रेडियोचे दिवस

मागील काळाच्या आठवणींचा कड काढत “गेले ते दिन गेले…’ असे रडगाणे गाण्यासाठी हा ब्लॉग नाही. मात्र गेला आठवडाभर गावी काय गेलो (मु. पो. नांदेड, मराठवाडा), भारनियमानाच्या कृपेने सात दिवस आपला जुना जाणता, बापुडा रेडियो हा सोबती पुन्हा गवसला. याच सोबत्याच्या सहवासात अगदी जगावेगळे आनंदाचे क्षण काही एक काळ व्यतित केले. त्यामुळे त्या दिवसांबद्दल भावनांचे कृत्रिम लाऊडस्पिकर न लावताही, एक कृतज्ञता म्हणून या विषयावर लिहावेसे वाटले. रेडियो हा तसा माझ्या बालपणीच अस्तंगत होत चाललेले माध्यम होते. त्याची ओढ लागण्याची काही कारण नव्हते. तेरा-चौदा वर्षांपूर्वी तर एफएम वाहिन्या नसल्यामुळे तर तेही आकर्षण नव्हते. त्याचवेळेस शालेय शिक्षण पूर्ण करून महाविद्यलयात जाण्यास सज्ज झालो होतो. त्यावेळी जमाना होता कॅसेटस्‌चा. गुलशन कुमार यांची टी-सीरीज, तोरानी बंधुंची टीप्स आणि जैन बंधूंची व्हीनस या कंपन्या फॉर्मात होत्या. या कंपन्या नव्या नव्या चित्रपटांचे हक्क तर घेत होत्याच, त्या स्वतःही चित्रपट आणि खासगी अल्बम काढत होत्या. त्या नव्या गाण्यांचा “ट्रॅक’ ठेवणे ही जिकीरीचीच बाब होती. (नव्या चित्रपटाच्या आकर्षणाच्या नावाखाली दिवस रात्र तेच ते गाणे आणि दृश्‍यांचे दळण घालणाऱ्या वाहिन्या अजून भारतीय अवकाशात यायच्या होत्या.) या गाण्यांची माहिती घेण्यासाठी आधार होता त्यावेळी विविध भारतीवर सकाळी लागणाऱ्या “चित्रलोक’ कार्यक्रमाचा. यातूनच रेडियोशी पहिला संबंध आला. अगदी लहानपणी कधीतरी “बिनाका गीतमाला’ ऐकली होती. त्या आठवणी होत्याच. त्यामुळे सर्वात आधी रेडियो सिलोन (आता ते श्रीलंका ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन) झाले होते. त्यावर सकाळी गाणे ऐकणे सुरू झाले. हळूहळू आमची “वेव्हलेंग्थ’ जुळली आणि या संबंधांचे रुपांतर हलकेच नात्यात झाले.सीमा ओलांडलेल्या लहरीत्यानंतर “शॉर्ट वेव्ह’च्या सर्व थांब्यांवर विविध भारती आणि आकाशवाणीच्या शोधात रेडियोचा काटा फिरवू लागलो. अचानक ’92च्या एका पावसाळी रात्री रेडियोचा काटा एका स्टेशनवर थांबला. अत्यंत स्वच्छ स्वरांमध्ये हिंदीतून चालू असलेल्या त्या मुलाखतीने त्याच स्टेशनवर काही काळ थांबण्यास प्रवृत्त केले. सुमारे दहा मिनिटांच्या कार्यक्रमानंतर उद्‌घोषिकेने सांगितले, “यह रेडियो जापान है,’ अन्‌ मी जागीच उडालो. म्हणजे…हे कार्यक्रम जपानचे आहेत? अजून बुचकळ्यातून बाहेर पडलोही नव्हतो, अन्‌ तितक्‍यात त्याच जागी जपानी भाषा शिकविणारा कार्यक्रम सुरू झाला. जपानी, अन्‌ त्या अर्थाने कोणत्याही परदेशी भाषेशी ही पहिली ओळख! त्या स्टेशनची जागा नीट पाहून घेतली आणि दररोज “रेडियो जापान‘च्या हिंदी कार्यक्रमांच्या वाऱ्या सुरू झाल्या. त्यातूनच विविध परदेशी रेडियो संस्थांच्या कार्यक्रमांची ओळख होऊ लागली. जपानपाठोपाठ जर्मनी (डॉइटशे वेले-इंग्रजीहिंदी), बीबीसी (इंग्रजी आणि हिंदी), वॉईस ऑफ अमेरिका (इंग्रजीहिंदी), रेडियो फ्रान्स इंटरनॅशनल, रेडियो ऑस्ट्रेलिया, रेडियो नेदरलॅंडस्‌, रेडियो ऑस्ट्रिया इंटरनॅशनल, रेडियो चायना इंटरनॅशनल ( इंग्रजीहिंदी) अशा एकाहून एक देशांच्या केंद्रांचे कार्यक्रम ऐकण्यात येऊ लागले.
हा छंद जीवाला लावी पिसे
माझ्या अवतीभवती वावरणाऱ्या लोकांना रेडियो हा फक्त गाण्यांसाठी ऐकायचा असतो, हे माहित होते. मात्र गाण्यांसाठी रेडियोकडे वळलेला मी, या केंद्रांच्या कार्यक्रमांतच जास्त वेळ घालवू लागलो. या कार्यक्रमांत काय असायचे? तर बातम्या, त्या त्या देशाच्या धोरणांची माहिती, काही सांस्कृतिक कार्यक्रम, गाणे, त्या त्या देशांतील भाषा शिकविणारे कार्यक्रम (जर्मन, फ्रेंच, जपानी वगैरे) आणि श्रोत्यांचा पत्रव्यवहार…त्यांपैकी शेवटच्या भागाववर माझे जास्त लक्ष होते. साधारण सहा महिने अशा रितीने विविध लोकांचा पत्रव्यवहार ऐकल्यानंतर आपणही पत्र पाठवावे, असे वाटू लागले. मात्र त्यासाठी लागणाऱ्या “एअर-मेल’चा खर्च कोण करणार? अन्‌ करायचा ठरविला तरी एवढ्या केंद्रांशी किती पत्रे लिहावी लागणार, हा प्रश्‍न होताच. त्यावर एक पर्याय याच केंद्रांनी दिला होता. तो कामी आला. सर्व परदेशी केंद्रांना पाठविलेली पत्रे पंधरा पैशांच्या (त्यावेळी) पोस्ट कार्डावर दिल्लीतील दूतावासाला पाठविण्याची सोय होती. तिथून ती त्या केंद्राकडे पोटत असत. मग काय, एका शुभदिनी उचलली पेन, लावली कार्डाला आणि दिली दिल्लीला जपानी दूतावासाकडे पाठवून. त्यानंतर दोन महिने उलटल्यानंतरही काही उत्तर आले नाही म्हणून पत्र पाठविलेला दिवस