फोलपटराव, निर्माते-दिग्दर्शक

मुलाखतकारः नमस्कार, आज आपणblog भेटणार आहोत प्रसिद्ध चित्रपट निर्माते व दिग्दर्शक फोलपटराव यांना. खरं तर प्रेक्षक आणि वाचक यांना फोलपटरावांची वेगळी ओळख करून देण्याची आवश्यकता भासू नये. झपाट्याने अस्तंगत होणारे टांगाचालक, पाठ्यपुस्तके विक्रेत्यांच्या हृदयद्रावक समस्या अशा विविध विषयांवर त्यांनी चित्रपट काढले आहेत. तर आज आपण त्यांना पहिला प्रश्न हाच विचारू या, की अशा वेगळ्या वाटांनी जाणारे चित्रपट काढण्यामागची त्यांची प्रेरणा काय आहे.

फोलपटरावः मी मुळात चित्रपट व्यवसायाकडे वळलो अपघाताने. बारावी झाल्यानंतर योगायोगाने मला खूप गुण मिळाले. त्यामुळे वैद्यकीय शाखेत प्रवेशही मिळाला. मात्र ते शिक्षण घेत असतानाच, डॉक्टर झालेल्या माणसाने कलेच्या प्रांतात जावे अशी एक साथच असल्याचे माझ्या लक्षात आले. मग वैद्यकीय अभ्यासापेक्षा याच विषयाचा मी अभ्यास करायला लागलो. त्याच तंद्रीत असताना एकदा माझ्या दुचाकीचा अपघात झाला. त्यावेळी दवाखान्यात दाखल असताना रात्रपाळीतील नर्सेसच्या हालअपेष्टा मी दिवसरात्र जागून पाहत होतो. त्याचा परिणाम म्हणून मला दवाखान्यातून पंधरा दिवसांऐवजी एका आठवड्यातच डिस्चार्ज देण्यात आला. याच अनुभवातून माझा पहिला चित्रपट सलाईन आणि ऑक्सिजनचा जन्म झाला.

प्रश्नः या चित्रपटाच्या अनुभवाचा मग पुढील कलाकृतीच्या वेळी तुम्हाला कसा फायदा झाला.

फोलपटरावः खूपच. म्हणजे हा माझा पहिला चित्रपट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मदतीने बनविण्यात आला होता. त्यामुळे पुढील काळात प्रत्येक चित्रपटासाठी कोणाला कसे बनवायचे, यात मी एक्स्पर्ट झालो. शिवाय ओसाड फेस्टिव्हल, रान फेस्टिव्हल अशा महोत्सवांमध्ये त्याचे प्रदर्शन झाले. त्यामुळे करपरती आणि राज्य सरकारच्या अनुदानातून काहीही तयार केले तरी ते खपविता येते, हे मला कळाले. हा चित्रपट जेव्हा आपल्याकडे प्रदर्शित झाला तेव्हा मात्र मला काहीसा वेगळा अनुभव आला. काही प्रेक्षकांनी मला पत्र पाठवून या चित्रपटामुळे खूपच मनोरंजन होते, अशी तक्रार केली. त्यामुळे पुढील सगळ्या चित्रपटांमध्ये 10 टक्के मनोरंजन आणि 90 टक्के चर्चासत्र असायलाच हवा, यावर माझा कटाक्ष आहे. त्यामुळे लोकंही त्यांना प्रतिसाद देतात.

प्रश्नः तुमचा नवा जो चित्रपट आहे, काळा कोळसा सर्वकाळ, त्याची मध्यवर्ती कल्पना काय आहे

फोलपटरावः आता हा जो चित्रपट आहे तो आहे कोळशाच्या नामशेष होत चाललेल्या वखारींच्या संदर्भात. सुमारे दीड दोन शतके अनेक घरांत ज्यांनी चूल पेटविली, त्या कोळशांच्या वखारींना एक सांस्कृतिक महत्व आहे. कोळशाच्या काळ्या रंगातून अनेक जीवनांमध्ये रंग भरले. कित्येक मोठ्या व्यक्ती पूर्वी स्वतः जाऊन कोळसे विकत घेत. मात्र आज गॅस आणि ओव्हनच्या काळात ही संस्था काळाच्या पडद्याआड जात आहे. त्यामुळे त्यावर एक चित्रपट तयार करावा, असे मी ठरविले. सुदैवाने केंद्र सरकारच्या ऊर्जा बचत ब्युरोच्या अधिकाऱ्यांनाही ही कल्पना पटली. त्यामुळे त्यांनीही लगेच चित्रपटासाठी अनुदान मंजूर केले. कोळशाची वखार चालविणाऱ्या एका घराण्यातील तीन पिढ्यांची ही कथा आहे.

प्रश्नः ही कल्पना तुम्हाला कशी सुचली

फोलपटरावः काय झालं, की माझ्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिग्नलमन या चित्रपटाच्या एका शोला मी गेलो होतो. आता माझ्या बहुतेक चित्रपटांमध्ये सिल्हौट पद्धतीने चित्रीकरण केलेले असल्याने अंधाराला मुख्य स्थान असते, हे तुम्हाला माहित आहे. तर त्या शोला पडद्यावर बराच वेळ अंधार असल्याने एका प्रेक्षकाने, कदाचित खेड्यातला असावा तो, अस्वस्थ होऊन काडी पेटविली. त्यावेळी मला वाटले, की या काडीमुळे मल्टिप्लेक्सच्या खुर्च्यांनी पेट घेतला तर…अन् यातूनच काळा कोळसा सर्वकाळचा जन्म झाला. अर्थात् नेहमीच्या पद्धतीने यात मी मुख्य कथेऐवजी पात्रांचे रडके चेहरे, भक्क अंधार आणि दीनवाणे संगीत यांनाच जास्त महत्व दिले आहे.

