भारतीय भूमीवरील ब्रिटिश गोपालक

एडमंड पायपरएडमंड पायपर यांना भेटण्यापूर्वी केवळ एक ब्रिटीश व्यक्ती मंचरला गाईंचा गोठा सांभाळण्या साठी आला आहे, हीच आमची कल्पना होती. पायपर यांच्याशी तासभर गप्पा मारून निघाल्यानंतर शेती, पशुपालन आणि व्यावसायिकता यांच्याबद्दलच्या अनेक नव्या कल्पनांनी आमची झोळी भरून गेली होती. अनेक प्रकारची नवी माहिती मिळाली होती. भारतीय शेतकऱ्यांचे दुखणे कुठे आहे, याची अंधुकशी कल्पना आली होती. तसेच भर्तृहरीने म्हटल्याप्रमाणे, मला काहीही माहित नसताना वाटायचे सगळे माहित आहे आणि जसजसे कळत गेले तसतसे जाणवत गेले, की मला काहीही माहित नाही.

गोवर्धन फार्मगेल्या पोस्टमध्ये म्हटल्याप्रमाणे, दररोज चाळीस टन चीज बनण्यासाठी ‘गोवर्धन’ला लागणारे दूध पुरविले जाते ते मंचरजवळच असलेल्या एका फार्मवर सांभाळलेल्या गाईंपासून. ‘लोकमत’मध्ये पायपरबद्दल आलेली एक त्रोटक बातमी वाचून आम्ही तिथे गेलो होतो. आमच्यादृ्ष्टीने ही एक रंजक घटना होती. त्यात रंजक काही नसून व्यावसायिकता आणि वैज्ञानिक माहितीचे ते एक उपयोजन होते, हे कळाले पायपर यांच्याचकडून.

शेतीविज्ञानात पदवी घेतल्यानंतर पायपरनी मायदेशी इंग्लंडमध्ये अनेक ठिकाणी कामे केली. लहानपणापासून शेतावर राबल्यामुळे शेतातच काम करण्याची आवड होती. इंग्लंडमधील यंत्रणेमुळे आणि लाल फितीच्या कारभारामुळे पायपरला कंटाळा आला आणि स्वारी निघाली पोलंडला. तिथून हंगेरी, सौदी अरेबिया बहारिन आणि जॉर्डन अशी यात्रा करून पायपरची  स्वारी भारतात आली. शहा यांनी ‘गोवर्धन’च्या उत्पादनांसाठी ऑऱ्गॅनिक फार्मिंगचे प्रमाणपत्र मिळण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्यासाठी डेअरी व्यवसायातील आंतरराष्ट्रीय संकेतांचे पालन करण्यासाठी त्या प्रकारचे ज्ञान असणारी व्यक्ती हवी होती. त्यातून आधी मायकेल नावाच्या एकाची आणि दीड वर्षांपूर्वी पायपर यांची निवड करण्यात आली.

“मला केवळ काम म्हणून करायचे असते, प्राण्यांवर माझं प्रेम नसतं तर इथं एक क्षणभरही थांबलो नसतो,” पायपर म्हणाले. कारण सुमारे तासभर जनावरांच्या पालनाबाबत मांडलेली भूमिका आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नाचे असे काही गणित मांडले होते, की गाय म्हणजे त्यांना केवळ कच्चा माल वाटतो की काय अशी शंका मला आली होती. 2300 गाई आणि सुमारे शंभरेक कालवडी सांभाळणाऱ्या पायपरना विचारलं, की कालवडींना पिंजऱ्यात का ठेवलं आहे तर ते म्हणाले, कारण त्या उद्याच्या गाई आहेत. त्यांना काहीही इजा होऊ द्यायची नाही यावर त्यांचा कटाक्ष आहे. ते अशा थराला, की कालवडींना देण्यात येण्याऱ्या खाद्यावर माशा बसू नयेत, म्हणून ते झाकून ठेवण्यात येतं. त्यामुळे त्या प्राण्यांवर त्यांचे प्रेम आहे का नाही हा प्रश्न मला सतावत होता.

भाग्यलक्ष्मी फार्म, मंचर सुमारे तेवीसशे गाईंना तसेच कालवडींना स्वतंत्र क्रमांक देण्यात आला आहे. त्यांच्या अंगावर एक चिप बसविण्यात आली आहे त्यातून त्या गाईवर संगणकाद्वारे लक्ष ठेवण्यात येते. या गाईने किती खाद्य घेतले, तिच्य़ापासून किती दूध मिळाले, तिला कोणता आजार आहे का, तिच्यात आजाराचे काही लक्षणं आहेत का, हे सगळं त्या एका चिपच्या साहाय्याने पाहण्यात येतं. एवढंच नाही तर एखाद्या गायीने दिलेल्या दुधाचे तापमान जास्त असलं तर काहीतरी गडबड आहे, हेही त्या संगणकाच्या साहाय्याने कळतं. पन्नास गाईंचा एक गट अशा रितीने रोलर पार्लर नावाच्या यंत्रावर चढवून पाच मिनिटांत दूध काढण्यात येतं. या सगळ्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी पायपर साहेबांवर आहे.