शुभ होता का नाही, याबद्दलच शंका वाटू लागली. एके दिवशी कॉलेजमधून घरी आलो, तेव्हा एक मध्यम आकाराचा पिवळा लिफाफा माझी वाट पाहत असलेला दिसला. त्यावरील शिक्काच सांगत होता तो जपानहून आला आहे म्हणून. त्यातील कार्यक्रमांचे वेळापत्रक, माहितीपत्रक इ. इ. बघितल्यानंतर पत्र लिहिलेला दिवस शुभच असल्याची खात्री पटली. याच पाकिटात केंद्राच्या प्रसारणाबाबत एक फॉर्म होता (रिसेप्शन रिपोर्ट). तो भरून पाठविला आणि आणखी दोन महिन्यांनी आणखी एक पाकिट होते. त्यात एक सुंदर कार्ड होते. फॉर्मही होता. मीही फॉर्मात होतो. त्यानंतर जपानच्या केंद्रांसोबतच मी अन्यही केंद्रांना पत्रे पाठविली. सगळीकडून काही ना काही येतच होतं. ही “विदग्ध शारदा’ ठेवायला घरात जागा पडू लागली. आलेली कॅलेंडर्स वर्षभरातच कालबाह्य होऊ लागली. त्यांच्यावरची चित्रे अप्रतिम असल्याने ती फेकून देण्याचाही प्रश्‍न नव्हता. बरं, याचसोबत सर्व केंद्रांवरील भाषा शिकण्याच्या कार्यक्रमांच्याही छापील प्रती (अर्थात मागणीवरूनच) येऊ लागल्या. त्याचसोबत न मागितलेल्या प्रतीही येऊ लागल्या. त्यामुळे हिंदीतून जर्मन शिकतानाच जर्मनमधून बंगाली शिकण्याचीही प्रेमळ कसरत करता येऊ लागली.मात्र त्याचवेळीस डॉयशे वेलेच्या एका कार्यक्रमात स्वतःचे नाव ऐकल्यानंतर अचानक झालेला आनंद, रेडियो चीनच्या उद्‌घोषकांचे जोरदार अनुनासिक हिंदी व गमतीशीर तमिळ…या मजेशीर आठवणी अन्य कुठे मिळाल्या असत्या.
एक भीती…फुकटची
रेडियोवरून जे पुकटात मिळेल ते मागवत रहायचं, ही माझी सहजवृत्ती झाली होती. कोणतातरी अज्ञात हात आपल्याला फुकट काही देतोय ही भावना सुखद होतीच. मात्र त्या अज्ञात हाताने एकदा चांगलाच हात दाखवला. “वॉईस ऑफ रशिया’च्या केंद्रावरून जपानमधील “ओम शिनरीक्‍यो’ या पंथाचा एक कार्यक्रम सकाळी दहा ते साडे दहा चालत असे. मी तो ऐकत असे. त्यांचे साहित्य मागविण्यासाठी तेही पत्ता देत असत. मला कार्यक्रमाशी काही देणे घेणे नसे. मात्र कशाला फुकट सोडायचे, म्हणून पाठविले त्यांना एक पत्र. काही दिवसांनी आले त्यांचे उत्तर. पंथाचे प्रमुख …..यांच्या छायाचित्रासह त्यांचे तत्वज्ञान सांगणाऱ्या पत्रकांचे एक पाकिट. मी ते पाहिले आणि ठेवून दिले. काही दिवसांनी जपानमध्ये भूमिगत रेल्वेच्या मार्गात विषारी वायू सोडून माणसांना मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यात चौदा जणांचा प्रयत्न केला. या घटनेच्या चौकशीत आपले वरील “ओम शिनरीक्‍यो’ साहेबच प्रमुख आरोपी निघाले. त्यांची धरपकड करण्यात आली. त्यांच्या पंथाच्या अनुयायांचीही चौकशी करण्यात येऊ लागली. त्यामुळे इकडे भारतात मी मात्र घाबरलो. सुदैवाने चौकशीचे लोण इथपर्यंत आले नाही. त्यानंतर मात्र मी सरकारी केंद्रांवरच भिस्त ठेवण्याचा निर्णय मी घेतला.
आली लहर केला लहर
रेडियोच्या लहरींनी हा नाद लावला आणि त्याची परिणती अर्थातच अभ्यासावरही झाली. पण त्यामुळे डगमगून जाण्याचं ते वय नव्हतं. इंटरनेट अद्याप आलं नव्हतं आणि दूरचित्रवाणीच्या वाहिन्यांचा सुळसुळाट होण्याला नुकतीच सुरवात होऊ लागली होती. त्यामुळे माझ्या वेडाला स्पर्धा किंवा आव्हान असे नव्हतेच. रात्री जागण्याची सवय तेव्हाही होतीच. त्यातून रात्री बेरात्री रेडियोवर कळणारे, न कळणारे असे कोणतेही कार्यक्रम किंवा गाणे ऐकण्यास काही प्रतिबंध नव्हताच. एकदा रात्री दोन वाजता मी रेडियोवर अरबी गाणे ऐकत होतो. (गाण्यांचा अर्थ काय, शब्द काय असे क्षुद्र प्रश्‍न मी कधी पडू दिले नाहीत.) शेजारच्या इमारतीतील काही लोक त्यावेळी कुठल्याशा गावाहून आले होते. घरापुढे आल्यानंतर माझ्या खोलीतून आलेल्या गाण्यांचे स्वर ऐकून त्यांचे घामाघूम झालेले चेहरे हा माझ्या चिरंतन आठवणींचा ठेवा आहे. (ज्यांनी कधी अरबी गाणे ऐकले नाहीत, त्यांना त्यातील चित्तथरारक लज्जत कळणार नाही.) रेडियोने मला खूप दिले. सुमारे नऊपैकी किमान चार भाषा तरी मी रेडियोमुळेच शिकलो. केवळ फ्रेंच वगळता. ती भाषा शिकण्याचे श्रेय इंटरनेट या नव्या मित्राला. रेडियोने मला जसे दिले, तसे मीही रेडियोला बरेच काही दिले. (घरात पडलेले किमान पाच निष्प्राण संच याची साक्ष देतील.) परदेशी रेडियोच्या सोबतीमुळे सामान्य ज्ञान जसे वाढले, तसेच संवादाचा आत्मविश्‍वासही वाढला. पुढे इंटरनेट आले आणि माझ्या या परदेशाच्या कौतुकाचा सोहळा संपुष्टात आला. आता इंटरनेटवर ऑडियो ऑन डिमांडचीही सोय आहे. मात्र त्यात अनिश्‍चिततेतून उद्‌भवणारा आनंद नाही. त्यामुळे “शॉर्ट वेव्ह’च्या माझ्या आठवणी नेहमीच “लॉंग लॉंग’ राहतील.