प्रश्नः चित्रपटसृष्टीत एक दशक घालविल्यानंतर आणि एवढे चित्रपट काढल्यानंतरही तुम्हाला एकही पारितोषिक मिळालेले नाही, याची खंत वाटते का

फोलपटरावः बिल्कुल नाही. पारितोषिकांच्या स्पर्धेवर माझा कधीही विश्वास नव्हता आणि आजही नाही. कारण मला पारितोषिक मिळणार नाही, याची मला खात्री आहे. माझ्या दृष्टीने थिएटर किंवा मल्टिप्लेक्सला चांगल्या मूडमध्ये आलेला प्रेक्षक अस्वस्थ होऊन गेला पाहिजे, हीच मोठी गोष्ट आहे. नांगरलेली नांगी या चित्रपटाच्या वेळची गोष्ट आहे. चित्रपटाचा मुख्य नायक, एक पाप्याचे पितर असलेला शेतकरी, अत्यंत दयनीय, केविलवाण्या परिस्थितीत शेतात माजलेले तण उपटून काढत असतो, असे एक दृश्य त्या चित्रपटात आहे. ते दृश्य पाहून अनेक प्रेक्षक स्वतःचे केस उपटायला सुरवात करत असत, हे मी माझे सर्वात मोठे पारितोषिक समजतो.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता

फोलपटरावः माझे एकच सांगणे आहे. लक्षात ठेवा, आपण समाजाचे काही देणं लागतो. त्यामुळे काहीही समस्याग्रस्त दिसलं की ते समाजाला देऊन टाका. आपण समस्येची उत्तरं द्यावीच, असं नाही. त्यामुळे जी काही मिळेल ती समस्या शोधा आणि त्या सगळ्यांना. सुदैवाने सध्या मराठी चित्रपटांत अनेक वेगळे प्रयोग होत आहेत. त्यात नजरबंदीचा हाही प्रयोग सर्वांनी करावा, असे मला वाटते.

अभ्यासक्रमः त्यांचा आणि आपले

Untitledनास्तिक मताचे आधुनिक अध्वर्यू असलेल्या करुणानिधी, रामस्वामी पेरियार आदींच्या विचारांवर आधारित अभ्यासक्रम चेन्नई विद्यापीठ तयार करत आहे. त्यामुळे येत्या काही काळात तेथे एम. ए. (करुणानिधी) असे  द्वीपदवीधर होऊ घालतील. नास्तिक मतांचाच अभ्यासक्रम त्याला कोणाही पुरोगाम्याचा विरोध होणार नाही, ही काळ्या फळ्यावरची रेघ आहे. बाकी, ईश्वरावर श्रद्धा नसलेल्याला नास्तिक म्हणून त्याची शिकवण इतरांना देणार. पण ज्याची शिक्षणावर श्रद्धा नाही, अशा माझ्यासारख्या नतद्रष्टांचे काय करणार, हे आजपर्यंत ही शिक्षणव्यवस्था ठरवू शकलेली नाही. कांचीच्या शंकराचार्यांच्या मठापुढे एक मशीद आधी होतीच. तिच्याही पुढे पेरियारचा पुतळा उभारून अपशकुन करणाऱ्या करुणानिधींना त्यांची ती प्रसिद्ध हिरवी शाल लाभाची आहे म्हणे. शिवाय प्रत्येक निवडणुकीच्या आधी ज्योतिषाचा सल्ला आहेच. आता अशा व्यक्तिंच्या जीवनचरित्रातून एखाद्याला तत्वज्ञानाचा कोळ काढता येईलही.  त्यातून कोणाच्या पोटापाण्याचा प्रश्न निकालात निघत असेल, तर आपण त्यात खोडे घालणे चांगले नाही, असे मला वाटते. उलट माझं तर म्हणणं आहे, की मद्रास विद्यापीठाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील विद्यापीठांनीही अशी, हयात असलेल्या आणि अविचारात हयात घालविलेल्या नेत्यांवर अभ्यासक्रमाची गिरणी काढावी. त्यामुळे राजकारणात येऊ घातलेल्या विद्यार्थ्यांनाही त्यांना रसप्रद वाटेल, असं काहीतरी शिकता येईल. शिवाय राजकारणाचा दांडगा अभ्यास करणाऱ्या प्राध्यापकांनाही तो शिकविताना फारशी अडचण येणार नाही. समजा, महाराष्ट्रात असे अभ्यासक्रम आणले, तर ते कसे रचता येतील,  याची ही चुणूक.

एम. ए. (शरद पवार)

यात साखर कारखाने, शेती, उद्योग, नातेवाईकबाजी यात स्पेशलायझेशन असेल. साखर कारखाने हा विषय घेणाऱ्यांना केवळ साखर हा विषय घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अडथळे कसे आणायचे, याचीही उजळणी करावी लागेल. प्रश्नपत्रिकेत कोणत्याही प्रश्नाचे उत्तर रोखठोक, सरळ आणि मुद्देसूद दिल्यास शून्य गुण मिळतील. प्रश्न कोणत्याही स्वरूपाचा असला तरी त्यात काही ना काही आकडेवारी असायलाच हवी. काहीच नाही मिळाली, तर ‘सध्या देशात दीड लाख विद्यार्थी एम. ए. करत असून त्यांपैकी केवळ 9 टक्के शरद पवार या विषयात एम. ए. करत आहेत,’ असं वाक्य टाकलं तरी हरकत नाही. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना एमबीए साठी थेट प्रवेश मिळण्याची संधी द्यायला हरकत नाही. त्यातही जमिनींचे संपादन आणि व्यवस्थापन या विषयात स्पेशलायझेशन करायला वाव (आणि वावरही) आहे. शिवाय हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यास राज्यातील कृषी महाविद्यालयांमध्ये ‘शेतकऱ्यांसाठी शेतीव्यतिरिक्त उपजीविकेचे पर्याय’ या विषयावर अतिथी  प्राध्यापक म्हणून रोजगाराचीही संधी मिळेल. एक आहे, की या विद्यार्थ्यांना एम ए मिळविण्यापेक्षा एमएलए मिळविण्यात अधिक रस असण्याचा संभव आहे.

मात्र एम ए शरद पवार करणाऱ्या विद्यार्थ्यांना 100 मार्कांची प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागेल. यात माध्यमे आणि पत्रकारांना हाताळायचे प्रात्यक्षिक असणार आहे. विविध जातींचे म्होरके सोबत बाळगूनही पुरोगामी नेते कसे म्हणवून घ्यावे, आपल्याला हवी तशी चर्चा इतरांकडून कशी करवून घ्यावी या बाबींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवावे लागेल. याशिवाय, वेळवखत पाहून अचानक एखाद दिवशी या विद्यार्थ्यांना अन्य शाखेत सामावून घेतले जाणारच नाही, असे नाही. त्यामुळे प्रवेश घेतला एका कोर्सला आणि प्रमाणपत्र मिळाले दुसरेच, अशी शक्यता या विद्यार्थ्यांना फार.