ते हे काम काटेकोरपणे करत आहेत, याची चुणूक आमची गाडी भाग्यलक्ष्मी फार्ममध्ये प्रवेश करतानाच मिळाली. फाटकाजवळच जीपवर जंतुनाशकाचा फवारा करण्यात आला. त्यानंतर कालवडींच्या गोठ्यात जातानासुद्धा जंतुनाशक मिसळलेल्या पाण्यात पाय बुडवूनच आत प्रवेश करावा लागला. गायींचे दूध यंत्राद्वारे तीन वेळेस काढण्यात येते. ते पाहण्यासाठी खास प्रेक्षागृह केलेले आहे. तिथेच पायपर आणि आमचा संवाद झाला. आधी काहीसा आखडू वाटणारा हा माणूस नंतर एवढा खुलला, त्याला आवरताना आमच्या नाकी नऊ आले होते.

“भारतात सर्वाधिक गायी आहेत, पशुधन आहे. मात्र जगात प्रति गाय दुधाचे उत्पादन सर्वात कमी आहे. याचं कारण इथल्या लोकांना दिलेली चुकीची माहिती आणि काळानुसार न बदलणे,” हे त्यांचं निदान होतं. एकावेळी पाच पाच हजार गाईंचे गोठे सांभाळण्याऱ्या माणसानं ते सांगितलं म्हणजे खरंच असणार.

“ब्रिटनध्ये माणसांना पगार खूप द्यावा लागतो. त्यामुळे तिथे एवढा फार्म चालविण्यासाठी दोन किंवा तीन माणसे पुरतात. तुमच्या इथे माणसं मुबलक मिळतात. शिवाय त्यांना अनेक कामं करायला आवडत नाहीत. एक माणूस एकच काम करू पाहतो. गाई ढकलायला एक माणूस आणि मशीन चालू करायला दुसरा माणूस कशाला पाहिजेत? गाईंना एवढे आजार होतात त्यांच्यासाठी आम्हाला लसीसुद्धा मिळत नाहीत. फक्त तीन लसी घेण्यासाठी सरकारी परवानगी देत. इथं एवढ्या माशा आहेत, किडे आहेत त्यामुळे गाईंना खूप सांभाळावं लागतं. आता आम्ही इतक्या कडेकोट वातावरणात गाईंना ठेवलंय आणि त्यासाठी गुंतवणूक केलीय. पण सगळेच ते करू शकतील असं नाही,” त्यांचं सांगणं चालू होतं.

तिथे काम करणाऱ्या माणसांनी सांगितलं, की पायपर यांना जुजबी मराठी येतं. त्याच्या साहाय्याने त्यांनी हाताखालच्या माणसाला अगदी तयार केलंय. एका सहाय्यकाकडे बोट दाखवून ते विचारू लागले, “हाच माणूस जर जनावरांच्या खुराकाकडे लक्ष देऊ शकला, त्यांच्या बारीक सारीक बदलांकडे लक्ष ठेवू लागला, वेळेवर सगळी निरीक्षणे घेऊ शकला तर डॉक्टरची गरजच पडणार नाही. डॉक्टरचे काम फक्त आजारी प्राण्यावर उपचार करण्यापुरतेच राहतील. प्राण्यावर लक्ष ठेवण्याचं, रोगाचं निदान करण्याचं काम हाच माणूस करेल ना.” हे धोरण काहीसं सफल झालं असावंही कारण फार्मवर ठेवलेल्या कालवडींपैकी फक्त एक टक्का कालवडींचा मृत्यू झाला. शिवाय भारतात कालवडींचा वाढीचे सरासरी प्रमाण दररोज तीनशे ग्राम असताना या कालवडींचा वाढीचे प्रमाण दररोज नऊशे ग्राम आहे.

हा माणूस इतक्या दूर का आला असवा? हाच प्रश्न विचारला असता पायपरचे उत्तर होते,  “मला वेगवेगळ्या देशांमध्ये फिरायला आवडते. तिथली संस्कृती जाणून घ्यायला आवडते. दर दिवशी नवीन काहीतरी जाणून घ्यायला आवडते. शेवटी थेअरी सगळीकडे सारखीच असते. प्रात्यक्षक वेगवेगळे असतात. मी याच्यापेक्षाही उष्ण देशांमध्ये राहिलेलो आहे. त्यामुळे मला इथं फारसं वेगळेपण जाणवत नाही.”

फार्मजवळच्याच एका बंगल्यात पायपर राहतात. त्यांना कोणीतरी विचारलं,  “तुम्हाला इथं चर्च नाही मग कसं करता?” त्यावर त्यांचं उत्तर होतं, “माझा देव चार भिंतीच्या आत नाही. तो सगळीकडे आहे. त्यामुळे मला चर्चमध्ये जाण्याची गरज नाही. ”

दुग्धं दर्शयामि चीजं दर्शयामि

तयार झालेले चीज बाहेर पडताना “हे पहा, इथून दूध येतं, हे पहा, इथं त्याचं दही होतं. या टाकीत दही कडक करून त्याचे तुकडे पाडतात. पहा, इथून चीजचे तयार ब्लॉक बाहेर पडतात,” मिश्रा साहेब आम्हाला सांगत होते आणि आम्ही ‘वा वा’, ‘ओ हो’ करून वेळ मारून नेत होतो. त्या असंख्य नळ्या, नळ आणि टाक्या पाहून झाल्यानंतर लक्षात काय राहिलं असेल, तर सर्वात आधी दूध असतं आणि सर्वात शेवटी त्याचं चीज होतं.  हे एक सत्य शिकणं, यातच आमच्या बुद्धीचे चीज झाल्यासारखं आहे.

