शुभेच्छा…कशाच्या कशाच्या!

यंदा अद्याप तरी नववर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरू झालेला नाही. एक दोन इमेल आले आहेत मात्र त्यांचे प्रमाण आटोक्यात आहे. त्याबद्दल शुभेच्छा न देणाऱ्यांचा मी आभारी आहे. एखाद्या विशिष्ट वेळेला कोणा माणसाला विशिष्ठ शब्द बोलल्यास त्याचे भलेच होते, हे एवढ्या मोठ्या संख्येने लोकांना कसे काय वाटू शकते हे माझ्यापुरते गौडबंगाल आहे. विशिष्ट दिवशी एखादा सण पाळणे ही जर अंधश्रद्धा असू शकते, एखाद्या विशिष्ठ दिवशी उपाशी राहणे हे जर अंधश्रद्धा या सदरात मोडू शकते तर कॅलेंडरच्या एका विवक्षित रकान्यात असलेल्या दिवशी तमाम जगाला सगळं कसं ‘गुड गुड’ वाटू शकते, हीही अंधश्रद्धाच होय. एवढाच कि, पहिल्या तऱ्हेची अंधश्रद्धा जोपासणारे संख्येने जास्त आहेत आणि दुसऱ्या तऱ्हेचे लोक कमी आहेत, एवढाच काय तो फरक. ज्या अंधश्रद्धेचे अनुयायी जास्त ती प्रथा आणि जिचे कमी ती अंधश्रद्धा, असा काहीसा हा प्रकार आहे.

येणारे वर्ष सुखाचे जावो, असे आपल्याला वर्षातून किती वेळेस ऐकायला मिळते, तुम्ही विचार केला आहे का? १ जानेवारी, गुढी पाडवा, दसरा आणि दिवाळी शिवाय तुमचे काही अमराठी मित्र असतील तर त्यांचेही वेगळे…म्हणजे उगादी, पोंगल, विशू, बैसाखी, बिहू  इत्यादी. गम्मत म्हणजे, इतक्या शुभेच्छा मिळूनही आयुष्य आहे तसाच आहे. मागील पानावरून पुढे चालू असा म्हणण्याचीही सोय राहू नये, इतके सपक, एकसुरी आणि अर्थहीन. कदाचित म्हणूनच असावे, वर्षांताचे निमित्त काढूनगळ्याखाली दारू उतरविणारे अलीकडे वाढू लागलेत. मध्यरात्रीनंतर इकडे नवे वर्ष लागते आणि बस लागावी तसे दारू पिलेल्यांना ‘सेलिब्रेशन’  लागते! मग पोटात उतरलेली दारू डोक्यात चढते आणि मौज मजेसाठी जमलेले टोळके धिंगाणा घालू लागते. यंदा या धिंगाण्याला मा. न्यायालयानेही हात द्यायचे ठरविले आहे. दारू पिण्याला काल वेळेचे बंधन नसावे असाच जणू काही न्यायालयाचा हेतू असावा. शिवाय दारू पिऊन गाडी चालविणाऱ्यांना समजून घ्या, असंही सांगितलं आहे.  न्यायालय आणि मद्यालय अशी बेधुंद युती जगात बहुधा पहिल्यांदाच अस्तित्वात आली असावी.

आता नव्या वर्षाच्या मुहूर्तावर अशी टकळी चालू केल्याबद्दल मला कोणी दोष देईलही. मात्र त्यामुळे वस्तुस्थिती कशी बदलेल? ज्या शुभेच्छा दिल्या-घेतल्या आहेत, त्या तरी खऱ्या कुठे आहेत? यांत्रिक संदेशांची देवाण घेवाण हेच त्याचे खरे स्वरूप आहे. मी तर गेल्या दिवाळीत आलेले शुभेच्छांचे मेल यंदाच्या दिवाळीत पुढे पाठविले. सगळी गुगलची कृपा, दुसरे काय. त्याच्यामुळेच असे जुने मेल सांभाळून ठेवता येतात ना. पूर्वीच्या काळी नाही का, बायका एका लग्नात आलेला आहेर जपून ठेवत आणि दुसऱ्या नातेवाईकाच्या लग्नात तो आहेर म्हणून देत. त्याचीच हि आधुनिक आवृत्ती आहे. येणाऱ्या संदेशांमध्ये जुळ्या, म्हणजे अगदी एकसारख्या एक संदेशांची संख्या पहिली, तर माझे समानधर्मा लोक कमी नाहीत, याची खात्री पटते. खरं म्हणजे इतके हुबेहूब संदेश एकावेळी एकत्र पाहिल्याने त्या संदेशांचे अजीर्णच होते.  त्यामुळे दर वर्षीप्रमाणे यंदाही शुभेच्छा संदेशांना सुट्टी. जे चाललाय ते खूप छान आहे. ते तसंच चालत राहो ही इच्छा. मात्र त्यासाठी जानेवारी किंवा दिवाळी अशा निमित्तांची गरजच काय? एका इंग्रजी लेखकाची प्रतिमा वापरून लिहायचे तर म्हणावे लागेल…आपल्या शुभकामना या ईश्वरासारख्या असाव्यात…सर्वत्र आणि सगळीकडे उपस्थित मात्र कधीही न दिसणाऱ्या!