एम. ए. (शिवसेनाप्रमुख)

ही परिक्षा लेखी कमी आणि तोंडी जास्त आहे. लेखी परीक्षा या अभ्यासक्रमात केवळ तोंडी लावण्यापुरतीच आहे. एकच वाक्य अनेकदा सांगायचे, इतरांना किरकोळीत काढायचे ही या अभ्यासक्रमाची वैशिष्ठ्ये आहेत. या अभ्यासक्रमात प्रवेश घेताना दिलेले विषय आणि अभ्यासक्रम पूर्ण करताना असणारे विषय एकच असतील याचा काही नेम नाही. इतकेच काय, त्यांचा परस्परांशी संबंध असेलच, असेही नाही. मात्र परीक्षकांना आणि प्राध्यापकांनाही भुरळ घालण्याएवढी तुमची वक्तृत्वकला चांगली असलीच पाहिजे, नसता या वाटेला जाण्याचा विचारही करू नका. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर चांगला रोजगार मिळेलच, याची काही खात्री नाही. काहीजणांना खूप रोजगार मिळेलही, मात्र तो कधी हिरावून घेण्यात येईल, याची त्यांना हमी नसते. या अभ्यासक्रमाचा सर्वात मोठा धोका म्हणजे हा अभ्यासक्रम केल्यानंतर याच शाखेत करिअर करावे लागते. नसता त्या माणसाचे प्रमाणपत्र परत घेण्यात येते. त्यामुळे हा अभ्यासक्रम केलेला माणूस एकतर ‘सर्टिफाईड’ असतो नाहीतर ‘सटरफटरफाईड’ असतो.

एक विशेष सांगायला हवा, की या अभ्यासक्रमात शिकविले एक आणि परीक्षेत आले भलतेच, फीस सांगितली एक आणि वसुली केली काहीच्या काही असं कदापि शक्य नाही. अभ्यासक्रमात जे घटक नेमून दिलेत, त्याबाहेरचा शब्द सुद्धा उच्चारण्याची कोणाची काय बिशाद…अगदी सरांचीही नाही. शिवाय सगळ्या अभ्यासक्रमाची अशी एक सॉलिड शब्दावली आहे. भल्या-भल्यांना ती शब्दावली पाठ करावीच लागते.

हा अभ्यासक्रम केलेला माणूस वडा-पावचा तज्ज्ञ मानण्यात येतो. त्यामुळे काही कालावधीत त्याने अंगातील प्रतिभेची चुणूक दाखविली, की त्याची वडा-ताण सुरू होते. अन्य कंपन्यांमध्ये त्याला सन्मानाने बोलाविण्यात येते . या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे त्याला काही ठराविक कालावधी नाही. केवळ निष्ठेने अभ्यास करत राहायचा. अचानक एखादे दिवशी तुम्ही पास झाल्याचे कळविण्यात येते. शिवाय तुम्ही पास झालात तर अचानक पी. एचडी.च्या मानकऱ्यासारखे वागविले जाता आणि तुमचा योग नाही आला, तर झिलकऱ्यांच्या बरोबर तुम्हाला वागविण्यात येते. दरबारी राजकारण ज्यांना जमते त्यांच्यासाठी हा अगदी रामबाण अभ्यासक्रम आहे. अलिकडे त्यात दर आणि बारी, दोन्हींचे प्रस्थ जास्त झाल्याच्या तक्रारी असल्या, तरी या अभ्यासक्रमाने गेली अनेक वर्षे राजदरबारी आपली लोकप्रियता कायम ठेवली आहे.

एम. ए. (कॉंग्रेस)

या अभ्यासक्रमाला कोणाही विशिष्ठ व्यक्तीचे नाव नाही. कारण आधी त्याला गांधी हे नाव द्यायचे घाटत होते मात्र  नंतर या नावामुळे लोकांची दिशाभूल होईल, त्यांच्या मनात फारसे आकर्षण राहणार नाही या कारणामुळे ते रद्द करण्यात आले. या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे याला स्थळ, काळ आणि परिस्थिती, या कशाचेही बंधन नाही. या अभ्यासक्रमासाठी तुम्ही नावही दाखल करण्याची गरज नाही. साखर कारखाना, सहकारी बँक, शिक्षण संस्था, पोलिस स्टेशन, कारागृह…अशी कोणत्याही ठिकाणी हा अभ्यासक्रम पुरा करता येतो. एक विद्यापीठ बदलून दुसऱ्या विद्यापीठात जाऊनही तो पुरा करता येतो. मात्र या अभ्यासक्रमात खऱ्या अर्थाने यशस्वी व्हायचे असेल, तर त्यासाठी केंद्रीय परीक्षकांच्या मर्जीस उतरावेच लागले. या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या जीवन-मरणाचा निर्णय केंद्रीय परीक्षकांच्या भुवयांच्या हलचालींवर अवलंबून असतो. ते जर खुश झाले तर मात्र या विद्यार्थ्यांचे आकाशातला बापही वाकडे करू शकत नाही. मात्र खुशामदीच्या या प्रॅक्टिकलमुळे या विद्यार्थ्यांना कधी आयचा तर कधी पोराचा आधार घ्यावा लागतो.

या अभ्यासक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे येते क्लासमेटस्, म्हणजे वर्गमित्र नावाचा प्रकार नसतो. एखादा मित्र मिळाला तरी तो मित्रच राहिल, याचीही खात्री नसते. त्यामुळे हा अभ्यासक्रम शक्यतोवर वंशपरंपरागत पद्धतीनेच घेतला जाईल. नाही म्हणायला, अन्य अभ्यासक्रमांच्या शिष्यवृत्तीवाचून मागास राहिलेल्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे सामावून घेण्याची एक उदात्त परंपरा या अभ्यासक्रमात आहे. या शाखेचा विद्यार्थी कधीही उपाशी मरणार नाही, कारण आपण जे शिकलो ते प्राचीन काळापासून कसं चालत आलेलं आहे, हे पटवून देण्यात त्यांच्या हातखंडा असतो. शिवाय आपण जे करत आहोत, ते जगात पहिल्यांदाच करत आहोत, असाही ते दावा करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्य माणसाला वश करून घेण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. अगदीच काही अडलं तर गांधींचा वापर ते करतात. गांधी हे सर्वात सशक्त चलन आहे हे त्यांना माहित असते गांधीजी असलेले चलनच कोणतेही संकट दूर करू शकते, हे साधं बहुमत या विद्यार्थ्यांना अवगत असते. दहा पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत हा अभ्यासक्रम आला असता, तर विद्यार्थ्यांना गणवेश घालावा लागला असता. मात्र आता ती गरज राहिलेली नाही.