गोवर्धन या ब्रॅण्डने दुग्ध उत्पादन करणाऱ्या पराग मिल्क यांचा चीज उत्पादनाचा प्रकल्प मंचरजवळ आहे. आशियातील चीजचा हा सर्वात मोठा प्रकल्प आहे. कंपनीचे मालक देवंद्र शहा यांच्या आदेशावरून मिश्रा साहेब आम्हाला अख्खा प्रकल्प फिरवून दाखवत होते. त्यात दूध कुठं जमा होतं, कोणत्या टाक्यात जातं, किती डिग्रीवर उकळतं, हे सगळं कसं स्वयंचलीत आहे, कुठंही माणसाचा हात लागत नाही हे ते यथासांग सांगत होते. मात्र आमच्या टाळक्यात त्यातलं काही जाईल तर शप्पथ. बरं, हे त्यांना सांगता येईऩा. पत्रकार म्हणवून घेतात स्वतःला आणि इतकंही काही समजत नाही, असं त्यांना वाटण्याची शक्यता. मग त्यातल्या प्रत्येक गोष्टीला ‘मम’ म्हणण्याशिवाय आमच्याकडे पर्यायच काय होता?

यंत्रांच्या जंजाळातील चीजचे उत्पादन एक तर त्या सगळ्या आसमंतात दुधाचा वास पसरला होता.  मला त्या वासाने काहीसं अस्वस्थ व्हायला होत होतं. त्यात ते अगडबंब नळकांडे पाहिल्यावर काहीसं खट्टू व्हायला होतं. त्यात दुधाच्या पदार्थांबद्दल आमची पाटी अगदी दुधासारखीच पांढरी शुभ्र. त्यामुळं स्लाईसचं चीज आणि पिझ्झाचं चीज याच्यात काय फरक असतो हे आम्हाला कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. त्या अधिकाऱ्यांनी बिचाऱ्यांनी आपली कामं सोडून आमची ट्यूशन घ्यावी, अशी अपेक्षा तरी कशी करणार. त्यामुळे मुकाट्यानं ते जे सांगत होते ते ऐकून घेण्यापलिकडे आम्हाला काम नव्हते.

त्या तासाभराच्या धड्यानंतर लक्षात राहिलं एवढंच, की या कारखान्यात दिवसाला चाळीस टन चीजची निर्मिती होते आमि त्यासाठी चार लाख लिटर दूध दररोज लागतं. हे दूध साठवण्यासाठी तीन टाक्या बाहेर उभ्या केलेल्या आहेत. टॅंकरमधून सरळ या टाक्यांत दूध जातं आणि तिथून ते गरम होण्यासाठी जाते.  साधारण 30 अंश सेल्सिअस तापमानाला आल्यानंतर एका ठिकाणी 26 मिनिटांत त्याचं दही करण्यात येते. (विरजणासाठी वापरलेले पावडर डेन्मार्कहून आयात करण्यात येतं-मिश्रा) पुढच्या एका टाकीत या दह्यातील पाणी आणि मुख्य पदार्थ वेगवेगळे केले जातात. अगदी रवाळ स्वरूपात असलेल्या या मुख्य पदार्थाचेच नंतर चीज तयार केले जाते.  त्यातील एक चीज मोठ्या ठोकळ्यांच्या स्वरूपात कापले जाते आणि दुसरे पुढे पाठवून पिझ्झासाठीचे (बहुतेक मोझ्झेरेला) चीज तयार केले जाते.

Cheese storage शीतगृहात साठवलेले चीजगोवर्धनच्या ब्रॅण्डखाली अनेक उत्पादन तयार केले जातात. मात्र त्यातील मुख्य आहे चीजचे. महिन्याला 480 टन चीजच्या उत्पादनापैकी साधारण 320 टन कोरियाला निर्यात करण्यात येते.  आम्ही गेलो तेव्हा प्रकल्पाचे काही बांधकाम चालू होते. मात्र मिश्रा आणि त्यांचे सहकारी अगदी भरभरून आम्हाला कारखाना दाखवत होते. उत्पादनच नाही तर स्टोरेजसुद्धा. “आपको सिमला-काश्मीर देखना है,” असं विचारत त्यांनी कोल्ड स्टोरेजचा दरवाजा उघडला. एक सेकंदात उणे तापमानाची शिरशिरी पायांपासून सुरू होऊन अंगभर पसरली. तिथे अगदी चीजचे भांडारच ठेवलेले. बाहेरच्या जगात दुध टंचाई आणि दुधाच्या दरवाढीवर चर्चा चालू होती आणि तिकडे आम्ही दुधाचे भांडार बघत होतो.  त्या दुधाच्या स्रोताबद्दलच आम्हाला उत्सुकता होती. त्याबद्दल पुढच्या पोस्टमध्ये…

शेतकरी, ज्योतिषी व जादुगार

देशाचे कृषीमंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि जगभरातील शेतकऱ्यांचे तारणहार शरद पवार यांनी शेवटी आज साखरेचे भाव उतरणार असल्याची बहुप्रतिक्षित घोषणा केली. याबद्दल त्यांचे अभिनंदन केलेच पाहिजे. जनतेचा कडवटपणा बाहेर येईल, अशी  कोणती घटीका जवळ नसतानाही पवार यांनी अत्यंत तडफेने भाव उतरविण्याची किमया केली. त्यांचे हे भावनिक रूप जनतेला पहिल्यांदाच दिसलं आहे. आठवडाभरापूर्वी आपले हात झटकणाऱ्या जाणता राजाने आपल्या हातात काय काय कला आहेत, याचे दर्शनच घडविले जणू.