वाह ताज!

ताज महल हे जगाचे अद्‌भूत आश्‍चर्य असल्याचे आज आम्हाला समजले. ही बातमी अशा धक्कादायक रितीने आमच्यासमोर आली, की ताज महल भारताचे एक मोठे आकर्षण आहे, हे इतके दिवस माहित असल्याबद्दल आमची आम्हालाच लाज वाटायला लागली. त्यात वोटिंगचा मामला असल्याने तर आमची फारच गोची झाली. काय आहे माहितंय का, आम्हाला स्वतःला कधीही मत नसतं. मनुने जे स्त्रियांच्या बाबतीत सांगितलंय, त्यात आम्ही किंचित फेरफार करून तेच सूत्र घेऊन जगतोय.

काय सांगितलं मनुनं?
स्त्रीने लहानपणी वडिलांची, तरुणपणी पतीची आणि मोठेपणी मुलाच्या आज्ञेत रहावे.

आम्ही काय करतो?

लहानपणी कॉप्या पुरविणाऱ्या शिक्षकांचे, मोठेपणी परमदयाळू साहेबांचे आणि म्हातारपणी…अद्याप ती वेळ आलेली नाही, मात्र आम्हाला माहितेय जगाला काहीतरी शिकविणारी कोणाचीतरी भाषणे ऐकण्यातच आमचे जीवन खर्च व्हायचे! तर, अशा या परिस्थितीत ताजला सात आश्‍चर्यांमध्ये समाविष्ट करण्यासाठी वोटिंगची वेळ आली, अन्‌ आमच्यासमोर धर्मसंकटच उभे राहिले. आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी आम्हाला एका ऐतिहासिक वास्तूसाठी साद घालत होते. नाही म्हणायला शाळेत इतिहासाचा वर्ग चालू असताना बाहेरच्या मित्रांनी घातलेली साद ऐकून अनेकदा शिक्षकांनी आमचे कान पिरगाळले. (बळी तो कान पिळी! ही म्हण आम्ही तेव्हाच शिकलो.) ताज जहांगीरने बांधला, की शहाजहांने हेही, देवाशप्पथ सांगतो, आम्हाला माहित नव्हते. घरातली मोरी तुटली ती बांधण्यासाठी सहा महिने झाले बायको शिव्या घालते, आम्ही मरायला कशाला शाहजहांच्या इमारतीची चांभार चौकशी करायला जातो.
मात्र गेल्या आठवड्यात आक्रितच घडले आणि ताजची सगळी जातकुळी आम्हाला टीव्हीवाल्यांनी कळविली. इतके दिवस आम्हाला आपलं माहित होतं, की पिक्‍चरमध्ये गाण्यांमध्ये हिरो-हिरोईनला नाचण्यासाठी ही जागा चांगली असते. तेव्हा आम्हाला ताजची एव्हढी “हिस्टरी’ कळाल्यानंतर वोटिंगचा प्रश्‍न आला. आम्हीही बेलाशक वोटिंग केलं. भारताच्या पर्यटनमंत्र्यांचाच आदेश होता. (आम्ही मात्र त्यांच्या नव्हे; तर आमच्या गृहमंत्र्यांच्या आदेशावरून वोटिंग केलं. कायंय, दिवसभर घरात बसून “न्यूज चॅनेल्स’ त्याच पाहत असतात! त्यामुळे त्यांचं जनरल नॉलेज आमच्यापेक्षा चांगलं आहे, असं आमच्या आळीतील प्रतिष्ठित नागरिकांपासून पेठांमधील दुकानदारांपर्यंत सर्वांचे एकमत आहे.) तर, मोबाईल आणि इंटरनेट मार्फत वोटिंग केल्यानंतर ताज हाच जगातील एकमेव आश्‍चर्य असल्याचं आमचं ठाम मत बनलं. त्यामागची कारणं शोधू जाता आमच्या मेंदूला आलेल्या झिणझिण्यांमधून काढलेले काही निष्कर्ष असेः

n शाहजहांच्या काळात सहा सहा हजारांच्या साड्या घातलेल्या बायांचे “सांगोपांग’ दर्शन घडविणारे टीव्ही, वेशीवर चाललेल्या गंमती सोडून वॉशिंग्टनमध्ये चाललेल्या भानगडी छापणारी वर्तमानपत्रे अशी प्रबोधनात्मक माध्यमे, हवा तो “कॉल’ येण्याऐवजी “अमिताभ के छिंकने का डायलर टोन बिठाना है?’ असे नम्रपणे विचारणाऱ्या मोबाईल कंपन्या असं काहीही नव्हतं. थोडक्‍यात सांगायचं तर शाहजहां हा “पगारी बेरोजगार’ होता. त्यामुळे वेळ घालविण्यासाठी त्याने हे एवढे मोठे बांधकाम केले असण्याची शक्‍यता जास्त आहे.

n बायको मेली म्हणून तिच्या स्मृत्यर्थ शाहजहांने ही इमारत बांधली, हे अर्धसत्य आहे. अहो, मला सांगा, तरुण वयात..अन्‌ तेही एखाद्या राजाच्या…बायकोची कटकट त्याच्यामागून जाते ही त्या राजाला केवढी आनंदाची गोष्ट. या आनंदामुळेच त्याने हर्षवायू होऊन इमारत बांधायला घेतली असेल. तेव्हाच्या इंजिनियर, कंत्राटदार आणि मजुरांनीही “बरीय आपली रोजगार हमी योजना,’ म्हणून त्यात आनंदाने भाग घेतला असावा.

n उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गेल्या जन्मी शाहजहांला मोठे कर्ज दिले असावे. त्याची परतफेड करण्यासाठी व या जन्मी अधिकाऱ्यांचे दुकान चालविण्यासाठी शाहजहांला “कबर’ कसावी लागली असेल.

n बांधकाम व्यावसायिकांचे यमुनेवर अतिक्रमण होऊ नये, म्हणूनही त्याने ही अफलातून इमारत बांधली असण्याची शक्‍यता आहे. प्लॅन मंजूर करून घेणे, मोजमाप करणे, वीट-सिमेंटच्या खर्चाची फिकीर न करता बांधकाम करायचेच असेल, तर आतापर्यंतही आम्हीही दोन घरे बांधली असती.

n ऍक्‍चुअली शाहजहांला साखर कारखाना काढायचा होता. त्यासाठी मुमताज महलच्या नावावर एक सहकारी संस्थाही त्याने स्थापन केली होती. मात्र अवधच्या नबाबाचाही एक साखर कारखाना असल्यामुळे आणि त्याच्याच साखरेला उठाव नसल्यामुळे (याबाबतच्या हकीगती त्याने महाराष्ट्रातील आपल्या वकिलांमार्फत इकडच्या स्वारींकडे पाठविल्या होत्या. त्यातील कागदं अजूनही भारत इतिहास संशोधन मंडळाच्या शेजारच्या मिसळीच्या दुकानात क्वचित मिळतात. ज्यादिवशी मिसळ कमी तिखट लागेल, त्यादिवशी नेमकं समजावं, की हा कागद “त्या’ साखरेच्या बखरीतला आहे. असो.) शाहजहांला कारखाना काही थाटता आला नाही. मात्र त्यादरम्यान मुमताजचेच निधन झाले. त्यामुळे नबाबाला आणखी अपशकून करण्यासाठी त्याने तिथे मुमताजची कबरच स्थापन केली.ताजची खरी स्टोरी काही आम्हाला माहित नाही. ती माहित करून घेण्याची इच्छाही नाही. काही लोक तर म्हणतात, की ताजच्या नावावर धंदा करण्यासाठीच ही मोहीम काही जणांनी काढली आहे. पहा रेमो काय म्हणतो.
आम्ही वर सांगितल्याप्रमाणे आम्हाला स्वतःला काही मतच नाही. त्यामुळे खरं काय ते आपण कसं सांगणार? मात्र अंतराळातील सगळ्या ग्रह-गोल आणि आकाशगंगांपेक्षाही दाटीवाटीने वसलेल्या आमच्या देशात, घरातून बाहेर पडून दुकानापर्यंत पोचेपर्यंत वस्तुंच्या किमती वाढणाऱ्या आमच्या देशात, दरसाल दरशेकडाच्या हिशोबाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या या देशात, काहींना उंची पगार आणि सोयी; तर काहींना न मागता सगळं मिळतानाही “संयम पाळा’ म्हणून तरुणांना शिकविणाऱ्यांच्या या देशात, क्षणाक्षणाला माती, पाणी आणि वायुचे प्रदूषण करून येणाऱ्या पिढीला जगणे अशक्‍य करणाऱ्यांच्या या देशात…अजूनही जीवनावर प्रेम करत जगणाऱ्या सामान्य माणसांचा समावेश जगाच्या आश्‍चर्यामध्ये कधी होणार?
———-

