नेहमीच्या शहरी गुत्त्यावरची, म्हणजेच बीअर बारमधील एक संध्याकाळ. नेहमीचीच चार, म्हणजे चार वेगवेगळ्या वर्तमानपत्रांतील आणि वाहिन्यांतील कार्यकर्ते. चर्चा नेहमीसारखीच म्हणजेच त्या दिवशीच्या महत्त्वाच्या, म्हणजे प्रत्येकाच्या गळ्यात पडलेल्या बातम्यांची. घशाखाली उतरणाऱया प्रत्येक घोटाबरोबर प्रत्येक बातमीची चिरफाड आणि शवविच्छेदन चालू. त्यातच जगात कोणाच्याही डोक्यात न आलेली गोष्ट आपण कशी केली आणि त्यावर (काहीही न समजणाऱया) वरिष्टांनी कसा बोळा फिरविला याची साग्रसंगीत वादावादी चालू। हेही नेहमीचेच. फक्त नेहमीसारखी एकच गोष्ट त्या ठिकाणी आहे ती म्हणजे या चार चतुरांच्या सोबत एक पाचवा, पण न पचवणाराही सामील आहे.
“हो रे, जाम बोर झालं,” दुसरा ओलेता आवाज जणू काही आपणच सर्वांची भाषणे लिहून दिल्याप्रमाणे सांगतो.
“आडवाणी म्हणजे बोगस माणूस. उगीच बडबड करत होता,” तिसरा कॉकटेल आवाज. यावेळी त्या आवाजाच्या मालकाला प्रत्यक्ष पाहिलं असतं तर खुद्द आडवाणींनाही आपली आख्खी राजकीय कारकीर्द फुकट घालविल्याचे आगळे समाधान लाभले असते. चौथा आणि त्यानंतर परत पहिला ते तिसरा असे आळीपाळीने मग मायावती, लालूप्रसाद, करात, चंद्राबाबू नायडू, शरद पवार यांना काडीचीही अक्कल कशी नाही, याची ग्वाही देत देतात. बरं झालं, जॉर्ज बुश किंवा महात्मा गांधी यांचा या नाट्यात सहभाग नाही. नाही तर त्यांनीही राजकारण आणि प्रशासनाचे धडे याच बारमध्ये बसून कसे घ्यावेत, यावर या चौघांनी बौद्द्धिक घेतले असते, याबाबत पाचव्याला शंका उरत नाही.
एव्हाना पहिली फेरी संपलेली असते। दुसऱया फेरीची मागणी झालेली असते. स्वतःची शुद्ध घालवून बसलेले हे चौघे योग्य का शुद्धीवर असूनही निर्बुद्धासारखे बसलेले आपण मूर्ख असा प्रश्न पाचव्याला पडतो.
“बेस्ट. आपल्या विदर्भाच्या दोन बायांचे उल्लेख केले. त्यांच्या घरी जाऊन आला तो,” चौघांपैकी एकजण बरळण्याच्या सीमारेषेवर उभ्या असलेल्या आवाजात बोलतो.
“तुला माहितेय का, तो जो बोलला ना, की गरीबीचे निर्मूलनही ऊर्जेतूनच होणार आहे, ते भारीच होतं. सही पॉईंट काढला ना, ” आणखी एक कापरा आवाज बोलला.
“आपण मानलं त्याला. नाहीतर हे लोकं,’ पुन्हा सर्व नेत्यांचा उद्धार करत दोन आवाज एक साथ बोलले.
दुसरी फेरी संपत आलेली असते। कोसळण्याच्या बेतात आल्याशिवाय सगळ्या ज्ञानाचे हलाहल पिण्याचे कार्य थांबवायचे नाही, या नेहमीच्या संकेताला अनुसरून तिसरी फेरी सुरू होणार असते.