एम. ए. (मुंढे-गडकरी)

हा नावावरून जोड अभ्यासक्रम वाटू शकतो. मात्र तो तसा नसून दोनपैकी एक या प्रकारचा आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रम निवडण्याऐवजी एक निवडला की तो दुसऱ्यातून तो बाद असा हा प्रकार आहे. जुन्या पद्धतीच्या वार लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तयार केल्याप्रमाणे त्याची रचना आहे. फरक एवढाच की हा अभ्यासक्रम निवडणाऱ्या विद्यार्थ्यांना खरोखरच वार लावून शिकावे लागते. त्यापेक्षाही त्यांना वार झेलणे आणि ते चुकविणे, याचीही तालीम घ्यावी लागते. शिकलेले घटक आणि परीक्षेतील प्रश्न यांच्यात काही ताळमेळ असेलच असे नाही, त्यामुळे हा सर्वात कठीण अभ्यासक्रम आहे. शिवाय परीक्षा पास झाली तरी रोजगार मुख्यत्वे उत्तर भारतात मिळणार. महाराष्ट्रात या विद्यार्थ्यांना स्पर्धा आहे ती चाटे कोचिंग क्लासेससारख्या वर्गांची. त्यामुळे आजपर्यंत तरी या विद्यार्थ्यांना राज्यात मिळालेले यश हे चिंतनाजनकच आहे. त्याहून अधिक नाही. काही वर्षांपूर्वीपर्यंत महाजन नावाचा घटक या वि्द्यार्थ्यांसाठी फायदेशीर होता. त्यातून त्यांच्या मार्कांची बेगमी व्हायची. मात्र आता तो घटकच नाहीसा झाला असल्याने यांची स्थिती गमगीन झाली आहे.

या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना चाळीस मार्कांचे प्रात्यक्षिक आहे आव्हान द्यायचे. सतत कोणाला न कोणाला, कशावरून तरी, काही का कारणाने आव्हाने द्यायची. हातात काही कागदपत्रे आणि आवाजात धार, ही या प्रात्यक्षिकांत दिसलीच पाहिजेत. जीटी मारली तरी चालेल. पण पाहिजे म्हणजे पाहिजे. एखाद्या विद्यार्थ्याने प्रात्यक्षिकांच्या वेळी थेट प्राध्यापकांनाच आव्हान दिले, तर ती अतिरिक्त योग्यता मानली जाईल. शिवाय अभ्यासक्रमाला येणाऱ्या विद्यार्थ्यांना एम ए असले तरी ‘कमल, कमळ बघ’ इथूनच सुरवात करावी लागते. त्यासाठी प्रबोधिनीची आगळीवेगळी व्यवस्था आहे.

तर हे झाले मुख्य अभ्यासक्रम. सुरवातीस एवढे पुरे. तमिळनाडूत एक तर महाराष्ट्रात चार. आहे का नाही आपण पुढे. या अभ्यासक्रमांचे यशापयश पाहून नंतर मग रिपब्लिकन, राजू शेट्टी असे क्रॅश कोर्सही काढू. हाय काय अन् नाय काय!

तर मग त्यांना दत्तक घ्यायला सांगा…

राणेशाहीचे प्रमाण असं कुठे जास्त होते. अगदी दीडशेपैकी शंभर जागा नेत्यांच्या वारसांनी लढविल्या आहेत, असे झाले आहे का? मग या मुद्द्याचा एवढा का बाऊ करण्यात येत आहे,” हा प्रश्न नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी विचारला. घराणेशाहीचा आरोप या नेत्यांनी त्या पद्धतीने उडवून लावला, ते पाहून जुनी सरंजामदारी व्यवस्था काय वाईट होती, असे वाटून गेल्यास नवल नाही.
या नेत्यांना आपल्याकडे धडा मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मात्र त्या तिकडे फ्रांसमध्ये असेच एक नाटक चालू आहे. ते आपल्याकडच्या राजकीय लोकांसाठी उद्बोधक ठरू शकते. या नाटकातील प्रमुख पत्रे आहेत, निकोला आणि जॉन सार्कोझी ही पिता पुत्राची जोडी. जॉन या केवळ २७ वर्षांच्या तरुणाला ‘एपाद’ या संस्थेच्या प्रमुखपदी नेमण्यावरून नाटकाचा पहिला अंक सुरू झाला. त्याचा तिसरा अंक आता सुरू झाला आहे तो आता विरोधी सोशलिस्ट पार्टीच्या आन्दोलनाने. या पक्ष्याच्या युवा आघाडीचे चार कार्यकर्ते अध्यक्ष्यांच्या प्रासादावर पोचले आणि आपल्याला दत्तक घ्यावे अशी मागणी केली. ही मागणी अर्थातच मान्य होण्यासारखी नव्हती आणि अधिकाऱ्यांनी या तरुणांना हाकलून दिले. पण हे प्रकरण इथेच थांबणारे नाही. सोशालीस्त पक्षाने तरुणांना आवाहन केले आहे, की अध्यक्षांनी आपल्याला दत्तक घ्यावे अशी तरुणांनी मागणी करावी. त्यासाठी त्यांनी एका संकेतस्थळावर दत्तकाचा फोर्मही उपलब्ध करून दिला आहे. तरुणांचे भले व्हायचे असेल तर त्यांनी अध्यक्षाचे मुले व्हायला हवे, हा त्यातला संदेश!
ही बातमी मला का महत्वाची वाटली? एक, त्यात विरोधी पक्ष आणि जनतेची सक्रियता, एखाद्या चुकीच्या गोष्टीला विरोध करण्याची तयारी दिसून येते. आपल्याकडे पायलीला पन्नास गोतावाळेखोर उभे टाकले तरी मीठ मसाला लावून त्याची चर्चाच करणारेच जास्त! त्याविरोधात आवाज काढणारे कमीच. सुनील देशमुखांचा काय तो अपवाद. त्यांच्या एका बंडखोरीमुळे त्यांची आधीची पापे धुतली जातील.
दुसरे महत्वाचे, ही बातमी दिली आहे फ्रांस रेडीओ इंटरनेशनल या सरकारी माध्यमाने. तुम्हाला काय वाटते, आपल्याकडे असे घडण्यासाठी आणखी किती दशके लागतील?

फोलपटरावांच्या मुलाखती

फोलपटराव राजकारणी भाग 2

प्रश्नः सध्याच्या निवडणुकांमध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने आहात
फोलपटरावः याबाबत मी अजून काही ठरविले नाही. ठरवू या. कसे आहे, काही झाले तरी आम्ही निवडणुकीच्या वेळेस प्रामाणिक कार्यकर्त्यांसोबतच असतो. प्रॉब्लेम निवडणुकीनंतर येतो. आम्ही मुंबईत अडकून अडतो आणि कार्यकर्त्यांना वाटते, की साहेब आपल्याकडे लक्षच देत नाही. आता लोकं आम्हाला लक्षानुलक्ष देत असताना गावाकडे कसे जाणार?