ताज महल

ताज तेरे लिये इक मज़हर-ए-उल्फ़त ही सही तुम को इस वादी-ए-रंगीं से अक़ीदत ही सही
मेरे महबूब कहीं और मिला कर मुझ से!

बज़्म-ए-शाही में ग़रीबों का गुज़र क्या मानी सब्त जिस राह पे हों सतवत-ए-शाही के निशाँ उस पे उल्फ़त भरी रूहों का सफ़र क्या मानी

मेरी महबूब पस-ए-पर्दा-ए-तशीर-ए-वफ़ा तू ने सतवत के निशानों को तो देखा होता मुर्दा शाहों के मक़ाबिर से बहलेवाली अपने तारीक मकानों को तो देखा होता

अनगिनत लोगों ने दुनिया में मुहब्बत की है कौन कहता है कि सादिक़ न थे जज़्बे उन के लेकिन उन के लिये तषीर का सामान नहीं क्यूँ के वो लोग भी अपनी ही तरह मुफ़लिस थे v
ये इमारात-ओ-मक़ाबिर ये फ़सीलें, ये हिसार मुतल-क़ुल्हुक्म शहनशाहों की अज़मत के सुतूँ दामन-ए-दहर पे उस रंग की गुलकारी है जिस में शामिल है तेरे और मेरे अजदाद का ख़ूँ

मेरी महबूब! उन्हें भी तो मुहब्बत होगी जिनकी सन्नाई ने बख़्शी है इसे शक्ल-ए-जमील उन के प्यारों के मक़ाबिर रहे बेनाम-ओ-नमूद आज तक उन पे जलाई न किसी ने क़ंदील

ये चमनज़ार ये जमुना का किनारा ये महल ये मुनक़्क़श दर-ओ-दीवार, ये महराब ये ताक़ इक शहनशाह ने दौलत का सहारा ले कर हम ग़रीबों की मुहब्बत का उड़ाया है मज़ाक
मेरे महबूब कहीं और मिला कर मुझसे!

मरहूम शायर साहिर लुधियानवी यांची ही नज़्म. उम्मीद है सबको समझ आयेगी!

मराठी पुस्तकांच्या विश्वातील एक नवे पान

आमचे ‘लेटेस्ट’ संशोधन

साहित्याच्या प्रांतात सध्या भरभराटीचे दिवस असल्याने दररोज कुठे ना कुठे एखाद्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. पुस्तकांना प्रचंड मागणी असल्याने सर्व पुस्तकांच्या प्रची हातोहात खपत आहेत. गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या काही पुस्तकांची तर आवृत्ती प्रकाशनापूर्वीच संपल्याचीही चर्चा आहे. (आतल्या गोटातील) आनंदाची गोष्ट अशी, की मराठी प्रांतात वाङ्‌मयाबद्दलची ही आस्था केवळ आताच नसून, नेहमीप्रमाणे त्याचे मूळ प्राचीन काळात आहे. आम्ही हे विधान करत आहोत, त्याला आधार काय असा सवाल काही जण करतीलही. (प्रत्येक बाबीवर शंका घेणे हीही मऱ्हाटी जनांची प्रागैतिहासिक काळापासूनची परंपरा!) तर त्यांच्या या शंकेला खोडून काढण्यासाठी एक सज्जड असा पुरावा नुकचाच आमच्या हाती लागला. त्यावरून आम्ही असे छातीठोक विुधान करून शकतो, की मराठीतील पुस्तक प्रकाशन समारंभ अगदी पहिल्या पुस्तकापासूनच सुरू झाले.
काही दिवसांपूर्वी आम्ही बिकानेर चाटवाल्याकडे कचोरी घेण्यासाठी गेलो होतो. त्यावेळी नेहमीप्रमाणे त्याने माल बांधून देण्यासाठी वर्तमानपत्रांची पाने फाडायला सुरवात केली. त्यातील एक पान काहीसे पिवळसर आणि जीर्ण झालेले वाटले. त्यामुळे आमचा संशोधक मेंदू जागा झाला. त्याला तो कागद मागितला, तर त्यात ग्रंथराज ज्ञानेश्‍वरीच्या पुस्तक प्रकाशन समारंभाचा वृत्तांतच छापलेला! आता हा वृत्तांत छापलेला असल्याने साहजिकच वर्तमानपत्रही असणारच. मात्र कागद काहीसा फाटलेला असल्याने आणि त्याचा तुकडा केलेला असल्याने आम्हाला वर्तमानपत्राचे नाव कळू शकले नाही. बिकानेर’च्या मालकालाही ते सांगता आले नाही, की कागद कुठून मिळाला तेही सांगता आले नाही.
आम्ही त्याला रागावलो, “”अरे, अमृताशी स्पर्धा करणारा हा ग्रंथ! तो तू कचोरीच्या पुड्या बांधायला वापर करतोस?”
“आमाला काय साब. कोन काय कागदं विकतो, आमि काय वाचून घेतो काय,'” त्याच्या या प्रश्‍नावर आम्ही निरुत्तर झालो. असो.
अशा रितीने हाती आलेल्या या कागदाची हकीगत सांगितल्यानंतर आता आपण मूळ मजकूराकडे वळू. शके 1116 म्हणजे इ. स. 1284 मध्ये कधीतरी छापलेला हा वृत्तांत आहे. मुख्य म्हणजे “ज्ञानेश्‍वरी’च्या पहिल्या नाही, तर दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशनाची त्यात माहिती आहे. आता हा तर्जुमा (मजकूर) आम्ही जसाच्या तसा येथे देत आहोत. काही ठिकाणी फाटलेल्या जागांमध्ये मजकूर कळत नाही, तेथे तसा उल्लेख केला आहे. तो मजकूर येणेप्रमाणेः
वाङ्‌मयाला “ज्ञानेश्‍वरी’मुळे नवी सुरवात

