नांदेड…महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेल्या या शहराला गेल्या महिन्यापासून मुख्यमंत्र्याचे शहर म्हणून ओळख मिळाली आहे. वास्तविक अशोक चव्हाण यांचा मतदारसंघ मुदखेड. मात्र त्यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरवात त्यांनी या शहरापासून केली आणि तेव्हापासून त्यांची तीच ओळखच बनली. अशोकरावांचे वडील कै. शंकरराव चव्हाण हे नांदेडचे पहिले नगराध्यक्ष. त्यांच्यामुळे देशाच्या नकाशावर या शहराला ठळक स्थान मिळाले. १९८६ मध्ये खासदारकीची निवडणूक लढवून अशोकरावांनी येथूनच त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले. मात्र नंतर १९९० साली पराभव झाल्याने त्यांनी हा मतदरासंघ बदलला. मात्र आता ते मुख्यमंत्री झाल्याने नांदेडला एक आगळा मान मिळाला आहे. एकाच शहरातील दोन व्यक्ती मुख्यमंत्री होण्याची ही राज्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. आता येत्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्ता मिळाल्यास अजित पवार मुख्यमंत्री होतील व बारामतीलाही तो मान मिळेल. मात्र त्यातही पहिलेपणाचा मान नांदेडचाच. तरीही शहरात फिरताना मुख्यमंत्र्यांची चापलुसी करणारे बॅनर्स फारसे दिसत नाहीत, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.
नांदेड झपाट्याने बदलत आहे. अगदी ओळखू न येण्याइतपत. मात्र हा सारा बदल केवळ तीन–चार वर्षांतील आहे. अनेक वर्षांनंतर शहराचा फेरफटका मारून या बदलाचा आढावा घेतला.
![]() |
से Nanded |
सध्या दिल्ली ते बंगळूर धावणाऱया एक्स्प्रेस गाड्यांची वर्दळ नांदेडच्या स्थानकावर चालू असते. तिकिट तपासनीस कठोरतेने तिकिट तपासतात आणि फलाटांवर गप्पा मारणाऱयांपेक्षा प्रवाशांची संख्या अधिक दिसते. थोडक्यात म्हणजे गावाचा प्रवास शहराकडे होतोय!
![]() |
से Nanded |
गोदावरी ही नांदेडची ओळख मानण्यात येते. खरं तर पावसाळ्यात दुथडी भरून वाहताना गोदावरी पाहण्यात जी मजा आहे ती अन्य कशात नाही. मात्र ते पाणी अन्य ऋतुंत तसेच वाहिल याची खात्री नाही. शिवाय वाढत्या लोकसंख्येचे दुखणेही नाल्याच्या रुपाने तीला वाहावे लागते. गोदावरीची अगदीच मुळा मुठा झालेली नाही. त्यामुळे अजूनही तीत पाणी आणि रसायने वेगवेगळी ओळखता येतात. शिवाय नांदेडमध्ये उद्योग चालण्यापेक्षा बंद पडण्याचेच प्रमाण अधिक असल्याने त्या तुलनेत अजूनही येथे ‘पाणी’ वाहते.
अगदी अलिकडे , कदाचित गुरु–ता–गद्दीच्या निमित्ताने असावे, पण गोदावरीच्या एका काठाचे चांगलेच सुशोभीकरण झाले आहे. नव्या पुलावरून (तसा तो बांधूनही तीस–एक वर्षे झाली असतील पण निजामाच्या राजवटीत बांधलेल्या पुलाच्या तुलनेत तो नवा आहे), सायंकाळच्या वेळी गुरुद्वारा लंगर साहिब, गुरुद्वारा नगीना घाट असे ओळीने गुरुद्वारे रोषण झालेले असतात. नदीवर नव्याने बांधलेले घाट या गुरुद्वारांवरील दिव्यांच्या उजेडात नदीपात्रातील आपले सुंदर प्रतिबिंब न्याहाळत असतात. केंद्र सरकारकडून आलेल्या १३०० कोटी रुपयांपैकी काही अंश तरी खर्च झाला आहे, हे या सुशोभित घाटांवरून दिसून येते. एरवी गोवर्धन घाटापासून नगीना घाटपर्यंत पूर्वी घाणीचेच साम्राज्य होते. त्याजागी ही रम्य आणि सुशोभित जागा माणसांना किमान पाच मिनिटे तरी खिळवून ठेवते. ही नव्याची नवलाई न ठरता कायमस्वरूपी हेच दृश्य दिसावे, अशीच इच्छा प्रत्येकाच्या मनात आहे.
म्हातारा इतुका न…
![]() |
से Nanded |
नाही. मी या पुतळ्याबद्दल बोलत नाही आहे. हा पुतळा सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे. निजामाच्या जोखडातून मराठवाड्याला सोडविल्याबद्दल कृतज्ञता म्हणून तो उभारण्यात आला आहे. त्यांच्या मागे जो टॉवर आहे, तो मात्र सुमारे शंभर वर्षांपूर्वीचा आहे. एकेकाळी सर्वात उंच बांधकाम म्हणून तिला मान होता. आता अवतीभवतीच्या इमारती आणि मुख्यतः गल्लीभूषण, रस्ताभूषणांच्या बॅनरची गर्दी झाल्यामुळे टॉवरची रया गेल्यात जमा आहे. आधी साध्या चुन्याच्या असलेल्या टॉवरला पंधरा पर्षांपूर्वी काळ्या टाईल्सचे चिलखत लावण्यात आले. त्यामुळे तो बिचारा आणखी बापुडवाणा दिसू लागला. शिवाय त्यामुळे आजूबाजूच्या परिसरात उष्णता वाढू लागल्याचेही वाद सुरू झाले. आता यंदा जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुननिर्माण योजनेच्या निमित्ताने त्याला पुन्हा मेक–अप करण्यात येत आहे. तो झाल्यावर टॉवर पुन्हा नायक होणार, चरित्र नायक होणार का एखादे विनोदी पात्र बनून वर्तमानाची खिल्ली उडविणार, काळच जाणे. (कारण त्याची साक्ष काढायला टॉवरवरचे घड्याळ अद्याप चालू आहे.)
