ट्रम्प बनणार का नरेंद्र मोदी?

दोन वर्षांपूर्वी 2014 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका होऊन नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाने मोठा विजय नोंदवला. त्यावेळी स्वघोषित लिबरल गोटाने असे एक मिथक तयार केले, की ती निवडणूक अमेरिकेच्या धर्तीवर लढल्या गेली होती. अमेरिकेत ज्या प्रकारे अध्यक्षपदासाठी एक उमेदवार असतो आणि सगळी निवडणूक त्याच्याच अवतीभोवती फिरते, तशीच ती निवडणूक नरेंद्र मोदी नावाच्या व्यक्तीवर केंद्रीत झाली होती, हा त्यांचा आवडता सिद्धांत होता. पुरोगामी किंवा नेहरूवादी सेक्युलरिजमच्या नावावर खपविल्या जाणारी विचारसरणी पिछाडीवर पडली आहे, हे मानण्यास नकार देण्यासाठी निर्माण केलेला तो एक युक्तिवाद होता. आता पं. नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या काळापासूनच निवडणुका अशाच पद्धतीने लढल्या गेल्या होत्या, ही गोष्ट वेगळी.
ही आठवण येण्याचे कारण म्हणजे अमेरिकेतील अध्यक्षपदाची सध्या चालू असलेली निवडणूक. तिथे रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांच्यात टक्कर आहे. अन् नरेंद्र मोदी यांनी ज्या परिस्थितीचा सामना केला होता, जवळपास अशाच परिस्थितीचा सामना ट्रम्प या टक्करीमध्ये करत आहेत. असंही म्हणता येईल, की अमेरिकेतील ही निवडणूक भारतातील निवडणुकांसारखीच लढली जात आहे. (प्रचाराची खालची पातळी आणि शिवीगाळीसह!) भारतात ज्या प्रकारे स्वघोषित उदारवादी मंडळी आणि माध्यमांनी मोदींना हरविण्यासाठी एक आघाडी उघडली होती, त्याच प्रकारे जवळपास संपूर्ण अमेरिकी माध्यमांनी  ट्रम्पना हरविण्याचा विडा उचलला आहे. रिपब्लिकन समर्थक आणि अनेक निष्पक्ष निरीक्षकांचे मत बनले आहे, की ट्रम्प फक्त हिलरींसोबतच लढा देत नाहीत, तर अमेरिकेच्या प्रतिष्ठित वर्तमानपत्रे आणि टीव्ही वाहिन्यांसोबतही लढाई करत आहेत. 
म्हणूनच पाश्चिमात्य माध्यमांत असे म्हटले जात आहे, की या नोव्हेंबरमध्ये होणारी निवडणूक केवळ ट्रम्प आणि हिलरी यांच्या दरम्यानच नसून माध्यमांची विश्वासार्हतेची बाजी लागलेली आहे. भारतात ज्या तऱ्हेने मोदींनी मुख्य प्रवाहातील माध्यमांना बाजूला सारून नवीन माध्यमांच्या मदतीने आपले नाणे खणखणीत वाजवून घेतले, तशीच जादू अमेरिकेत  ट्रम्प करू शकतील का, हा आता प्रश्न आहे.
वॉशिंग्टन पोस्टमधील ताज्या लेखात माध्यमांच्या या पक्षपाती वागणुकीवर कठोर टीका करण्यात आली आहे. या लेखाचे उपशीर्षक आहे ‘डोनाल्ड ट्रम्प यांनी मुख्य प्रवाहातील माध्यमांचे पितळ उघडे पाडले’. या लेखात म्हटले आहे, “मुख्य प्रवाहातील माध्यमांनी डेमोक्रॅट पक्षाच्या बाजूने आपला कल प्रदर्शित करण्यातील सारे पडदे दूर केले आहेत.” फॉक्स न्यूजच्या हॉवर्ड कुर्टझ् यांच्या शब्दांत, “माध्यम बिचाऱ्या डोनाल्डवर तुटून पडले आहेत.”