निवृत्ती महाराज यांचे मत
नेवासा ः “”यावनी आक्रमणामुळे पीडलेल्या आणि संस्कृतच्या प्रभावामुळे दबलेल्या मराठी वाङ्‌मयाला “ज्ञानेश्‍वरी’मुळे नवी सुरवात झाली आहे,” असे मत निवृत्तीनाथ महाराज यांनी आज व्यक्त केले.
संत ज्ञानेश्‍वर महाराज यांनी लिहिलेल्या आणि ……..(कागद फाटलेला) यांनी प्रकाशित केलेल्या “ज्ञानेश्‍वरी’ या ओवीमय ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन निवृत्तीनाथ यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. संत ज्ञानेशवर यांचे बंधू सोपान महाराज आणि भगिनी मुक्ताबाई यावेळी प्रमुख पाहुणे होते. यावेळी व्यासपीठावर देहू, आळंदी आणि नेवासे येथील मान्यवर विद्वान उपस्थित होते.
निवृत्तीनाथ म्हणाले, “भगवद्‌गीतेतील ज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोचविणे ही सध्या काळाची गरज आहे. “ज्ञानेश्‍वरी’च्या रूपाने जनेतची ही मोठी गरज भागणार आहे.” संस्कृतचा एकाधिकार मोडण्यासाठी अशा तऱ्हेच्या अनेक ग्रंथांची निर्मिती झाली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, “”यावनी सत्तेमुळे कितीक शब्द इकडे शिरले आहेत. माय मराठी विसरू की काय, असे भय आहे. त्यासाठी जुने वाङ्‌मय पुनरहू वाचण्याचे संस्कार करायला हवे.”
संत ज्ञानेश्‍वर म्हणाले, “”समाजाचे बहू आघात सोसले तरी, समाजाचे कल्याण व्हावे, हीच मनी वांछा. त्यासाठीच ग्रंथाचा अट्टाहास केला.”

जरी संपली आवृत्ती। ग्रंथ येतील आणिक किती।।
तरी त्यासी घेऊनि हाती। पारायणे करावी।।
असा काव्यात्मक संदेशही त्यांनी दिला.
प्रकाशक ……..(कागद फाटलेला) नेवासेकर म्हणाले, “या ग्रंथाची सहा महिन्यांतील ही दुसरी आवृती आहे. येत्या काही महिन्यांत ग्रंथाच्या सचित्र आणि छोट्या आवृत्त्या काढण्याची योजना आहे.”
——-
अशा तऱ्हेने या बातमीवरून मराठीतील पुस्तक प्रकाशनाचा एक जीवंत इतिहासच आमच्या हाती लागला आहे. आता या विषयावर एक प्रबंध लिहिण्याचा आमचा मानस आहे. तूर्तास जगाला माहिती व्हावी, यासाठी हा प्रपंच.

फॉर सिक्रेट आयज ओन्ली…अन आपण

जगात काही कुठं खुट्ट वाजलं, की अमेरिकेच्या नावाने खडे फोडायचा हा आपल्याकडच्या “आंतरराष्ट्रीय तज्ज्ञां’चा आवडता छंद. त्यातही “सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) म्हणजे टीकाकारांचे आवडते लक्ष्य. “सीआयएने’ही विविध निमित्ताने आपल्या टीकाकारांना चांगलाच रोजगार पुरविला आहे. गेल्याच आठवड्यात “सीआयए’ने जाहीर केलेली कागदपत्रे ही यांपैकीच एक. क्‍यूबाचे अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांची 1960 च्या दशकात हत्या करण्यासाठी “सीआयए’ने तीन गुंडांची मदत घेतल्याचे या कागदपत्रांतील माहितीवरून उघडकीस आले. या कागदपत्रांतील काही माहिती या ना त्यानिमित्ताने पूर्वीच उघडकीस आली असली, तरी बरीचशी माहिती नव्यानेच समोर आली आहे. कॅस्ट्रो यांनी 1959 मध्ये क्‍यूबात क्रांतीद्वारे सत्ता हस्तगत केली. त्यांच्या साम्यवादी विचारसरणीमुळे आणि रशियाशी असलेल्या सख्यामुळे कॅस्ट्रो यांच्या हत्येचा कट रचण्यात आला. त्यासाठी “सीआयए’ने प्रथम लास वेगासमधील माफिया जोस रोझेलीशी संपर्क साधला. त्यानंतर मोमो साव्हातोर गियान्काना ऊर्फ सॅम गोल्ड आणि सांतोस ट्राफिकांत यांच्याशी संपर्क साधला गेला. मोमो आणि सांतोस हे तेव्हा अमरिकेला हवे असलेलेच गुन्हेगार होते. कॅस्ट्रो यांच्या हत्येशी अमेरिका किंवा “सीआयए’चा संबंध असणार नाही, असेही त्यांना स्पष्ट करण्यात आले होते.कॅस्ट्रोंना जेवणातून विष देऊन मारण्याची योजना मोमोने आखली होती. नंतर क्‍यूबातील ज्यआन ओर्ता या अधिकाऱ्याच्या मदतीने कॅस्ट्रोंना मारण्याचे प्रयत्न करण्यात आले. त्यात अपयश आल्याने ओर्ताने माघार घेतली, असे हे एकूण प्रकरण आहे.ही माहिती उघड झाली आणि लगेच “सीआयए’ कृष्णकृत्यांत कशी गुंतलेली आहे, हे सांगणारे तज्ज्ञ सरसावले. “अमेरिका जगावर साम्राज्य स्थापू पाहत असून, त्यासाठी मार्गात येणाऱ्यांचा काटा काढण्याची तिची नेहमीच तयारी असते,’ असे ठेवणीतले नेहमीची वाक्‍य फेकणारे अर्थातच त्यात होते. जणू काही ही माहिती यांनीच उघड केली आहे. मुळात चाळीस वर्षांपूर्वीच्या “सीआयए’च्या कारवायांचे हे कागदपत्र उघड झाल्यानंतर “न्यूयॉर्क टाइम्स’ने एक मालिका चालवून ते लोकांसमोर आणले. आताच नव्हे, तर ही कागदपत्रे गोपनीय असतानाच सेमूर हर्ष यांनी “न्यूयॉर्क टाइम्स’मधूनच 1974 मध्ये त्यातील अनेक भाग लोकांसमोर आणले. एवढेच नव्हे, तर त्यानंर “सीआयए’ने त्यांच्यावरच पाळत ठेवण्यास सुरवात केली, हेही त्यांनी जगासमोर आणले. आजही ग्वांटॅनॅमो बे किंवा इराकमधील अमेरिकी सैन्यांच्या अत्याचारी कृत्यांविरूद्ध हर्ष यांनीच सातत्याने लेखन केले आहे. आता उघड झालेल्या माहितीवरून त्यातील काही भाग केवळ अफवा किंवा खोटा असल्याचेही सिद्ध झाले आहे. त्यानंतर “सीआयए’चे प्रमुख इतिहासकार डेव्हिड रोबार्ज यांनी “न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये लिहिलेल्या ब्लॉगमधून याविषयी “सीआयए’ची भूमिका मांडली आहे. ती खालील ठिकाणी उपलब्ध आहेः
ही कागदपत्रे म्हणजे “फॅमिली जेवेल्स’ नावाच्या दस्तऐवजांचा संग्रह आहे. खरं तर, “सीआयए’ते तत्कालीन प्रमुख होवार्ड जे. ओस्बोर्न यांनी अमेरिकेच्या “नॅशनल सिक्‍युरिटी ऍक्‍ट 1947′ अंतर्गत “सीआयए’च्या नीतीनियमांत न बसणाऱ्या कारवायांची माहिती आपल्या संघटनेच्या गुप्तचरांकडून मागितली होती. त्या माहितीचा हा संग्रह आहे. त्यातील अनेक कागदपत्रे पुन्हा-पुन्हा आली आहेत, काही केवळ कोरे कागद आहेत. याच “फॅमिली ज्वेल्स’च्या बरोबरीने प्रकाशित झालेले “सिझर-पोलो-एसाऊ’ कागदपत्रे ही अभ्यासकांच्या दृष्टीने अधिक कुतुहलाची आहेत. “सिझर-पोलो’ कागदपत्रांमध्ये 1953 ते 1973 पर्यंतच्या रशिया आणि चीनमधील राजकीय नेतृत्वाची माहिती आहे; तर “एसाऊ’ कागदपत्रांमध्ये चीन-रशिया संबंधांची माहिती आहे. मात्र त्यात “सीआयए’वर ताशेरे मारण्याजोगे काही नसल्याने त्याकडे कोणी पाहिले नाही. मुख्य मुद्दा हा आहे, की ही सर्व कागदपत्रे काहीही फेरफार न करता अमेरिकेच्या सरकारने जगभरातील लोकांसाठी इंटरनेटवर मोकळा केला आहे. अगदी या कागदपत्रांवरील “फॉर सिक्रेट आयज्‌ ओन्ली’ हा शिक्काही त्यात पाहायला मिळतो. आता प्रश्‍न हा आहे, की आपल्या देशात माहितीची ही मुक्तता कधी येणार? “तुला वाटते म्हणून नव्हे; तर मी सांगतो म्हणून हे कर,’ असं सांगणारी संस्कृती आपली. स्वातंत्र्यानंतरच्या साठ वर्षांमध्ये एवढे गैरव्यवहार झाले, कोणाची टाप आहे एकातरी गैरव्यवहाराच्या चौकशीचे खरे कागदपत्रे पहाण्याची? त्यामुळेच अमेरिकेचे कौतुक हेच, की स्वतःच्या दोषास्पद बाबींकडेही डोळेझाक न करता त्याला अभ्यासकांच्या नजरांसाठी मोकळं ठेवण्याची वृत्ती त्या देशात आहे.