पवार हे मूळचे शेतकरी. तरीही त्यांना ज्योतिषी म्हणून कोण प्रसिद्धी दिली आणि त्यांची बदनामी (असं म्हणायचं असतं) केली कळत नाही.  नाही म्हणायला त्यांच्यात तशी काही लक्षणे आहेत. कोणी काही विचारलं, की आकडे फेकायचे आणि बऱ्याच दिवसांत कोणी विचारेनासे झाले, की कोड्यात पाडणारे काही तरी बोलायचे ही त्यांची खासियत. ही तशी ज्योतिषाचीच स्टाईल. ते नाही का असं आठव्या घरात शनी, नवव्या घरात रवी वगैरे वाक्प्रयोग साभिनय करतात. तसेच पवार साहेबही ‘चाळीस लाख लोकांना अडीचशे टन साखर,’ ‘तीन महिन्यांत सात टन ज्वारी’ वगैरे शब्दमौक्तिके उधळत असतात.

बिचाऱ्या जाणत्या राजांना दिल्लीत चारही दिशांनी घेरून त्यांची दशा-दशा करण्याची एकही संधी सोडत नाहीत लोकं. (लोकं म्हणजे पत्रकार आणि तत्सम निरुद्योगी मंडळी.) जगात सगळीकडे साखरेचे भाव वाढत असताना फक्त भारतातच ते कमी कसे काय असणार, हे पवार साहेब गळा खरडवून सांगत असताना ते कोणीच ऐकायला तयार नव्हतं. ज्योतिषांचंही तसंच असतं. ‘आम्ही काहीही सांगितलं तरी विधिलिखित बदलता येत नाही,’ हे त्यांचंही डिसक्लेमर असतंच की. मग?

शरद पवारएका बेसावध क्षणी, पत्रकारांनी विचारलं पवारांना आणि त्यांनीही सांगून टाकलं, “मी काही ज्योतिषी नाही साखरेचे भाव कधी उतरणार ते सांगायला.” पवारांचा कधीही देवावर विश्वास नव्हता आणि दैवावरही. त्यांना ओळखण्याऱ्या सगळ्यांना हे माहित आहे. (आता पवारांना कोणी पूर्णपणे ओळखू शकते, यावरही बहुतेकांचा विश्वास नाही हा भाग अलाहिदा. ) तरीही त्यांना कधी नाही तो अडचणीच्या काळात ज्योतिषी आठवला. (कधी नाही म्हणायचं कारण, पवार साहेबांना अडचण काय असते तेच माहित नाही. ) महाराष्ट्रात स्वतःच्याच लोकांकरवी त्यांनी उभ्या केलेल्या प्रतिमेनुसार, पवार साहेबांनी भल्याभल्यांच्या कुंडल्या मांडलेल्या आहेत तशाच बिघडविलेल्याही आहेत. त्यामुळे काही लोक त्यांनाच ज्योतिषी समजू लागले, तर त्यात लोकांचा काय दोष.

मात्र ज्योतिषांकडे नसलेली एक गोष्ट पवार साहेबांकडे आहे. ती म्हणजे धक्का देण्याची शक्यता.  हा त्यांचा हातखंडा प्रयोग. याबाबतीत एखादा जादुगारही त्यांचा हात धरू शकणार नाही. (कारण ते हाताने धक्का देतच नाहीत मुळी. फार फार तर असं म्हणता येईल, की घड्याळाने धक्का देतात. ) त्यातलाच एक प्रयोग आज त्यांनी केला. एका आठवड्याच्या आत साहेबांनी साखरेचे भाव उतरवून दाखविले बघा. हे जर एका आठवड्याच्या आतच होणार होतं, तर साहेबांनी तेव्हाच सांगितलं असतं तरी चाललं नसतं का? मात्र तसं झालं असतं, तर धक्का कसा बसला असता. एखाद्या कसलेल्या जादुगाराप्रमाणे त्यांनी जनतेला गाफिल ठेवले आणि भाव उतरल्याची घोषणा करून आज सगळ्यांचे तोंड गोड केले पहा. (कसलेले जादुगारच ते. शेतकऱ्याचे सुपुत्र असल्याने कधीकाळी शेतात कसलेलेच आहेत ते, असं त्यांचं म्हणणं आहे.)

आता या जादुगाराच्या या चलाखीवर टाळ्यांचे आवाज मला आताच ऐकू येऊ लागले आहेत. मागच्या वेळेस डाळीचे भडकलेले भाव कमी करण्यासाठी त्यांनी कोरियाहून खास न शिजणारी डाळ आणण्याची हातचलाखी केली होती. त्या टाळ्यांचे प्रतिसाद तुम्हालाही ऐकू येत असतील, कदाचित!

फोलपटराव भावनादुखीग्रस्त

image

नमस्कार मित्रहो, ज्यांच्या दुखावलेल्या भावनांची वेदना सगळ्या महाराष्ट्रात आज ठसठसत आहे अशा कार्यकर्त्यांना आपण भेटणार आहोत. या कार्यकर्त्यांचे नाव महत्त्वाचे नाही, कारण काही वर्षांनी ते सगळ्यांना एक नेते म्हणून परिचित होणार आहेत. समाजाच्या संवेदनशीलतेचा वातकुक्कुट म्हणून त्यांची आता ख्याती पसरत आहे. त्यांच्याच तोंडून त्यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

प्रश्नः कार्यकर्ते साहेब, आम्हाला एक सांगा, तुमच्या भावना दुखावण्यासाठी नक्की कोणत्या प्रकारचे निमित्त लागते

कार्यकर्तेः आमच्या भावना या लाईटबल्बमधील तारेसारख्या असतात. त्या नाही का विजेच्या थोड्याशा चढउतारानेही विरघळतात. आमच्याही भावनांनाही थोड्याशा हालचालीने लगेच धक्का पोचतो. एखादा शब्द, वाक्य, लेख, कथा, कादंबरी, चित्रपट, व्हिडिओ…इतकंच काय कोणी काही बोललं नाही तरी आमच्या भावना दुखावतात. आमच्या शहरातील एका प्रसिद्ध गल्लीचे नाव चुकीच्या पद्धतीने छापले म्हणून आमच्या संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या होत्या. दोन महिने तो मुद्दा आम्ही लावून धरला आणि एका वर्तमानपत्राला माफी मागायला लावली.