याचे एक उदाहरण वॉशिंग्टन पोस्टनेच दिले आहे. त्यानुसार ट्रम्प यांच्या सभेत अडथळा आणण्यासाठी लोकांना पैसे वाटण्याचे एक  स्टिंग ऑपरेशन समोर आले. तेव्हा हे स्टिंग करणारे लोक मुख्य प्रवाहातील पत्रकार नव्हते, असे सांगून हिलरींनी त्याची सच्चाई मान्य करण्यास नकार दिला. यावर वर्तमानपत्राने म्हटले आहे, की एक लॅपटॉप आणि मोबाइल असणारी कोणतीही व्यक्ती आजकाल पत्रकार असतो.मात्र मुख्य माध्यमांनी या घटनेकडे सरळ सरळ दुर्लक्ष केले. वोक्स या संकेतस्थळाचे राजकीय विश्लेषक एज्रा क्लाईन यांनी लिहिले आहे, की न्यूयॉर्क आणि वाशिंग्टनमध्ये असलेल्या माध्यमांचा स्वतःचा ‘कॉस्मोपोलिटन’ पूर्वग्रह आहे, तो  ट्रम्पसारख्या बाहेरच्या व्यक्तींच्या विरोधात काम करतो.   ट्रम्पच्या विजयाची या माध्यमांनी संस्थात्मक, व्यक्तिगत आणि शारीरिक भीतीही वाटते, असेही त्यांनी लिहिले आहे. मोदींच्या विजयापूर्वी ‘दिल्लीच्या वर्तुळातील बाहेरच्या व्यक्तीच्या विजयाबाबत’ भीतीचे जे वर्णन होते, त्यात आणि यात काही फरक आहे का?
अध्यक्षपदाच्या मुख्य उमेदवारांच्या शेवटच्या वादविवादापूर्वी एका कार्यक्रमात हिलरींसोबत ट्रम्पही सहभागी झाले होते. तेथे उपस्थित पत्रकारांकडे इशारा करत आणि प्रत्येकाचे नाव घेऊन ते हिलरींना उद्देशून म्हटले,  “अहो बघा, तुमचे सगळे पाठिराखे येथे आले आहेत.” अमेरिकेचे राजकारण आणि पत्रकारितेतील हा एक नवा अध्याय होता. 
नरेंद्र मोदी हे एक सुसंस्कृत नेता आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या विरोधकांबद्दल किंवा माध्यमांबद्दल त्यांनी कधी अपशब्द काढला नाही. येथे करण थापर यांच्या ‘डेविल्स अॅडव्होकेट’  या कार्यक्रमातील त्यांच्या एका मुलाखतीची आठवण येणे साहजिक आहे. मोदी त्यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या कार्यक्रमात थापर यांनी गुजरात दंगलींबाबत एकच प्रश्न वारंवार विचारला होता. मोदींनी त्यांना अत्यंत संयमाने एकच उत्तर दिले. शेवटी जेव्हा थापर आपल्या प्रश्नावर अडून बसले, तेव्हा मोदी म्हणाले, ‘थापर साहेब, तुम्ही माझे मित्र आहेत आणि तुम्ही मित्रच राहावेत, अशी माझी इच्छा आहे.’ आणि त्या कार्यक्रमातून ते निघून गेले.
ट्रम्पची मात्र गोष्टच वेगळी. त्यांच्या सैल सुटलेल्या जिभेसाठीच ते ओळखले जातात. परिस्थिती अशी आहे, की कोलोराडोतील एका सभेतट्रम्पनी आपल्या पाठिराख्यांना सांगितले, “वर्तमानपत्रे विसरून जा, इंटरनेट वाचा. तिथे मला जास्त प्रामाणिकपणा सापडतो.”  
नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रकारे मुख्य प्रवाहातील माध्यमांना अर्थहीन बनवत  सोशल मीडियाचा आश्रय घेतला आणि त्यात यशही मिळविले, त्याच प्रकारे ट्रम्प यांनी फेसबुकच्या साहाय्याने प्रचार सुरू ठेवला आहे. म्हणूनच अमेरिकेतील भारतीय लोकांसमोर प्रचार सभेत ‘मी मोदींचा प्रशंसक आहे आणि त्यांच्या प्रकारे काम करण्याची माझी इच्छा आहे,’ असे ट्रम्प म्हणतात तेव्हा त्याचे अनेक अर्थ असतात. आता ते नरेंद्र मोदी बनणार का, हे फक्त काळ आणि अमेरिकी मतदातेच सांगू शकतात. 