एक डायरी गरजेची

दिवस एक, सकाळी नऊ
सकाळी उठलो. चांगल्या तब्येतीसाठी प्रत्येक माणसाने सकाळी उठणे गरजेचे आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे आंघोळ वगैरै उरकून वर्तमानपत्रे चाळायला सुरवात केली. जगाचे भान यायचे असेल, तर वर्तमानपत्राचे वाचन आवश्‍यक ठरते. वर्तमानपत्रात त्याच त्या बातम्या होत्या. हे लोक काही चांगलं, संदेशात्मक का छापत नाहीत? काय त्या आयटी का फायटीतल्या लोकांना भरपूर पगार मिळतो म्हणतात. काय उपयोग आहे त्याचा…त्या पैशाचा का चांगला उपयोग होतो? उधळपट्टी करतात लेकाचे! कपडे काय घेतात, बूटं काय घेतात! आमच्याकाळी नव्हतं असं!सूनबाईनं चहा दिला. पहिला घोट घेतला न्‌ काहीतरी खटकल्यासारखं झालं…””सूनबाई, चहात केशर नाही का टाकलं परवा ते आणलेलं…,” तिला म्हणालो..””हां, ते प्रतीकनं परवा आणलेलंच नं…हिमाचलला गेला होता तेव्हा…” तिनंही उत्तर देताना प्रश्‍नच टाकला.आता ते केसर कोण आणलं, हा प्रश्‍न निरर्थकच नव्हता का? ते चहात टाकायला हवं होतं. तसं सांगितलं तिला मी, तेव्हा कुठं पुन्हा केसर टाकलेला चहा देते म्हणाली.त्यानंतर दुपारपर्यंत काहीच काम नव्हतं. काही वेळ टीव्ही पाहत बसलो. त्यावरही चांगले कार्यक्रम नेमके आपल्याला वेळ नसतानाच लागतात ना…त्यामुळं आलमारीतून काढून पुस्तकं चाळायला सुरवात केली. कॉलेजमध्ये शिकवत होतो तेव्हा काय लोकांनी एक एक पुस्तकं भेट दिली होती…वा! आता लोकं पुस्तक प्रकाशनाला बोलावतात आणि नवी पुस्तके देतात…ती वाचवत नाहीत. काय करणार? आज रविवार, त्यामुळं संध्याकाळी दोन तीन कार्यक्रम आहेत. तिथे भाषणं होतीलच. त्यामुळं आता झोपतो.
दुपारी चार
दुपारची वामकुक्षी घेतली की कसं ताजतवानं वाटतं. झोपेतून उठलो तेव्हा नात (मुलीची मुलगी) भेटायला आली होती. कुठल्याशा कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. महिन्याला अठरा-एकोणीस (आवंढा) हजार पगार आहे. म्हणजे आमच्या प्रतीकसारखंच. त्याच्यासारखंच हीही खरेदी, वगैरे हूंऽऽ…तिला म्हणालो, “”बाई गं, बचत कर. चांगली पुस्तके वाच…”तर ती म्हणाली, “”आजोबा, दर महिन्याला दोन हजार रुपये म्युच्युअल फंडात टाकते. दोन हजार प्रॉविडंड फंडात जातात. महिन्याला एखादं तरी पुस्तक घेतेच…आता परवाच “जावा अँड एचटीएमएल’ घेतलं. बाकी “गुगल बुक्‍स’वर वाचते…आणखी काय हवं…'”मला काही सांगता आलं नाही…हातात पैसा खळखळू लागल्यानं तरुण पिढी मोठ्यांचा आदर ठेवेनासी झाली आहे. तरुण पिढीत संस्कार रुजविणे ही आता काळाची गरज झाली आहे. त्यानंतर माझ्या कार्यक्रमाला निघण्याची वेळ झाली. नातीकडे कार आहेच. तिला म्हणालो, “”मला सोड कार्यक्रमाला…’तर ती म्हणाली, “”आजोबा, मला जायचंय एका ठिकाणी.”शेवटी सुनेनं आग्रह केला म्हणून मला सोडायला तयार झाली…
रात्री दहा
एक पुस्तक प्रकाशन होतं. कुठल्याशा लेखकानं म्हाताऱ्यांसाठी (हल्ली त्यांना ज्येष्ठ नागरिक म्हणतात) लिहिलं आहे…मी गेलो तेव्हा कार्यक्रमस्थळी मोजकीच मंडळी होती…कार्यक्रमासाठी मला मानधनाचा चेक देणारे श्री. हसरे, मानधन देण्यासाठी माझ्याशी घासाघीस करणारे श्री. रडके…अशी आयोजकांपैकी मंडळी होती. कार्यक्रमाला वेळ होता त्यामुळं त्यांना जाऊन म्हणालो, “”प्रवासखर्चाचं पाकिट?”त्यांनीही दिलं. मात्र त्यातही दहा रुपये कमी असल्याचं घरी किट फोडल्यावर कळालं. हल्ली हे नेहमीचंच झालं आहे…त्यानंतक एक एक पाहुणेमंडळी येऊ लागली. गेल्या महिन्यात कुठल्याशा संस्थेचं पारितोषिक मिळाल्यानं अचानक प्रकाशात आलेला एक जण दीपप्रज्वलनासाठी होता. (सूत्रसंचालन करणाऱ्याचा गॅरेजचा धंदा असल्यानं कार्यक्रमात गंमतच झाली. त्याने ऐनवेळी दीपप्रज्ज्वलनाऐवजी “जीपप्रज्ज्वलन’ असा शब्द वापरला.) मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही.कार्यक्रम यथातथाच झाला. मी भाषण केलं. आपलं भाषण म्हणजे नेहमी रंगणारा वीडाच! मी म्हणालो, “”बदलत्या काळात जागतिकीकरण हे वास्तव असून, त्यानुसार परिस्थिती बदलत आहे. या वस्तुस्थितीचा स्वीकार करून ज्येष्ठ नागरिकांनी कुटुंबीयांशी जोडून घ्यावे. स्वस्थ कुटुंबासाठी परस्परांतील संवाद गरजेचा असून, ज्येष्ठ नागरिकांनी त्यासाठी पुढाकार घेणे आवश्‍यक आहे.” ज्येष्ठ नागरिकांनी तरुणांच्या आशा-आकांक्षा समजून घ्याव्यात, असंही मी म्हणालो. त्याला खूप प्रतिसाद मिळाला, असं टाळ्यांवरून तेव्हा वाटलं. (सभागृहात मुद्दाम “इको इफेक्‍ट’ची यंत्रणा लावण्यात आली होती, असं मला नंतर समजलं!)अशा रितीने दिवस छान गेला…आता झोपावे…सकाळी लवकर उठायचे असेल, तर लवकर झोपणे आवश्‍यक आहे……..