सहा महिन्यांपूर्वी सगळ्या पेपरनी आमच्या विरोधात बातम्या छापल्या म्हणून आम्हाला राग आला. आता गेला महिनाभर एक अक्षरही छापून आलं नाही. मग आमचा तिळपापड होणार नाही तर काय? सध्या महाराष्ट्रात थंडी जास्त पडली असल्यामुळे भावना दुखावल्या आहेत की काय, याची वैद्यकीय तपासणी चालू आहे. त्या तपासणीचा अहवाल आल्यावर कायदेशीर सल्ला घेऊन आम्ही थंडीमुळे दुखावलेल्या भावनांवर उपचार करण्याचा विचार करू.

प्रश्नः आम्हाला उत्सुकता आहे ते हे जाणून घ्यायची, की आपल्या भावना दुखावल्या आहेत हे नक्की कसं कळतं

कार्यकर्तेः त्याला नक्की असं ठोस उत्तर देता येणार नाही. खरं सांगायचं म्हणजे ज्याच्यामुळे आम्हाला त्रास होईल, असं काहीही वाचण्याची तसदी आम्ही घेत नाही. एवढं कशाला, आम्हाला अनुकूल असलेलं काही वाचण्याचेही काम आम्ही करत नाही. आमचे इतर माहितगार लोक असतात. त्यांच्या डोळ्यांखालून बरंच काही जात असतं. त्यातलं काही डोक्यात गेलं, की आम्हाला संकेत मिळतात. असे हात शिवशिवू लागले, की आता वेळ आल्याचे आम्हाला कळते. हा, काही बाबतींत मात्र आम्ही अगदी ‘जाती’ने लक्ष घालतो. त्याला इलाज नाही. बऱ्याचदा काय होतं, की इतरांची जास्त विचारपूस होऊ लागली की आम्हालाही मैदानात उतरावं लागतं. एकुणात सांगायचं म्हणजे त्याचं खास असं लक्षण नाही.

गेल्या आठवड्यातीलच गोष्ट. आमच्या एका ज्येष्ठ सदस्यांच्या कुत्र्याला कोणीतरी ‘हाड हाड’ म्हटल्याने आमच्या संघटनेत तीव्र नाराजी पसरली. आता ते कुत्रं तर काय आम्हाला तोंडाने सांगू शकत नव्हतं. त्यामुळे दोन दिवस आम्हाला ती घटना कळालीच नाही. दोन दिवसांनी एका पोराने आम्हाला ती घटना सांगितली. त्या दिवशी आम्ही ‘बोळ रोको’ करून त्या घटनेचा निषेध केला. अशा काही आक्षेप घेण्यासारख्या गोष्टी आम्हाला उशिराने लक्षात येतात. त्याच्यावर आम्ही उशिराने आवाज उठवतो.

प्रश्नः तुमचा हा नाराजीचा ताप चढायची लक्षणे नसतील तर मग उतरण्याची तरी काय लक्षणे आहेत?

कार्यकर्तेः आमचं म्हणजे बघा वाळूसारखं आहे. गरम जितक्या चटकन होते तितकंच शांतही होतं. समजा काही वावगं झालं, की फटकन आम्ही निषेध नोंदवतो. त्यासाठी फार विचार करण्याची गरज नसते. तसंच आमच्या दुखावलेल्या भावनांवर मलमसुद्धा मुबलक मिळतो. चार पेपरनी बातम्या लावल्या, एखाद्याने फोटो छापला, कोणा चॅनलने बाईट घेतला की जे काय वाईट वाटलं असेल ते आम्ही रद्दबातल करतो. इतकं सोपं आहे ते. त्यात सरकारने दखल घेऊन आम्हाला बोलावले, तर दुखावलेल्या भावनांना अत्यानंदाचा मुलामा चढतो.

काही दिवसांपूर्वीची गोष्ट. आमच्याकडे एका शाळेने सगळ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्याची सक्ती केली. आता पालिकेच्या शाळेने अशी सक्ती करणं बरं आहे का, तुम्हीच सांगा. मग आम्हीही घेऊन गेलो एक ‘शिष्ट’मंडळ त्या शाळेवर. तुम्हाला सांगतो, त्याला एवढी प्रसिद्धी दिली सगळ्यांनी. नंतर महापौरांनीही सांगितलं, असं नाही करता येणार. लगेच पंधरा दिवसांनी आम्ही आमच्या मंडळातर्फे महापौरांचा सत्कार केला.

आमची काही दुश्मनी नाही हो कोणाशी. फक्त समाजाच्या भल्यासाठी आम्हाला करावं लागतं हे सगळं.