माकडाच्या घराची बातमी

एक होते माकड. दिवसभर आपल्या ऑफिसमध्ये बसून असावे आणि संध्याकाळ इकडे तिकडे उंडारत काढावी, या पलिकडे एखाद्याची जीवनशैली असते, असावी यावर त्याचा विश्वास नव्हता. तरीही कधी कधी त्याला स्वतःच्या अशा उनाड आयुष्याचा कंटाळा यायचा. पावसाळ्यात चुकून मुसळधार पाऊस पडायचा. त्यावेळी हा एखाद्या इमारतीच्या आश्रयाला गेला, की तिथल्या लोकांनी कधीही माकड पाहिलेले नसल्याने ते माकडापेक्षा जास्त चाळे करायचे. झाडावर बसावं तर तिथे म्हाडाच्या घरांपेक्षा जास्त पावसाचं पाणी गळत असायचं. अशावेळी माकड मनातल्या मनात संकल्प करायचे, हे काही ठीक नाही गड्या. आपण एवढे कर्तबगार आणि अशा रितीने पावसात भिजत राहावं. साधे चिमण्या-कावळे सुद्धा स्वतःचे घरटे करतात. थांब, हा पाऊस थांबला की आधी एखादे डुप्ले फ्लॅट घ्यायलाच पाहिजे. वर्तमानपत्रांच्या रिअल इस्टेटच्या पुरवण्या वाचून त्याला सगळ्या बिल्डरांची नावे जवळपास तोंडपाठ झाली होती. त्यामुळे कोणाकडे फ्लॅट बुक करायचा, हेही त्याने मनातल्या मनात ठरवून टाकलेले असायचे. पाऊस थांबला, की मात्र माकडाचा मनोरथही जागच्या जागी उभा असायचा, सरकारी योजनांसारखा. परत त्याचा सामान्य जीवनक्रम सुरू राहायचा.

हिवाळ्यात थंडी वाजू लागली, की माकडाला वाटायचे आपलेही एखादे घरकुल असावे जिथे प्रेमाची ऊब मिळेल. दूरचित्रवाणीच्या जाहिराती पाहून त्याला घर-संसार म्हणजे काही गंमतीचीच गोष्ट आहे, असे वाटत होते. एकदा का थंडीचा मोसम उलटला, की आपण वन रूम किचन का होईना, पण स्वतःच्या जागेत जायचेच, असा बेत तो कुडकुडत करत असायचा. थंडीच्या काळात, दोन हात एकमेकांत गुरफटुन तो असा काही बसायचा, की च्यवनप्राश खाण्याचीसुद्धा त्याला इच्छा व्हायची नाही. मात्र हिवाळा संपला, की फुलांवरील दवबिंदू उडून जावे तसा त्याचा इरादाही नाहिसा व्हायचा. नव्हे, आपण कधी असा विचार केला होता, हेही तो विसरून जायचा.

उन्हाळ्यात झाडाच्या फांद्यावरून येणारे कडक ऊन सोसताना माकडाला वाटायचे, आपलेही घर असते तर त्यात एखादा फ्रीज असता. ऊन्हाने काहिली होत असताना फ्रीज उघडून आपण एखादे शीतपेय पीत बसलो असतो. माकडच ते, शीतपेयासाठी पैसे द्यावे लागतात किंवा भारनियमनामुळे फ्रीजसुद्धा थंड होणे बंद झाल्याची त्याला कल्पना असण्याचे कारण नव्हते. अर्थात एकदा का ऊन सरले, की माकडाच्या प्लॅनचेही बाष्पीभवन होऊन जायचे. मग कुठले घर आणि कुठला विसावा.

ही झाली पारंपरिक कथा. मात्र आपले माकड आहे एकविसाव्या शतकातील. त्यामुळे आपल्या वास्तवात न येणाऱ्या योजनांचेही मार्केटिंग कसे करावे, याचं कौशल्य त्याने विकसित केले होते. त्यामुळे काय व्हायचं, पावसाळा आला की बहुतेक वर्तमानपत्रांमध्ये एक बातमी येत असे.

येत्या पावसाळ्यात माकडाचे घर होणार

त्याखाली माकडाच्या योजनेची सगळी माहिती दिलेली असायची. इतकेच नव्हे तर माकडाने केलेली घराची आखणी अगदी सांगोपांग त्यात येत असे. लवकरच जनतेला हे घर पाहायला मिळेल, असेही त्या बातमीत म्हटलेले असायचे. जो प्रकार पावसाळ्यात, तोच प्रकार उन्हाळ्यात. उन्हाळा संपला, की माकडाच्या घराचे बांधकाम सुरू होणार या अतिरिक्त बातमीसह माकडाची योजना अगदी सविस्तर स्वरूपात त्या बातमीत येत असे. एका वर्तमानपत्रात आली, की दुसरे वर्तमानपत्रही ती बातमी आतल्या पानात का होईना, पण छापतच असे. उन्हाळ्याप्रमाणेच हिवाळ्यातही

माकडाचे घर आता अंतिम टप्प्यात, लवकरच बांधकामाला सुरवात

अशी बातमी असायची.

अगदी ताज्यातली ताजी बातमी अशी आहे, की माकडाचे घर होईल तेव्हा होईल, मात्र त्यावर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक पेपरने एक वार्ताहर नेमला आहे. चुकून घराचे बांधकाम सुरू झालेच, तर आता स्लॅब पडणार, आता पायऱ्या बांधणार अशा बातम्या छापण्यासाठी या वार्ताहरांशी संपर्क साधण्याचा तुर्तास माकडाचा विचार आहे.