हिंदुस्थानचा बॉस कोण?

एकाच दिवशी दोन पोस्ट लिहिण्याचे खरे तर जीवावर आले होते. मात्र ‘सामना’च्या ‘उत्सव’ पुरवणीत हा लेख वाचला आणि लिहिण्याची उर्मी आवरली नाही. सध्या शिवाजीचे दिवस आहेत. त्यामुळे रजनीकांतवर सर्वच जण लिहित आहेत. संजय राऊत यांनी रजनीकांत बद्दल छान लिहिले आहे. त्यातील काही माहिती तर मलाही नवीन होती. केवळ राजबहादूर यांच्याबरोबरच नव्हे; तर बंगळूरमधील सर्वच जुन्या मित्रांशी रजनीकांत यांनी मैत्री जपली आहे. त्यांच्या या नम्रपणामुळेच लोकांना त्यांच्याबद्दल आदर वाटतो.
एकच गोष्ट! ही चूक लोकसत्तातील एका लेखातही झाली होती आणि श्री. राऊत यांच्या लेखातही झाली आहे. ‘शिवाजी’ चित्रपटात रजनीकांत ‘मी महाराष्ट्राचा हिरो’ आहे, असे कधीही म्हणत नाही. तो म्हणतो, ’नान पराशक्ती हिरो.’ (मी पराशक्तीचा हिरो आहे.) पराशक्ती हा शिवाजी गणेशन यांचा तमिळमधील ‘माईलस्टोन’ चित्रपट आहे. त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही.
दुसरे म्हणजे रजनीकांत यांच्या यशात त्याच्या मराठी असण्याचा काही संबंध नाही. आपण मराठी असल्याचे त्यांनी कधी लपविलेही नाही आणि मराठी असल्याची वृथा फुशारकीही मारलेली नाही, हे त्यांचे मोठेपण! रजनीकांत महाराष्ट्रात राहिले असते, तर त्यांना आजचे वैभव पहायला मिळाले असते का, हा खरा प्रश्न आहे.
बाकी मराठीत रजनीकांत यांच्याबद्दल मी वाचलेल्या सर्वोत्कृष्ट लेखांपैकी एक आहे. तो लेख येथे वाचता येईल.
http://saamana.com/2007/June/24/Link/Utsav_1.htm

शिवाजीचा पोवाडा

एक ऐतिहासिक परीक्षण
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची ग ग ग ग गऽऽऽऽऽऽ
महाराष्ट्र भूमी कलावंतांची, पडेल पिक्‍चर्सची, फालतू बॉलिवूडची, रडक्‍या चित्रपटांची
पिक्‍चर्सचा धंदा कसला हो जी जी धंदा कसला हो जी जीऽऽ
त्यात आला आता ‘बॉस शिवाजी’ हो जी जीऽऽ आला शिवाजी हो जी जीऽऽ
शाहिर ः काळा कभिन्न रजनीकांत, त्याला मानी कोणी ना कलावंत
तो गेला तमिळनाडूत, अन्‌ सुपरस्टार झाला हो जी जी झाला हो जी जीऽऽ
त्याने घेतले सोळा कोटी, त्याची चर्चा किती पराकोटी
पिक्‍चर यायची खोटी, बुकिंग फुल्ल झाली हो जी जी फुल्ल झाली हो जी जीऽऽ
त्याला बघायला ही गर्दी, त्यात होते किती दर्दी, त्यात काहींना ऍलर्जी तमिळ चित्रपटांची जी जीऽऽ
तमिळ चित्रपटांची गोष्ट, ग ग ग ग ग गऽऽऽ तमिळ चित्रपटांची गोष्ट भली आगळी, रित सारी वेगळी, तोंडे जरी काळी, कला लई भारी त्याचंच रूप शिवाजी र जी जी शिवाजी र र जी जी
शाहिर ः अरुमुगम शिवाजी एनआरआय, त्याला परदेशी पडेना चैन
द्याया गरिबांना शिक्षण, तो येई मायभूमी परतून जी र जी जी जी र जी जीऽऽ
त्यास करती विरोध कितीक, देई लाच ठायी ठाय
त्यापायी होई कफल्लक, अन्‌ मागे भीक जी र जी जी जी र जी जीऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत ग ग ग ग गंऽऽऽऽऽ
भीक मिळता रुपयाची, त्यातून करे कोटी कोटी, पुन्हा होय श्रीमंत चुटकीसरशी, करे मतलबाची पूर्ती त्याच्या ईस्टाईलने जी जी ईस्टाईलने जी जीऽऽ
शाहिर ः या स्टोरीतच त्याची लवस्टोरी, त्याला मिळे एक गोरी पोरी
तिचे साधेपण लई भारी, शिवाचीचा जीव घेई,
घेऊन सवे नातेवाईक, शिवाजी पोचे तिच्या घरी
नाना करून गंमती जमती, लग्नास करे राजी
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती ग ग ग गऽऽऽऽ
लग्नासाठीच्या ज्या खटपटी, बसे कनपटी, रंगरंगोटी लई गमती त्यात जाई निम्मा वेळ नंतर सारा खेळ जी सारा खेळ जी जी
शाहिर ः म्हाराजा, यानंतर येई कथेला वेग
शिवाजी’ लई जोरदार, दाखवी अंगचा प्रताप
त्याच्या स्टाईलला नाही तोड, जगावेगळी मारधाड
दुश्‍मनांना नाही पारावार, त्यांच्या उरावर शिवाजीचे वार
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप ग ग ग गऽऽऽऽ
रजनीचे नाना रूप, धक्के पण खूप, सज्जनांना हुरूप साडे तीन तासांचा खेळ दाखवी ‘दि एंड’ प्रेक्षक पडती बाहेर वाजवीत शीळ हो जी वाजवीत शीळ हो जी जी हो जी जी
शाहिर ः पिक्‍चरचा डायरेक्‍टर शंकर, त्याच्या यशाची वर कमान
आता मात्र सुटला तोल, सुपरस्टार ठरे वरचढ
त्यातही काही प्रसंग, आणती सिनेमात रंग
गाणी मात्र जोरदार, त्याला रहमानची जोड
देखणा सोहळा हो जी जीऽऽ सोहळा हो जी जीऽऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल ग ग गऽऽऽ ग गऽऽ
शिवाजीत पैसा वसूल, म्हणे रजनी ‘कूल’, मनोरंजन फुल्ल, चाले हाऊसफुल त्यातच त्याचे यश हो जी जीऽऽ त्याचे यश हो जी जीऽऽ