पत्रकार दिन; दीन पत्रकार

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर (याबद्दल खरे तर संभ्रम आहे) यांच्या स्मृत्यर्थ आज आम्ही सगळ्यांनी पत्रकार दिन साजरा केला. आम्ही सगळ्यांनी म्हणजे ज्यांना वेळ मिळाला, ज्यांना वेळ काढावा लागला अशांनी. त्यात अर्थात मी नव्हतो. जागोजागी मार  खाऊन वर त्याच पत्रकारांना आपल्या धंद्याशी (आता तरी त्याला व्यवसाय म्हणण्याचे पातक करु नको) निष्ठा राखण्याचा उपदेश करण्याऱ्यांना ऐकण्याची काय गरज  आहे.

पुण्यात आज पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांवरील हल्ले असाच विषय ठेवला होता. त्यात झालेल्या भाषणांचा मतितार्थ काढायचा झाला, तर एवढाच निघेल की मराठी पत्रकारितेने बाळशास्त्रींपासून बालिशशास्त्रींपर्यंत जोमाने मजल मारली आहे. पगार नाही, सुरक्षितता नाही, साधने नाहीत आणि समाजात आता प्रतिष्ठाही नाही, अशा अवस्थेत पत्रकारांनी आता कोणत्या प्रकारची वस्तुनिष्ठ पत्रकारिता करावी, हे सांगणाऱ्यांना तरी माहित आहे का याबद्दल शंका आहे. योगेश कुटेवर हल्ला झाला, त्यानंतर त्याच्या बाजूने सेवलेकरचा निषेध करण्यासाठी तोंडदेखले का होईना, राजकारणीच पुढे आले. पत्रकारांना ज्यांचे पाठबळ असावे अशी अपेक्षा आहे ते लोकं कुठे होते?  चार दिवस पुण्यातल्या मोठ्या रस्त्यांवर आमची जमात फलक हाती घेऊन आरडा ओरडा करत होती आणि कुठल्याही व्यवस्थेवर साधा ओरखडीही उमटला नाही. आम्हीच घोषणा द्यायच्या, आम्हीच ऐकायच्या आणि आम्हीच त्याच्या बातम्या छापायच्या, असा मोठा गमतीशीर प्रसंग झाला. त्यानंतर न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा ज्यांची उभी हयात गुन्हेगारांच्या कृत्यावर काळा पडदा घालण्यात गेली त्यांनीच पत्रकारिता कशी भरकटली आहे, माध्यमांनी मूल्ये कशी पायदळी तुडविली याच्यावर भाषण दिले.

राज्य मराठी पत्रकार संघाने यंदाच्या दर्पण पुरस्कार सोहळ्यासाठी कोणाला बोलवावे मुग्धा गोडसे. वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर नट्यांचे छायाचित्र छापण्याबद्दल तक्रार करता ना, घ्या, आम्ही नट्यांना आता आमच्यातच सामिल करून घेतो. त्यानिमित्ताने तरी लोक आपल्या समारंभाला येतील, अशी  संस्थेला आशा वाटत असावी. एवीतेवी बहुतांशी वर्तमानपत्रांत सदर आणि लेख लिहिण्यासाठी नेटिव्ह (म्हणजे आपल्याकडे असलेल्या) पत्रकारांऐवजी नट-नट्या किंवा खेळाडूंसारख्या सेलिब्रिटींना मानाचे पान देण्याची प्रथा पडलेलीच आहे. वैचारिक मजकुराऐवजी सध्या चारिक मजकुराला अधिक मागणी आहे. पूर्वी लोक समाजात आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी एखाद्या संपादकाने शब्द टाकावा, लेखणी झिजवावी अशी आशा बाळगायचे. आता पेपरं तुरुंगातून सुटलेल्या साबित गुन्हेगारांकडून आपल्या निष्पक्षपाती पत्रकारितेचे टेस्टिमोनियल घेत आहेत.

खरी गोष्ट अशी आहे, की समाजाला आमची गरज आहे का नाही हेच आम्हाला कळेनासे  झालंय. त्या प्रश्नावर उत्तर शोधण्यापेक्षा हे दिवस घालणे चालू आहे.  हे असे धिंडवडे काढण्यापेक्षा पत्रकार दिनाचा कार्यक्रम घेण्याऐवजी दीन पत्रकार नावाचा तमाशा आयोजित करावा. त्यानिमित्ताने तरी लोकांना पत्रकार ही काय चीज आहे, हे कळेल.

दहावीनंतरची वीस वर्षे

परवा गुगल रिडरच्या सर्वात लोकप्रिय मजकुरांध्ये एक पोस्ट वाचली दहा वर्षांपूर्वीच्या परिस्थितीबद्दल. त्यात बहुशः अमेरिकेतील राजकीय आणि आर्थिक घडामोडींबद्दल लिहिलेले होते. त्यानंतर आज सहज विचार केला आपणही असा काहीतरी धांडोळा घ्यावा. मात्र दहा वर्षांपूर्वी एकविसाव्या शतकाच्या आगमनाचा विचार करण्यापूर्वी, एकोणीसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकाचा विचार केला.

