यांनी 1891 मध्ये असा दावा केला, की अल्लाहने त्यांना पवित्र पैगंबर हजरत मुहम्मद यांचे दास्यत्व आणि अनुनयासाठी अपेक्षित मसीहा आणि इमाम महदी म्हणून पाठविले आहे.  संपूर्ण जगाला इस्लाम धर्माचे खरा परिचय करून देणे आणि पैगंबर हजरत मुहम्मद यांच्या शिरवणीकडे आणि पवित्र ईश्वरीय पुस्तक कुराणाकडे घेऊन जाणे, हा त्यांच्या आगमनाचा उद्देश होय, असा त्यांचा दावा होता. असे असले तरी पैगंबर हजरत मुहम्मद हेच खातमुलअंबिया (शेवटचे प्रेषित) आहेत आणि सर्वश्रेष्ठ आहेत, याबाबत त्यांनी निःसंदिग्ध शब्दांत ग्वाही दिली होती.
अहमदिया आणि अन्य मुसलमानांमधील आणखी एक फरक म्हणजे अहमदिया येशूला जीवंत मानत नाहीत. इस्लामी परंपरेनुसार येशू ख्रिस्त हाही प्रेषितच आहे, मात्र पैगंबर हजरत मुहम्मद हे शेवटचे आणि सर्वश्रेष्ठ प्रेषित होत. मात्र ख्रिश्चन परंपरेनुसार येशू जीवंत असून तो निर्णयाच्या दिवशी (कयामत किंवा जजमेंट डे) परत येणार आहे. अहमदियांचे म्हणणे असे, की पैगंबर हजरत मुहम्मद हे सर्वश्रेष्ठ प्रेषित असल्यामुळे येशू त्यांच्यानंतर येऊ शकत नाही. एखादी व्यक्ती मेल्यानंतर ती जीवंत असण्यावर विश्वास ठेवणे चुकीचे आहे. सुळावर देण्याच्या घटनेनंतर येशू ख्रिस्त पॅलेस्टाईनमधून स्थलांतर करून काश्मीरमध्ये आले आणि श्रीनगरच्या मुहल्ला खानियारमध्ये त्यांची कबर आहे. ते कधीच आकाशात गेले नाहीत तर आकाशातून ते कसे अवतरणार, असा प्रश्न अहमदि विचारतात.
ही सगळी माहिती संमेलनाच्या त्या मांडवात आम्हाला मिळत होती. एवढे सगळे झाले, तरी पाकिस्तानात होणाऱ्या छळाबद्दल ही मंडळी फारशी बोलायला तयार नव्हती. कारण मुस्लिमांमध्ये जवळपास 53 पंथ-उपपंथ आहेत आणि त्या प्रत्येकाबद्दल कोणाला माहिती असायचे कारण नाही. अहमदियांबाबत थोडी फार माहिती होण्याचे कारण म्हणजे त्यांच्या छळाच्या येणाऱ्या बातम्या. त्याबाबत माहिती मिळाली असती तर बरे झाले असते. तरीही त्यांच्याशी गप्पा मारताना मजा आली. संमेलनाच्या त्या विस्तीर्ण मंडपात फेरफटका मारताना पाय दुखू लागले तरी त्याचे चीज झाल्यासारखे वाटले.
संमेलनातून बाहेर पडताना माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांची भेट झाली. शरद पवारांनी संमेलनाध्यक्षांच्या निवडीची पद्धत बदलण्याचा सल्ला दिला होता. त्याबाबत त्यांना छेडले तेव्हा सध्याची पद्धत बदलायला ते नाशूख दिसले. पाच जणांची समिती दिली तर त्यांच्या हातात सगळी सूत्रे जातील. त्यातून वेगळे राजकारण निर्माण होईल. त्यापेक्षा मतदारांची संख्या वाढायला हवी, असे त्यांचे मत पडले. शिवाय साहित्य परिषदेत साहित्यिक नसलेल्या लोकांची गर्दी झालीय, याबद्दलही त्यांचा फार काही आक्षेप दिसला नाही. एवढे मोठे आयोजन करायचे तर कार्यकर्ते लागणारच. मग आयोजनासाठी कार्यकर्ते लागतात तर साहित्य संस्थांमध्ये ते का नकोत, असा त्यांचा सवाल होता. यावेळी गंमतच झाली.
“आता हा मांडव तुम्ही पाहत आहात. येथे तुम्हाला किती साहित्यिक दिसतायत,” कोत्तापल्लेंनी विचारले.
माझ्या तोंडून निघून गेले, “अगदी मोजकेच”.
आपण हा प्रश्न विचारून चूक केली असे त्यांना बहुदा वाटले असावे. तितक्यात नको त्या शब्दांत बोलल्याचे माझ्याही लक्षात आले. म्हणून सावरण्यासाठी मी म्हणालो, “म्हणजे साहित्यिकांपेक्षा रसिकांची संख्या जास्तच आहे.”
मग ते म्हणाले, “हा एवडा डोलारा उभा करायचा तर कार्यकर्त्यांची फौज लागतेच.”