प्रश्नः नाही, आम्ही पक्षाच्या बाजूने या अर्थाने विचारतोय.
फोलपटरावः तसे नाही. आता एवढे पक्ष बदलल्यानंतर मला कुठल्या पक्षाचे कौतुक वाटणार. आताच नवीन निघालेल्या एका तिसऱ्या अडगळीतील चौथ्या आघाडीत मी सामिल झालो. त्याची एक वेगळीच गंमत आहे. त्यांच्या नेत्याने मला विचारले, “फोलपटराव, या पक्षात किती दिवस राहणार” मी उत्तर दिले,”पक्ष पंधरवडा” (परत तेच हासणे.)त्यामुळे सध्यातरी कुंपणावर बसायचे आणि निवडणुकीनंतर शेत खायचे, म्हणजे कोणाला पाठिंबा द्यायचे ते ठरविणार असा विचार आहे.

प्रश्नः या निवडणुकीसाठी तुमचा काही अजेंडा, धोरण आहे का?
फोलपटरावः आमच्यासारखे जे ग्रासरुटचे कार्यकर्ते असतेत, त्यांच्याकडे धोरण नसतं. असतो तो बेत. त्यामुळे नेहमीच्या पद्धतीने निवडणुका जिंकायच्या, कोणता घोडा विनच्या जवळ आहे तो निवडायचा आणि त्याच्या नावाने तिकिट घेऊन जॅकपॉटची सोय करायची, हा आमचा बेत आहे.

प्रश्नः म्हणजे तुम्ही घोडेबाजाराचे बोलताय…
फोलपटरावः अहो, कसले घोडे आणि कसले काय. हा सगळा शिरगणतीचा प्रताप आहे. निवडणुकांमध्ये लोकांनी गाढवं निवडून द्यायची आणि तुम्हा पत्रकारांनी त्याला घोडेबाजार म्हणायचं, कशाला ही प्रथा पाडता. लोकांच्या फायद्यासाठी आली चार डोकी एकत्र आणि केलं पाच वर्षे तुमचं मनोरंजन, त्याला तुम्ही काय टॅक्स लावणार का. त्यामुळं आम्ही घोडेबाजाराचं बोलत नाही, आम्ही बोलतो प्रॅक्टिकलचं. आता तुम्ही घोडेबाजाराचं बोलताय. घोडं मेलं ओझ्याने शिंगरु मेलं येरझाऱ्यानं तुम्ही ऐकलं असंलच. तर आमचं घोडं न मरता निवडणुकीचं ओझं वाहतंय आणि राजकीय पक्षांचं शिंगरू बंडखोरीच्या, आचारसंहितेच्या येरझाऱ्यानं मरतंय. आता त्यातून या पक्षांचा निकाल लागलाच वाईट, तर आमच्यासारख्या घोड्यांनीच खांदा द्यायला पाहिजेय ना.

प्रश्नः फोलपटरावजी, तुमच्या या यशाचे रहस्य काय?
फोलपटरावजीः सक्रियता. मी नेहमी कार्यरत असतो. सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी तयार असतो. काही वेळेस, समस्या कमी पडू लागल्या तर केवळ सोडविण्यासाठी म्हणून मी नव्या समस्या निर्माण करतो. अखेरचा श्वास असेपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. आतासुद्धा तुमच्याशी मी बोलत असताना, यातले कोणते वाक्य मी बोललोच नाही असा खुलासा उद्या करायचा, याचा विचार मी करत आहे. मुलाखत संपली की त्याची तयारी झालीच म्हणून समजा.

प्रश्नः सध्या राज्यासमोरील सर्वात मोठा प्रश्न कोणता आहे असं तुम्हाला वाटतं?
फोलपटरावः कायदा आणि सुव्यवस्था. अहो, या राज्यात कोणाला काही धरबंदच राहिलेला नाही. कोणीही येतं आमच्या फॅक्टरीला आग लावतं, अमुक येतो गाडीवर दगडफेक करतो. अरे, कायदा हातात कशाला घेता. तो जागच्या जागी राहू द्या ना. कशाला वापरायला लावता. परवा आमच्या गावात आमच्या कार्यकर्त्यांवर गोळीबार झाला. सरकारच्या आदेशावरून पोलिसांनी कार्यकर्त्यांना गोळ्या घातल्या, सरकारच्या आदेशाची पोलिसांनी योग्य अंमलबजावणी केली, हे कदाचित खरे असेल. मात्र त्यावेळी ते कशाच्या अंमलाखाली होते, हे त्यांनी आधी स्पष्ट करावे. परिस्थिती इतकी वाईट आहे, का परवा मी एका सभेत म्हणालो, सरकारने आता आठवड्यातील सातही वारांना जोडून एक गोळीवारही जाहीर करावा. यादिवशी राज्यात सगळीकडे गोळीबार करता येईल. बाकीच सहा दिवसतरी बरे जातील ना लोकांचे.

प्रश्नः फोलपटरावजी, एक शेवटचा प्रश्न. या क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना आपण काय सांगू इच्छिता?
फोलपटरावः राजकारणाचे क्षेत्र वाईट असं कोणी कितीही बोललं तरी लक्ष देऊ नका. कोटी गमावून बसताल. राजकारणात तरुण रक्ताला खूप वाव आहे. मी तर म्हणेन, तरूणांच्या रक्तावरच राजकारण चालतंय. शक्य असेल तोवर एखाद्या मोठ्या राजकीय घराण्यातल्या माणसाच्या वळचणीला जा. राजकारणात यशस्वी व्हायचे असेल तर जनतेवर छाप पडायला हवी. त्यासाठी खूप पिक्चर पाहा. पिक्चरमधल्या अॅक्टरपेक्षा असा भारी अभिनय करा, की नाटकी अभिनय शिकण्यासाठी त्याने तुमच्या सभांना आलं पाहिजे. शक्यतोवर अभिनेत्रीशी चांगले (आणि नैतिकही) संबंध ठेवा. ज्या काय चळवळी, आंदोलने करायची असतील ती कोणतेही पद किंवा सत्ता मिळविण्यापूर्वीच करा. कारण कोणताही राजकारणी फक्त खुर्ची मिळेपर्यंत जंगम मालमत्ता असतो. त्यानंतर तो स्थावर मालमत्ता होतो. तुमच्या मागे असलेले लोक तुम्हाला पाठिंबा द्यायला आलेत का तुमचा पाठलाग करायला आलेत, त्याची एकदा खात्री करा. एक लक्षात घ्या, सगळ्या नेत्य़ांना राज्यापुढच्या, मागच्यापुढच्या सगळ्याच, समस्यांची जाणीव असते. त्याची उत्तरे मात्र कोणाकडेच नसतात.