तेव्हा लक्षात आले, अरे यंदा मॅट्रिकच्या वर्गात प्रवेश करून वीस वर्षे पूर्ण होत आहेत. मॅट्रिक पास होऊन पुढल्या वर्षी वीस वर्षे उलटतील. त्यामुळे पोस्टला शीर्षकही तेच दिले. मात्र खरंच तेव्हाच्या, म्हणजे 1990 च्या घडामोडी आता पाहिल्या तर आता खूप गंमत वाटते. काही वानगी बघूः

  • देशातील दुसरे बिगर काँग्रेसी सरकार पाकिस्तानला इशारे देण्याची पं. नेहरूपासून चालत आलेली परंपरा टिकवून होते. वर्षाच्या सुरवातीस दोन महिने जुने असलेले व्ही. पी. सिंह यांचे सरकार वर्ष संपेपर्यंत इतिहासजमा झाले होते. वर्ष सरता सरता चंद्रशेखर यांचे सरकार सत्तेवर आले आणि जागतिक बँकेकडे सोने गहाण ठेवण्याचे अपश्रेय घेऊन चार महिन्यांनी लयाला गेले.
  • देशात संगणक या शब्दाची चलती झाली होती तरी साधा टेलिफोनही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होता. एसटीडी पीसीओचे पिवळे बोर्ड मुख्य रस्त्यांच्या कोपऱ्या कोपऱ्यावर वाढू लागले होते मात्र त्यांचे दर लक्षात ठेवण्याची कसरत लोकांना करावी लागत होती. रात्री 11 नंतर सर्वात कमी दर असल्याने त्यावेळी संवाद साधण्याची घाई लोकांना करावी लागत असे. काही सरकारी कार्यालयांमध्ये मोठे संगणक दिसू लागत होते. इंटरनेट हा शब्द प्रचलीत होण्यासाठी आणखी पाच वर्षांचा अवधी लोटायचा होता. मायक्रोसॉप्टने विंडोज 3.0 बाजारात आणले.
  • महाराष्ट्राच्या तीस वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाने काँग्रेससमोर कडवे आव्हान निर्माण केले होते. शिवसेना भाजपऩे शरद पवारांच्या नाकी नऊ आणले होते. त्यातही आताचे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मुंबईतील 130 भूखंडांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून सत्ताधाऱ्यांच्या तोंडाला फेस आणला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हा शब्दसमु्च्चय तेव्हा तरुणांमध्ये चलनी नाणे होते. शिवसेनाप्रमुखांचीही तोफ तेव्हा धडाडत होती. त्यावर्षी झालेल्या निवडणुकीत पुणे-मुंबई रस्ता अडीच तासांचा करण्याची ठाकरे यांची घोषणा गाजली. ती पूर्ण करण्यासाठी आणखी नऊ वर्षे लागली.
  • फेब्रुवारी महिन्यात झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने निसटत्या बहुमताने निवडणूक जिंकली. लोकसभेतील पराभवानंतर काँग्रेसला हा मोठा धक्का होता. देश में काँग्रेस हारी है, अब महाराष्ट्र की बारी है ही तेव्हाची घोषणा होती. शरद पवार यांनी मार्च महिन्यात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. निवडणुकीनंतर मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते म्हणून नेमल्याने भुजबळ रुष्ट झाले. त्याची परिणती पुढे त्यांनी शिवसेना सोडण्यात झाली.
  • सध्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणुकीतील पराभव पचवून राज्यसभेवर नियुक्ती मिळवली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख व सुशीलकुमार शिंदे शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत होते.  या दोघांनी वर्षाच्या शेवटी पवार यांच्या विरोधात बंड केले. सुमारे 13 दिवसांच्या नाट्यानंतर ते बंड अयशस्वी झाले. मात्र त्यानंतर 95 साली झालेल्या निवडणुकीत विलासरावांना पराभवाच्या रुपाने या बंडाची किंमत चुकवावी लागली. मुख्यमंत्री पदावर डोळा असलेले नारायण राणे व आर. आर. पाटील पहिल्यांदाच विधानसभेवर निवडूऩ आले.
  • राष्ट्रीय पातळीवर ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढून हवा निर्माण केली. त्यांच्या या यात्रेला बिहारमध्ये अडवून लालूप्रसादांनी कडी केली. तोपर्यंत केवळ नऊ मुलांचे बाप एवढी ओळख असलेल्या लालूंनी स्वतःची ओळख निर्माण केली. तिकडे अडवाणींनी या यात्रेच्या बळावर पक्षाचे पारणे फेडले.  दोन आकडी असलेली पक्षाच्या लोकसभेतील सदस्यांची संख्या त्यांनी तीन आकड्यांवर नेली. त्यातून पुढे बाबरी मशिदीचे रामायण घडले.
  • कोका कोलाला भारतातून हद्दपार केल्यानंतर 20 वर्षांनी पेप्सीला सरकारने परवानगी केली. पेप्सी  आणि सेव्हन अप यांनी भारतात धुमाकूळ घालायला सुरवात केली तरी ती प्रसिद्धीपुरती. पारलेच्या थम्स अपने पेप्सीला पाय रोवण्याची फारशी संधी दिली नाही. मात्र पाच वर्षांनी कोकच्या आगमनानंतर पारलेने दाती तृण धरले.
  • झोंबी या कादंबरीसाठी आनंद यादव यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
  • 63 वे साहित्य संमेलन पुण्यात झाले. संत साहित्याचे अभ्यासक डॉ. यू. म. पठाण हे संमेलनाचे अध्यक्ष होते.
  • व्ही. शांताराम यांचे ऑक्टोबर महिन्यात निधन झाले.
  • डॉलरचा भाव 31 रुपयांच्या जवळपास होता. पुढच्याच वर्षी सरकारने रुपयाचे दोनदा अवमूल्यन केले. त्यामुळे हा भाव 37 ते 40 रुपयांच्या जवळपास पोचला.
  • 27 वर्षांचा तुरुंगवास भोगल्यानंतर नेल्सन मंडेला यांची फेब्रुवारी महिन्यात सुटका झाली.
  • 8 जुलैला पश्चिम जर्मनीने शेवटचा फुटबॉल विश्वचषक जिंकला. त्यानंतर तीन महिन्यांच्या आत, 3 ऑक्टोबर रोजी  पश्चिम आणि पूर्व जर्मनीचे एकीकरण झाले व 94 साली एकसंघ जर्मनी स्पर्धेत उतरला.
  • सद्दाम हुसेन यांनी बहुचर्चित आणि शेवटी त्यांच्या ऱ्हासास कारणीभूत ठरलेले कुवैतवरील आक्रमण याच वर्षात केले. 2 ऑगस्ट रोजी इराकचे रणगाडे कुवैतमध्ये शिरले. त्यानंतर जॉर्ज बुश यांनी त्यांच्या पाडाव करण्याचा विडा उचलला. धाकट्या बुश महाशयांनी ते काम 16 वर्षांनी पूर्ण केले. सद्दाम यांच्या आक्रमणानंतर पहिल्यांदाच भारताला पेट्रोल टंचाई काय असते, याचा अनुभव आला. त्यावेळी पेट्रोल बचतीच्या जाहिरातींचा मारा सुरू झाला. आर्थिक उदारीकरणानंतर काही वर्षे त्या नाहिशा झाल्या. याच वेळेस कुवैतमधून भारतीय लोकांनी भरलेली खास विमाने येण्यास सुरवात झाली.
  • लोकांच्या मनोरंजनाची जबाबदारी खासगी वाहिन्यांनी उचलण्यास आणखी अवकाश होता. त्यामुळे दूरदर्शनचे राष्ट्रीय केंद्र आणि मुंबई केंद्र इतरांची नक्कल करण्याऐवजी स्वतःच्या हिकमतीवर कार्यक्रम सादर करत होते.