छातीवर डीपीयूचे बिल्ले लावलेले तरुण-तरूणी फिरत होते, त्याकडे बहुधा त्यांचा निर्देश असावा. मात्र अभावितपणे मी बोलून गेलो होतो. ते काही खोटे नव्हते. आपल्या गावात एक मोठा कार्यक्रम होत आहे. मोठ-मोठे लोक तिथे येताहेत आणि खूप काही पाहायला मिळणार, या भावनेने जमा झालेल्यांचीच तिथे गर्दी होती. त्यात साहित्यिक म्हणवून घेणारे किंवा साहित्याच्या आचेने आलेले होतेच कितीसे? केवळ पुस्तके आणि संतांची शिल्पे उभी केली म्हणजे साहित्यिक गुण येत नाहीत. हिंदुस्तान अँटिबायोटिक्सच्या मैदानावर एक शुभ्र भपका दिसत होता. त्यात साहित्य कमी आणि सामग्रीच जास्त होती. त्याला कोणाचा काय इलाज

A photo posted by Devidas Deshpande (@devidasdesh) on


तिथेच एका ठिकाणी एक पुतळा होता. पुस्तकांचे ओझे पेलणाऱ्या मुलाचा हा पुतळा मला खूप अन्वर्थक वाटला. ज्ञान मिळालेय, पण ते पेलवत नाही, अशी काहीशी अवस्था मंडपाच्या आत प्रतिष्ठापना झालेल्यांची झाली होती. त्याचाच निदर्शक जणू हा पुतळा होता!

संमेलनाच्या गर्दीला हव्या सेल्फ्या आणि कुल्फ्या!

(आधीचे भाग – दर साल दर शेकडा वादाचे संमेलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाच बसलेली ‘चपराक’!)

अशा परिस्थितीत कोण कुठल्या संमेलनाध्यक्ष झालेल्या सबनीसांच्या फिरत्या सत्यप्रियतेमुळे एवढ्या मोठ्या शाही आयोजनावर पाणी फिरणे पी. डी. पाटलांना परवडणारे नव्हते. त्यामुळे सबनीसांच्या सरबत्तीमुळे संमेलनाचे वस्त्रहरण होत आहे, असे दिसताच त्यांनी वाहिन्या आणि वृत्तपत्रे अशा दोन्ही मार्गांनी संमेलनाच्या प्रतिमेवरील धूळ झटकायचा प्रयत्न केला. ते शक्य झाले नाही तेव्हा त्यांनी थेट सबनीसांचे कान टोचले. अन् तोपर्यंत सत्य आणि वैचारिकता या दोन इंजिनांवर धावणारी सबनीसांची गाडी अचानक ब्रेक घेऊन थांबली. कालपर्यंत एफ १ च्या स्पर्धेत भाग घेऊ पाहणारा मोटारचालक एकदम वडापची गाडी चालवू लागावा, अशी ही परिस्थिती होती. अन् या स्थितीला कारण ठरले ते स्वागताध्यक्ष हे अधिकृत पद असलेले मात्र खऱ्या अर्थाने संमेलनाचे कर्ते-करविते पी. डी. पाटील!
मागील स्वागताध्यक्षांकडून सध्याच्या स्वागताध्यक्षांना सूत्रे देण्याचा कार्यक्रम यंदाच्या संमेलनात पहिल्यांदा पाहण्यास मिळाला. सबनीस प्रकरणामुळे मात्र साहित्य संमेलनाची सूत्रे साहित्य महामंडळाकडून खऱ्या अर्थाने नवसंस्थानिकांकडे गेली. काही वाहिन्यांनी मंडपात आलेल्या तरुणांच्या मुलाखती घेऊन त्यांना संमेलनाध्यक्षांचे नाव विचारले तेव्हा त्यांनी डी. पी. पाटील हेच सांगितले. यातच सर्व काही आले!