फोलपटांच्या मुलाखती

फोलपटराव, राजकीय नेते

भाग १
मुलाखतकारः नमस्कार, आज आपण भेटणार आहोत आपले लाडावलेले, माफ करा लाडके नेते फोलपटराव यांना. विविध राजकीय पक्षांच्या माध्यमातून फोलपटराव यांनी जनतेची सेवा केली आहे. त्यामुळेच दर निवडणुकीच्या वेळी जनताही निवडणूक लढविण्यासाठी त्यांना भरीस घालते. यंदाच्याही विवडणुकीत ते मतदारांच्या नशिबाची परीक्षा पाहणार असल्याने आपले नशिब आजमावून पाहणार आहेत. तर या आपण त्यांच्याशी संवाद साधू या.तर फोलपटरावजी, आतापर्यंतच्या वीस वर्षांच्या काळात आपण अठरा पक्ष बदलले आणि स्वतःचे दोन पक्ष काढून विसर्जितही केले. यामागचे इंगित काय?
फोलपटरावः त्याचं असं आहे…जनतेचं कल्याण व्हायचे असेल तर राज्यात स्थिर सरकार पाहिजे, या मताचे आम्ही आहोत. त्यामुळे दहा पक्ष तर आम्ही स्थिर सरकार याच मुद्द्यासाठी बदलले. गेल्या दहा वर्षांत तर आमची ख्यातीच अशी झाली आहे, की ज्याला आपले गव्हर्नमेंट टिकवायचे असेल, त्याला आमची मदतच घ्यावी लागते. आमची इस्त्री बसल्याशिवाय राज्याची घडीच बसत नाही म्हणा ना. दोन पक्ष आम्ही धर्मनिरपेक्षतेसाठी बदलले. जातीय शक्तींना आमच्यामुळे मदत होऊ नये, यासाठी सगळ्या धर्मनिरपेक्ष पक्षांशी जुळवून घेण्याचे आमचे आधीपासून धोरण आहे. आता त्यात गफलत काय होते, का आम्ही एखाद्या पक्षात गेल्यानंतर तिथे जातीयवाद सुरू झाल्याचे आमच्या लक्षात येते. एक उदाहरण देतो. आम्ही सत्ताधारी पक्षात असताना आमच्या मतदारसंघात दंगल झाली. त्यावेळी आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो, की दंगल लवकर आटोक्यात आणा. दोषी कोण आहे, याची तपासणी करायची गरज नाही. तर गृहमंत्र्यांचे उत्तर होते, आम्हाला माहित आहे या दंगलीत कोण जातीने लक्ष घालत आहे. मग मी सत्ताधारी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. शिवाय माझ्या पक्ष बदलण्याने जनतेला किती फायदा होतो,पहा ना. दरवेळी त्यांना कोरी पाटी असलेला प्रतिनिधी मिळतो. पाट्या टाकणाऱ्या प्रतिनिधीपेक्षा कोरी पाटी असणारा प्रतिनिधी केव्हाही चांगलाच ना (आपल्या विनोदावर स्वतःच हसतात.)
आणखी एक कारण आहे। आपल्या नागरिकांनी, आमच्या अनुयायांनी सर्व प्रकारच्या अनुभवांना, नवीन विचारांना सामोरे जावे, अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्यासाठीही मला असे राजकारणातले आडवळणं घ्यावे लागले.
प्रश्नः परंतु हे सर्व पक्षांतर तुम्ही स्वतःच्या फायद्यासाठी केले, असे लोक म्हणतात…
फोलपटरावः लोक म्हणजे कोण हो? विरोधक! त्यांच्या म्हणण्याला कोण भीक घालतो. समोरच्या उमेदवाराच्या पाठीमागे असं काही बाही बोलण्याची रीतच असते राजकारणात. आता आम्ही काय आमच्या विरोधकांवर कमी आरोप केले. काय झालं त्याचं। तसंच असते ते. राहता राहिला प्रश्न आमच्या फायद्याचा॥ आता असं बघा, आमचा फायदा हा समाजाचा फायदा असतो. दिल्लीतून निघालेला एक रुपया गल्लीपर्यंत पोचेपर्यंत तेरा पैसे होतो, असं राजीव गांधी म्हणायचे. आता आमच्यापर्यंत रुपयाच नाही आला तर खालच्यांना तेरा पैसे तरी मिळतील का तुम्हीच विचार करा. शेवटी आम्हाला थोडेच पैसे खावेसे वाटतात. पण लोकांचे पोट भरण्यासाठी आम्हाला तेही करावे लागते. पापी पेट का सवाल है ना!
प्रश्नः मात्र अलिकडे राज्यातील जमीनींच्या विक्रीत तसेच प्रकल्पांसाठी जमिनी घेण्याच्या बाबतीत तुमचे नाव अनेक वादांमध्ये सापडले…
फोलपटरावः थांबा थांबा. मी तुम्हाला एक उदाहरण देतो. परवा दिल्लीत मला बिहारचे एक खासदार भेटले. त्यांना मी विचारले, तुम्ही आमच्या राज्यात एवढ्या जमिनी का विकत घेत आहात. त्यांनी मला सांगितले, तुमच्याच राज्यात नाही तर मी सगळ्या भारतात जमिनी घेत आहे. कारण मला राष्ट्रीय नेता व्हायचे आहे. ज्याच्या हाती किल्ला त्याच्या हाती सत्ता हे शिवाजी राजांच्या काळी ठीक होतं हो. आता सत्तेच्या किल्ल्या जमिनी ज्याच्याकडे असतात त्यांच्या हाती असते. काय आहे, विकास करायचे म्हणजे सोयीसुविधा, जागा पाहिजे. त्या ताबडतोब मिळायच्या झाल्या तर आपल्या हाती काही तरी पाहिजे ना. यासंबंधात काही वाद व्हावे, असे मला वाटत नाही. शिवाय आपला वेव्हार एकदम स्वच्छ आहे. सगळ्या जमिनी सरकारी भावाने घेतल्या आहेत, तर लोकं काय म्हणणार का सगळ्या जमिनी माझ्या भावाने घेतल्या आहेत. सगळा शब्दांचा खेळ आहे हो सारा.