‘धृतराष्ट्र विकारा’चा पहिला अपवाद

            पंधरा दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशात फिरत असताना जरा जनमानसाचा अंदाज घेण्याचा जरा प्रयत्न केला. अलम दुनियेत बदनाम झालेल्या तेथील सरकारबद्दल लोकांना काय वाटते, याचा अंदाज घेऊन पाहिला. रेल्वेतील सहप्रवासी असोत किंवा कानपूरच्या रस्त्यावर वाहने चालवणारे चालक, त्यांच्या तोंडून एकूण वर्तमानाबद्दल फारशी तक्रार दिसली नाही. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्याबद्दल त्यांना सहानुभूती असल्याचे जाणवत होते. त्यांच्या काळात राज्यात विकास झाल्याचे उदाहरणानिशी ते सांगत होते. कानपूरमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरून काही वर्षांपूर्वी 15-16 किलोमीटर अंतर कापण्यासाठी दोन तास लागायचे. आता हा वेळ अर्ध्या तासावर आला आहे, याचे चालकाला समाधान होते. त्यांच्या काळात लखनौमध्ये तयार झालेल्या पर्यटन केंद्राचीही बरीच स्तुती ऐकली. अर्थात् उत्तर प्रदेशातील विकासाची तळरेषा खरोखरच एवढ्या तळाशी आहे, की काहीसे बोटभर वर गेले तरी त्यांना आकाश ठेंगणे वाटावे. एकूण व्यवस्थेतील अनागोंदी (किंवा अनागोंदीची व्यवस्था) या बाबतीत त्या राज्याची स्पर्धा फक्त महाराष्ट्राशी होऊ शकेल.
            सांगायचा मुद्दा हा, की अखिलेश यादव हे वाटतात तेवढे अक्षम मुख्यमंत्री नाहीत, असा साधारण सूर आहे. अशा या मुख्यमंत्र्याला त्याच्याच वडिलांनी गच्ची देण्याचा एकूण अंदाज दिसतोय. भारतीय राजकारणातील – किंबहुना भारतीय समाजजीवनातील – हे एक आक्रितच म्हणायला पाहिजे. याचे कारण भारतातील प्राचीन म्हणजे अतिप्राचीन परंपरा. आपला पुत्र कसाही असला, तरी त्याची पाठराखण करायची, भलेही त्यात स्वतःचा नाश झाला तरी चालेल, ही ती परंपरा. सत्यम या माहिती तंत्रज्ञान कंपनीचा फुगा फुटला तेव्हा एका फ्रेंच संकेतस्थळासाठी मी लेख लिहिला होता. त्यावेळी धृतराष्ट्र सिंड्रोम (धृतराष्ट्र विकार) हा वाक्प्रयोग मी केला होता. आपला मुलगा/मुलगी चुकूच शकत नाहीत, आपली गादी त्यांनीच सांभाळावी, त्यांचे सगळे दोष इतरांनी गोड मानून घ्यावेत, हा या विकाराने ग्रस्त असलेल्यांचा आग्रह असतो. राजकीय नेते असो की उद्योगपती, कलावंत असो की खेळाडू, भारतातील जवळपास प्रत्येक क्षेत्रात या रोगाची लक्षणे आढळतील. अपोलो टायर्सच्या रौनकसिंग आणि त्यांचा मुलगा ओमकारसिंग कन्वर यांच्यातील वाद हा एक अपवाद, पण तोही संपत्तीचा वाद होता. 
         खासकरून राजकीय क्षेत्रामध्ये या विकाराने पार उच्छाद मांडलेला दिसून येईल. ‘धृतराष्ट्र विकारा’ची लागण झालेली नाही, असा एकही पक्ष दिसणार नाही. आपल्या वंशाच्या दिव्यांसाठी इतरांना राबवून घेणारे, त्यांना पणाला लावणारे आणि प्रसंगी त्यांचा राजकीय बळी घेणारे अनेक धृतराष्ट्र देशाने पाहिले आहेत. त्यात वैविध्यही भरपूर. 