सबनीसांनी आपले छापील वाचन न वाचण्याचा मनसुबा आधीच जाहीर केल्यामुळे सर्वांनी आधीच निःश्वास सोडला होता. मात्र संमेलनाध्यक्षांपेक्षा प्रमुख पाहुण्यांचे भाषण गाजण्याचीही एक उप-परंपरा मराठी जगतात आहे. लता मंगेशकर किंवा गिरीष कार्नाड यांची भाषणे त्यावेळच्या संमेलनाध्यक्षांपेक्षा गाजली होती. यावेळी गुलजार यांनी त्या परंपरेला नाट लागू दिली नाही. संमेलनाध्यक्षांच्या तिरडीचे बांबू वगैरे अलंकृत शब्दांनी युक्त भाषणापेक्षा गुलजार यांचा तरल संवाद सगळ्यांना भावला, यात काहीही नवल नव्हते. माणसे केवळ भारंभार वाचून किंवा पुस्तके लिहून शहाणी होत नाहीत. त्यासाठी आणखी काहीतरी अंगी असावे लागते. ज्ञान धावते पण शहाणपण रांगते, अशी एक म्हण महाराष्ट्र वाक् संप्रदायमध्ये दिलेली आहे. ती अशावेळेस वारंवार आठवते.
मात्र उद्घाटनाच्या सत्रात खरी धमाल आणली ती शरद पवार यांनी. निवडणुका वगैरे प्रकार आमच्यासाठी सोडा, असा टोला देतानाच सबनीस निवडून येईपर्यंत मला त्यांचे नावही माहीत नव्हते, हेही त्यांनी सांगून टाकले. सबनीसांनी अध्यक्ष होण्यासाठी ज्या लांड्यालबाड्या केल्या त्याला हा एक प्रकारे दुजोराच होता. किमान शब्दांमध्ये समोरच्याचा पाणउतारा कसा करायचा, याचा तो वस्तुपाठच होता. दुसऱ्या दिवशी यशवंतरावांचे नाव घेऊन ज्या सुसंस्कृततेची भलामण त्यांनी केली, त्या सुसंस्कृततेचा हा एक अस्सल पुणेरी नमुना होता म्हटले तरी चालेल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तर बदनाम हुए तो क्या हुआ, नाम न हुआअसा खास नागपुरी हिंदीतील संवाद ऐकवून संमेलनाध्यक्षांच्या अब्रूलाच हात घातला. (त्याचा वचपा आपल्या भाषणाच्या संबोधनात मुख्यमंत्र्यांचे नाव न घेऊन सबनीसांनी काढला.) शिवाय सबनीसांच्या भाषणाला न थांबून त्यांनी काहीही झाले तरी राजकारणी कसा भारी पडतो, याची चुणूक दाखवली.

उद्घाटनाचा कार्यक्रम झाल्यानंतर आणि एकदा शरद पवारांची मुलाखत झाल्यावर संमेलनात अन्य काही कार्यक्रमांमध्ये कोणालाही रस असायचे कारण नव्हते. संमेलनातील परिसंवादांना उपस्थित राहणाऱ्या रसिकांची मानसिकता, अशा विषयावर कोणीतरी एकदा संशोधन करायला हवे. वर्षानुवर्षे तेच ते रटाळ आणि वांझोटे परिसंवाद घेऊनही आयोजकांचा उत्साह कमी का होत नाही, यावरही एखादा परिसंवाद व्हायला हवा. साहजिकच गावातील जत्रेला लोटावी तशी कुठून कुठून आलेली मंडळी संमेलनाच्या परिसरातील पुतळ्यांभोवती सहकुटुंब सेल्फ्या काढण्यात तरी गुंग होती किंवा खाद्यपदार्थांच्या मांडवात कुल्फ्या खाण्यात धन्यता मानत होती.