आपले मोदक त्यांचे झिआओ लोंग बाओ

णेशोत्सव नुकताच झालेला आहे. आपल्या सर्वांनी मोदक खाल्लेलाच असेल/असतील. या मोदकांमध्ये मांस, तेही डुकराचे मामांस घालण्याची कल्पना किती किळसवाणी वाटते नाही? मात्र ही कल्पना चीन मध्ये प्रत्यक्षात आली आहे. (आणखी दुसरे कोण असणार?)
आता सहज चायना रेडीओ इंटर नेशनल चालत होतो. तिथे मला हा पदार्थ ‘गावला’. शांघाय स्नाक्स या नावाजवळ चित्र दिसले तर मनात विचार आला, अरे हा तर आपला मोदक. थोडी माहिती घेतली तर उडालोच. या मोदकात, ज्याचे नाव या संकेतस्थळावर वरील प्रमाणे दिले आहे त्यात हैम, डुकराचे मांस वगैरे जिन्नस घालतात अशी माहिती तिथे दिली आहे. शिवाय इथेच असेही म्हटले आहे, की नानझीआंग या प्रांतात हा पदार्थ १०० वर्षांपासून बनविला जात आहे. याचा अर्थ हा पदार्थ भारतातूनच तिकडे गेला. शिवाय वरचे आवरणही पिठापासून बनवितात. म्हणजे तर शंकेला जागाच नको. मी चीनला गेलेलो नाही किंवा हा पदार्थही खाल्लेला नाही. मात्र मी मोदक भरपूर खाल्लेले आहेत आणि त्यावरून हा मोदकाचाच प्रकार आहे हे ठामपणे सांगू शकतो. त्यात मांस कोंबण्याची कल्पकता दाखविणाऱ्या चीनी लोकांबद्दल काय बोलावे? त्यामुळेच असावे, इंडोनेशिया किंवा थायलंडमध्ये गणपतीच्या मूर्ती आढळत असल्यातरी चीनमध्ये आढळत नाहीत.

भ्रष्टराज ‘गुरू’!

बरोबर वीस वर्षांपूर्वी मी राजगुरूनगरला (ज्याला स्थानिक लोकं अजूनही आवर्जून खेड म्हणतात) गेलो होतो. त्यावेळी मी एक साधा विद्यार्थी होतो आणि एनसीसीच्या शिबिरासाठी तिथे पोचलेल्या 100 हून अधिक विद्यार्थ्यांपैकी एक होतो. नोव्हेंबर 2 ते 12, 1989 या दहा दिवसांमध्ये एके दिवशी आम्हाला हुतात्मा राजगुरू यांचा वाडा बघण्यास नेले होते. त्यावेळी येथेच या वाड्याच्या नावावर स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांची बातमी द्यावी लागेल, हे मला कुठे माहित होते. पण तसे झाले खरे. शिवराम हरी राजगुरू यांच्या हौतात्म्यानंतर त्यांच्या घरातील वस्तू लोकांनी कशा पळविल्या हे 1989 साली ऐकायला मिळाले. तर राजगुरु स्मारकाच्या नावावर 70 लाख रुपये पळविण्याचा कसा डाव रचण्यात आला, हे 2009 साली ऐकायला मिळाले.
Rajguru Wada
हुतात्मा सिवराम हरी यांची गेल्या वर्षी जन्मशताब्दी साजरी झाली. त्याआधी सुमारे 12 वर्षांच्या खटपटीनंतर राज्य सरकारने राजगुरू यांचा जुना वाडा संरक्षित स्मारक म्हणून घोषित केला. या वाड्याच्या दुरुस्ती आणि नवीनीकरणासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा निदी मंजूर झाला होता. त्याअंतर्गत शिवराम हरी यांची जन्मखोली, देवघर आणि नदीकाठची भिंत यांचे बांधकाम करण्याची मूळ योजना होती. हे काम 24 ऑगस्ट 2008 (शिवराम हरींच्या जन्मशताब्दी समापनापर्यंत) पूर्ण व्हायचे होते. प्रत्यक्षात पुरातत्व खाते आणि त्यांच्या ठेकेदारांनी धडाधड जुन्या इमारती पाडून टाकल्या. त्याजागी नव्या इमारती मनमानी पद्धतीने उभारण्यास सुरवात झाली. स्थानिक कार्यकर्त्यांनी विरोध केल्यानंतर ते निकृष्ट बांधकाम पाडण्यात आले. नंतर जन्मशताब्दीच्या निमित्ताने घाईघाईने जन्मखोली बांधण्यात आली. एवढे सगळे घडल्यानंतर तिथे सगळे काम अर्धवट टाकण्यात आले. गेले वर्षभर हा वाडा ओबडधोबड अवस्थेत उभा आहे.
Rajguru Wada
विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित झाल्याचे मी वाचले म्हणून काल मी राजगुरूनगरला गेलो। राजगुरुंच्या वाड्याला भेट दिलेली असली तरी वीस वर्षांमध्ये आठवणींच्या कपाटातील अनेक वस्तू बदलल्या होत्या. फक्त आठवत होती ती त्यांच्या जन्मखोलीतील एका छोट्याशा खिडकीतून दिसणारी भीमा नदी-चमचम करणारे पाणी आणि मंद प्रवाह. ते दृश्य अद्यापही मला लख्ख आठवते. काल गेलो तेव्हा हा वाडा आणखी भकास झाल्याचे पाहताक्षणी जाणवले. कालही मी आत खोलीत गेलो आणि परत ते दृश्य पाहण्याचा प्रयत्न केला.
Birthplace of Rajguru
ज्या कार्यकर्त्यांनी हे प्रकरण लावून धरले त्यांच्यांपैकी एक सुशील मांजरे यांची भेट झाली। मांजरे यांनी एकेका गैरप्रकाराचा पाढा वाचावयास सुरवात केली. जन्मखोलीचे मूळचे स्वरूप बदलून टाकले आहे, नदीकाठच्या भिंतीत वाड्याचे जुने दगड वापरून नव्या दगडाचे पैसे लावले आहेत, शिवाय संपूर्ण दगडाची असलेली भिंत वीटांनी बांधायचा प्रयत्न…एक ना दोन. शिवराम हरींच्या जन्मखोलीचेच सध्याचेच काम अगदी एखाद्या चाळीच्या खोलीसारखे केले आहे. मात्र आधी याहूनही वाईट बांधकाम करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी कार्यकर्त्यांनी ती खोली पाडायला लावली. नदीकाठच्या भिंतीचे कामही असेच पाडायला लावले. त्यानंतर ते आजतागायत सुरू झालेले नाही.
Rajguru Wada
या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आनंद गावडे आणि हरिदास गोकुळे या दोघांनी 7 जूनपासून उपोषण सुरू केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी 10 जून रोजी राजगुरूनगर बद पाळण्यात आला. दोषींवर सात दिवसाच्या आत कारवाई करू, या जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानुसार दोघा कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले. या प्रकरणाबाबत बोलताना गावडे यांना थांबविणे अशक्य होत होते. वाड्याचे बांधकाम बंद का पडले म्हणून या कार्यकर्त्यांनी शोध घेतल्यावर त्यांना कळाले, की ठेकेदारांना बिल देण्यासाठी जिल्हा कोषागारातून 70 लाख रुपये उचलण्यात आले आहेत. खरी गंमत पुढेच आहे. हे 70 लाख रूपये घेतल्याबद्दल कार्यकर्त्यांनी पुरातत्व खात्याचे सहसंचालक डॉ. चेतन साळी यांच्यावर संशय घेतला. लगेच दोन दिवसांत पुरातत्व खात्याच्या बँक खात्यात 58 लाख रुपये भरण्यात आले. एवढे करूनही प्रशासन मात्र या भ्रष्टाचाराची जबाबदारी कोणावर टाकण्यास तयार नाही.
rajguru wada
गावडे आणि गोकुळे यांच्या उपोषणानंतर ‘ज्वलज्जहाल’ वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी एंट्री मारली। दहा जूनला त्यांनी त्यांच्या शैलीत भाषण करून वाहतूक रोखून धरली. (डॉ. साळीला राजगुरूंच्या पुतळ्यासमोर जीवंत जाळू हे बंडातात्यांच्या त्या दिवशीच्या भाषणातील एक वाक्य.) त्यानंतर मात्र प्रशासनाने दखल घेतली. अगदी दोन दिवसांपूर्वी पुरातत्व खात्याचे एक पथक वाड्याला भेट देऊन गेले.
दरम्यान, विधानसभेत हा प्रश्न चर्चेला आला तेव्हा तब्बल तीन सदस्यांनी चर्चेत भाग घेऊन आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या!
इन्किलाब जिन्दाबाद!