तरी उघड्यावर असल्याने टॉवर सुदैवाने लोकांना दिसतो तरी. नांदेडमध्ये एक किल्ला आहे हे त्या शहरात राहणाऱया अनेकांना माहितही नाही. गोदावरीच्या काठीच वसलेल्या त्या नंदगिरीच्या किल्ल्यावर पालिकेने (आता महापालिकेने) कब्जा करून तिथे डंकिन केले आहे. त्यामुळे सामान्य लोकांना तिथे प्रवेशच नाही.
तीन सौ साल गुरु दे नाल
![]() |
से Nanded |
![]() |
से Nanded |
शीख संप्रदायाचे नांदेडशी असलेले नाते शहरात जागोजागी दृष्टीस पडते. त्यात काही असाहजिक आहे, असे मला वाटतही नाही. गुरु गोविंदसिंह रुग्णालय, श्री गुरु गोविंदसिंह इंजिनियर कॉलेज अशा संस्था आहेत, तशा गुरु गोविंदसिंह चषकासाऱख्या हॉकी स्पर्धा आहेत. अशा बाबी पाहून अनेकांना नांदेड महाराष्ट्रात आहे का पंजाबमध्ये असा प्रश्न पडतो. त्यात शहरात सर्रास वापरण्यात येणारी हैदराबादी हिंदी…तो एक वेगळाच सांस्कृतिक धक्का आहे. विशेष म्हणजे नांदेडमधील शीखांची भाषा पंजाबी शीष अगदी थट्टेवारी नेतात.
नांदेडचा मुख्य गुरुद्वारा, सचखंड साहिब हा गुरु गोविंदसिंग यांच्या समाधीस्थळी बांधलेला आहे. राजा रणजितसिंह यांनी त्यांच्या कालखंडात या गुरुद्वाऱयाचे बांधकाम करवून घेतले. गुरु गोविंदसिंग यांचे दागिने, शस्त्र येथे ठेवलेले आहेत. मुख्य म्हणजे ते सर्वसामान्यांना पाहताही येतात. केवळ चॅनेल किंवा माध्यमांसमोर तोंड उघडणाऱया बोलघेवड्या विश्वस्तांपुरते ते मर्यादित नाहीत. प्रत्येक शीख व्यक्तीला त्याच्या उत्पन्नाच्या दहा टक्के हिस्सा गुरुद्वाऱयाला द्यावा लागतो. शिवाय वयाच्या साठाव्या वर्षीपर्यंत एकदा तरी सचखंड साहिबचे दर्शन घ्यावे लागते. त्यामुळे घुमटाला सोन्याचा पत्रा आणि आत सोन्याची नक्षी असलेल्या या प्रार्थनास्थळाला उत्पन्नाची वानवा नाही. मात्र एकूणच भक्तांना देवाआधी दानपेटीचे दर्शन घडविण्याची जाज्वल्य परंपरा गुरुद्वाऱयांमध्ये नसते. तरीही, अगदी आपापल्या क्षेत्रात मोठी उंची गाठलेली मंडळी येथे भक्तीभावनेने सेवा करतात. इंग्लंडमध्ये मोठा उद्योग सांभाळणारी आसामी येथे येणाऱ्यांची पादत्राणे सांभाळत असते तर पी. एचडी. केलेले प्राध्यापक लंगरमध्ये वाढपी काम करतात. तेथे कोणीही कोणत्याही प्रकारचा बडेजाव नाही. गुरु गोविंदसिंग यांच्याशी संबंधित आठ गुरुद्वारे नांदेडमध्ये आहेत. शिवाय घोड्यांची पागाही आहे. पंजाबमधील अत्यंत उंची जातीचे घोडे येथे पाहायला मिळतात. होळी आणि दसऱयाला हे पांढरेशुभ्र घोडे जेव्हा शहरात मिरवणुकीने फिरतात, त्यावेळी डोळ्यांचे पारणे फिटते.
सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिपथं
![]() |
से Nanded |
पुढे मी अमेरिकन लायब्ररी, ब्रिटीश लायब्ररी, एशियाटिक सोसायटी (सेंट्रल लायब्ररी), मॅक्स म्युल्लर भवन, पुण्यातील नगर वाचन मंदिर व विभागीय ग्रंथालय अशी अनेक वाचनायलये पालथी घातली. मात्र रा. म. लो. वाचनालयासारखा मोकाट संचार कुठेही केला नाही. त्या वाचनालयात पुस्तके फारशी उत्कृष्ट होती, सुविधा चांगल्या होत्या अशातला भाग नाही. मात्र तेथील कर्मचारी वर्ग आमचा दोस्त झाला होता शिवाय आम्हाला हवं ते तिथे मिळत होतं. ते वाचनालय उभं असलेली जमीन बोडकी झालेली परवा पाहिली आणि त्या सगळ्या आठवणी आल्या. सर्वे यस्य वशात् गात् स्मृतिगात्पथं कालाय तस्मै नमः….!
———————