       द्रामुकच्या करुणानिधींनी आधी आपल्या ज्येष्ठ पुत्राला पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू केला तेव्हा एम. जी. रामचंद्रन यांनी वेगळी चूल मांडली. तरीही तो मुलगा वारल्यानंतर करुणानिधींनी आधी आपल्या अळगिरी या मुलाला बढती दिली आणि आता स्टॅलिन यांना गादीचा वारस म्हणून नियुक्त केले आहे. तेलुगु देसमच्या एन. टी. आर. यांनी ज्येष्ठ पुत्र हरिकृष्णा, मुलगी पुरंदरेश्वरी देवी यांना राजकारणात आणले आणि तिसरा मुलगा बाळकृष्णाला चित्रपटांत आणले. ते अजून आपापल्या क्षेत्रांमध्ये आहेतच, शिवाय आता त्यांचा नातू ज्युनियर एनटीआर चित्रपटांमध्ये त्यांचा वारसा चालवत आहे. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या एच. डी. देवेगौडा यांनी आपला मुलगा कुमारस्वामी यांच्या हाती पक्षाची सूत्रे सोपविली आहेत. केरळमध्ये ई. एम. एस. नंबुद्रीपाद यांनी आपल्या मुलाला आणलेच होते. शिवसेनेच्या बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या मुलासाठी पुतण्याला अडगळीत टाकले. त्यांचे ‘जाहीर’ विरोधक व जुने’जाणते राजे’ शरद पवार यांनीही आपल्या मुलीसाठी पुतण्याला हातभर अंतरावरच ठेवले आहे. अकाली दलाच्या प्रकाशसिंग बादल यांच्या तर संपूर्ण कुटुंबानेच सत्तापदे बळकावून ठेवली आहेत. मात्र त्यातही मुलगा सुखबिरसिंग बादल यांना उपमुख्यमंत्री नेमून ‘हातचा एक’ ठेवला आहेच. काँग्रेसमध्ये तर पक्ष अकबर रोडवर (पक्ष कार्यालय) सुरू होतो आणि 10, जनपथपाशी (सोनिया व राहुल गांधींचे निवासस्थान) संपतो. बाकी मग राज्यात त्याच पाढ्याची उजळणी चालू असते. राष्ट्रीय जनता दलाच्या लालूप्रसाद यादवांबद्दल तर बोलायलाच नको. भाजपमध्ये महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे यांनी मुलीसाठी असाच राजहट्ट करून पुतण्याला अलगद राष्ट्रवादी काँग्रेसच्या झोळीत टाकले. जाऊ द्या, कोळसा उगाळावा तेवढा काळा…
          यातील एकाही वारसदाराने आपल्या कर्तृत्वाने आसमंत उजळून टाकलेला नाही किंवा असामान्य दूरदृष्टी दाखवून लोकोपकार केलेला नाही. फक्त त्यांच्या त्यांच्या पित्याची नेमप्लेट हीच त्यांची जमेची बाजू. अखिलेश यादव सत्तेवर आले, तेव्हा तेही याच यादीतील आणखी एक भर हेच वर्णन त्यांना लागू होते. आजही त्यांनी फार काही असामान्य कामगिरी केलेली नाही. मात्र कुटुंबात पेचप्रसंग उद्भवलेला असताना त्यांच्या पिताश्रींनी आपले वजन मुलाच्या बाजूने न टाकता भावाच्या बाजूने टाकावे, हे वेगळेपण खरे. त्यातही फरक आहे. धृतराष्ट्र आपल्या पोरावर आंधळा विश्वास दाखवत असताना चुकीच्या बाजूने उभा टाकला होता. आज मुलायमसिंग मुलगा विकासाच्या गोष्टी करत असताना गुंडगिरी आणि हेकेखोरी करणाऱ्या भावाच्या बाजूने उभे आहेत. त्यामुळे पुत्रप्रेमाला बळी न पडल्याबद्दल त्यांचे धड अभिनंदनही करता येत नाही.
         आपल्या संपूर्ण कुळाचा एकमेकांशी भांडून नाश होताना जेथे कृष्णाने पाहिला, त्याच यादवांच्या भूमीतील ही घडामोड उदात्त वगैरे आहे, अशातला भाग नाही. फक्त भारतीय राजकारणाच्या काळ्याकुट्ट पडद्यावर पडलेला हा जरा वेगळ्या रंगाचा – पण डागच – होय. हेच त्याचे आगळेपण!