नेमेची येतात निवडणुका…अन जातीयवाद

निवडणुकीच्या तोंडावर कोंग्रेस सरकारने काढलेल्या वटहुकुमाने आपले काम नेमके केले आहे. एकीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांना जातीच्या वादात अडकावायचे आणि इकडे आपला कार्यभाग साधुन घ्यायचा, अशी बिनतोड़ योजना कोंग्रेसने आखलेली आहे. त्याचा पहिला टप्पातरी यशस्वीपणे पार पडला आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ३०० कोटी रुपये उधळण्याची पूर्वपीठीका ही आहे।

एरवी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला मराठा संघटनांचा असलेला विरोध मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना माहीत नसावा, हे शक्य आहे का? बाबासाहेबांच्या नावाला विरोध होणार आणि तो मराठा सन्घटनान्कडूनच होणार ही खूनगाठ बांधूनच हा खेळ खेळण्यात आला. त्यानुसार विनायक मेटे आणि पुरुषोत्तम खेडेकर या महामानवांनी बाबासाहेबांवर दुगाण्या झाडल्या. संसदेच्या निवडणुकीतील यशाने भरात आलेल्या आणि शिवाशाहीरांशी निष्टा बाळगून असलेल्या राज ठाकरे यांनी अगदी साहजिकपणे बाबासाहेबांची बाजू घेतली. आता त्याला प्रत्युत्तर म्हणून संभाजी ब्रिगेडने उद्या (शनिवारी) पत्रकार परिषद बोलाविली आहे. त्यासाठी कादालेल्या पत्रकातील भाषा पाहून मला आपले वाटले, की त्या मजकुराचा पहिला कागद जागच्या जागीच जाळून गेला असावा.

राज यांनी सांगितले नसते, तरी अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, की मराठा संघटनांच्या मागे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचे पाठबळ आहे. त्यातही राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या तर अंगातील सगळे बळ याच संघटनांचे आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा घाव राष्ट्रवादीच्या वर्मावर बसला असल्यास नवल नाही. काँग्रेस नेते by default आपली संघटना सर्वसमावेशक असल्याचे सांगू शकतात. राष्ट्रवादीला ती सोय नाही. राष्ट्रवादीच्या या प्रतिमेमुळे आताच्या निवडणुकीत मराठवाडा आणि विदर्भात अन्य सर्व जाती एकवटून मतदान विरोधात गेले, हां इतिहास किमान पवारांना तरी माहित आहे.शिवाय एकदम कोलांटउडी मारून ओबीसी किंवा अन्य समाजाला एकत्र घेण्याचे प्रयत्नही राष्ट्रवादी करू शकत नाही, कारण तसं केलं तर आहे तो मराठा मतदारही नाराज होऊन दूर होऊ शकतो. त्यामुळे बाबासाहेबांना पुढे करून मराठा विरोधी ब्राम्हण असे भांडण तयार करायचे, त्यात मराठा समाजाला एकाकी पाडायचे म्हणजे पर्यायाने राष्ट्रवादीचा मतदारवर्ग संख्येने कमी होऊ शकतो, हा साधा हिशोब कॉंग्रेसच्या नेतृत्वाने मांडला आहे.
या सगळ्या गदारोळात शिवसेना वा भारतीय जनता पक्षाने कोणतीही भूमिका घेतलेली नाही. त्यांना भूमिका घेण्याची सोयही सरकारने ठेवलेली नाही. आज राज ठाकरे यांच्या विधानानंतर विनोद तावडे यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाला पाठिंबा दर्शविला आहे. शिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा ‘जाणता राजा’ शरद पवार यांनीही मराठा नेत्यांना राजकारण न करण्याचा सल्ला दिला आहे. त्यात अर्थात बाबासाहेब पुरंदरे यांच्या नावाचा उल्लेख नाही. सगळ्या गदारोळानंतर मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे, की या समितीच्या अध्यक्षपदी तेच आहेत. गेले तीन दिवस चालू असलेल्या या वादात आता त्यांनी आपले तोंड उघडले आहे.

गमतीचा भाग बघा, गेल्या वेळेस २००४ सालीच्या निवडणुकीत याच बाबासाहेबांची बदनामी करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. आज त्याच बाबासाहेबांच्या नथीतून कॉंग्रेस राष्ट्रवादीची शिकार करू इच्छित आहे. याला म्हणतात काळाचा न्याय!