सर्वेक्षण माहिती कशी मारून टाकतात

पत्रकार हे सर्वेक्षणाचे सर्वात मोठे गिऱ्हाईक असतात. चुकीची माहिती देण्याची ती एक पद्धत आहे.

सर्वेक्षण करायचे का माहिती द्यायची, ही निवडीची बाब आहे. सर्व विषयांवर आणि कोणत्याही बाबीत का असेना, पाहण्या छापण्याची किंवा दाखविण्याची माध्यमांना सवय असते. राजकीय बातम्यांमध्ये सर्वाधिक वापरली जाणारी ती पद्धत असते. 2009 वर्ष संपताना, पारंपरिक पाहण्या ही या वर्षाची लाक्षणिक घटना असल्याचे आपण पाहिले आहे. माध्यमं आपल्या कर्मचाऱ्यांना कमी पगार देतील पण पाहण्या करणाऱ्या कंपन्यांना कमी पडू देणार नाही.

सर्वेक्षणांमध्ये दडलेली माहिती, कोणत्याही प्रकारे वाकविली नाही, तिच्यातून अर्थ काढली नाही तर जवळपास नसतेच. तरीही राजकारणी, पत्रकारांना त्यावर भाष्य करायला का आवडते? पहिले कारण सोपे आहे. ते वस्तुनिष्ठ आणि गंभीर असल्याची एक प्रतिमा आहे. त्यावर अधिक चौकशी करायला, त्याचे गहन विश्लेषण करणे सोपे नसते. आपले काम झाकण्याची ती एक पद्धत आहे.

मतांचे प्रसारण

हे अशाप्रकारे झाकण्याला आणखी एक समर्थन आहे. पत्रकाराला त्याचे मत सिद्ध करण्यासाठी काहीतरी हवे असते. त्याला जे काय मांडायचे असते ते खरे आहे हे त्याला दाखवून द्यायचे असते. “हे माझे मत नाही. हा एक निष्कर्ष आहे,” असं त्याला सांगायचं असतं. त्याचा निष्कर्ष हा त्याच्याकडे असलेल्या माहितीवर अवलंबून नसतो तर लोकांना रसप्रद वाटेल, अशा पाहण्यांच्या आवरणाखाली असतो. तो स्वतः पुढाकार न घेता बचावात्मक धोरण घेतो. माहिती न मांडता तो एखादे मोघम मत पुढे प्रसारीत करतो.

हे पुढे मांडलेले मत लोकांपुढे अतिशय चुकीचे चित्र निर्माण करते. पत्रकार या वाचकाला संवाद साधण्यासाठी योग्य अशी व्यक्ती न मानता, जे काय कोणत्यातरी विषयावर मत माडंले आहे ते स्वीकारणारी वस्तु समजतो.  असं मत जे व्यक्त करण्यापेक्षा राखून ठेवलेले बरे वाटावे. स्वाभाविकच, पत्रकार चाकोरीत अडकून किंवा तिला बळी पडून सर्वेक्षणांचे निष्कर्ष पुढे ठेवतो. मात्र त्यातून तो माहिती पुरविण्याची स्वतःची जबाबदारी टाळतो.  त्यातून पत्रकाराची भूमिकाही गमावतो.

————-

पत्रकारितेच्या विषयावरील एका फ्रेंच ब्लॉगचा स्वैर अनुवाद. त्यातील काही संदर्भ फ्रेंच भाषक देशांतील असले तरी आपल्याकडेही सर्वेक्षणांची जी प्रथा बोकाळली आहे,  तिला हे लागू पडते.