आवस वाडा होऽऽ मायऽ

आवस वाडा होऽऽ मायऽ…पिंकीच्या आय, चिंकीच्या माय…आवस वाडा होऽऽऽआमच्या लहानपणी खेडेगावात वाडा होता गं बाय! शंभरी गाठलेला; पण एखाद्या चिवट म्हाताऱ्यासारखा होता गं आय….डग म्हणत नव्हता गं. वाड्याचा दरवाजा खूप मोठा आणि त्याला एक छोटा दिंडी दरवाजा होता हां! दिंडी दरवाजातून वाड्यात दिवसभरी वर्दळ असे गं बाय… त्यावेळी आया आपल्या पोरींवर अन्‌ बापडे तरण्या पोरांवर नजर ठेवत असत गं बाय! मोठा दरवाजा वाहनांसाठी मात्र उघडला जाई. दरवाजातून आत गेलं, की ते फरशीचे मोठे अंगण दिसं ग माय. याच अंगणात माझ्या आयचं आणि शेजारणीचं कितीदा पाण्यासाठी भांडण झालं. एकदा तर तिथेच त्यांच्या भांडणात मी आयचा हात रोखायला गेले, नि आयनं हिसका दिला नि मी पडले…केवढी खोक आली मला…बाबांनी मला डॉक्‍टरकडे नेऊन मलमपट्टी केली…त्याचा खर्चही भांडण झालेल्या काकूंकडून वसूल केला हां…एवढी भांडणं होऊनही आम्ही 7-8 कुटुंबं मात्र कितीतरी वर्षं गुण्यागोविंदाने राहत होतो. वाडा तसा दोन मजलीच. याच अंगणात आमचीही मुले मनसोक्त खेळली. नंतर थांबवावी लागली त्यांची, ही बात वेगळी! मुलींनी भोंडला केला. खूपदा…त्यावेळी हीऽऽऽ गर्दी जमायची इथे…मुलींचीही अन्‌ मुलांचीही….आता नाही रायलं गं…बायका मंगळागौर-हरितालिकेचे खेळ खेळल्या. त्यांच्यात त्यावेळी किती संवाद होई! त्या संवादामुळे वाड्यातील नवरोबा मंडळीना कितीदा पगार कमी पडला हो, काय सांगायचं? पेठेतले व्यापारी तर कितीदा म्हणत, या बायकांचे सण रोज रोज का नसतात म्हणून.अंगणात आमच्या अंगतीपंगती होत. आता कुठं राहिल्या हो आता तशा पंगती. परवाच तर माझ्या मुलाचे लग्न झाले. त्याची पार्टी थ्री-स्टार हॉटेलमध्ये दिली. त्यावेळी इतकी आठवण झाली त्या पंगतीची. काय सांगू बायांनो…आमच्या पंगतीमध्ये पुरुषमंडळीही सहभागी होत. आमच्या आया मात्र घरातूनच डोकावून पाहत…घरी गेल्यावर आई विचारी हो, कशी होती त्या चिंगीच्या आईने केलेली भाजी? बरी होती ना? आपल्यासारखी नव्हती ना, वाटलंच मला…मेली कूपनचं तेल वापरते पंगतीच्या दिवशी…असं आई बोलायची गं…मी मात्र चिंगीच्याच ताटातली भाजी जास्त खात असे, हीहीहीही!आम्ही उन्हाळ्यात अंगणातच झोपत असू. मात्र बाबा न दादा रात्रभर झोपत नसत. त्यांना थंडी सहन होत नसे. आम्ही सकाळी उठलो ना, की ते खालीच झोपलेले दिसत. गणपतीत घरोघरी आरत्या आणि प्रसादांची अगदी धमाल असे. गणपतीपेक्षा आम्हीच मोदक जास्त खात असू. बघा हो बाय, काय आमच्या वाड्यात जगण्याची गंमत होती?आता कोणतरी या वाड्यात रहायला पायजे गं बाई! आता आम्ही शहरात राहतो. आमचा स्वतःचा फलॅट आहे. मुलगा स्टेटस्‌मध्ये राहतो. इकडे येणं होत नाही गं….वाड्याच्या आठवणी लिहून वेळ काढते गं बाय…त्यामुळे आता वाड्याची देखभाल करायला, लक्ष द्यायला कोणीतरी रहायला पाहिजे गं बाय….कोणीतरी लक्ष द्या गंऽऽऽ

“शिवाजी’ दिसे दिन रजनी

`शिवाजी’ रिलीज झाला आणि सर्वांची ताणलेली उत्सुकता पुन्हा पहिल्या स्थितीत आली. गेली दोन वर्षे चोहोकडे केवळ “शिवाजी’च्याच चर्चेचे साम्राज्य होते. त्यात मुख्य मुद्दा होता तो म्हणजे रजनीकांतला सोळा कोटी रुपये मानधन मिळाल्याचा. ऋतिक रोशनला अलीकडेच पाच चित्रपटांसाठी आठ ते दहा कोटी रुपये मिळाल्याच्या बातमीच्या पार्श्‍वभूमीवर हा आकडा म्हणजे अगदी “छप्परफाड’च होता. त्यामुळे याच अंगाने चित्रपटाची चर्चा झाली. जणू काही रजनीकांतला पहिल्यांदाच एवढी मोठी रक्कम मिळाली होती. सात वर्षांपूर्वी “पडैयप्पा’च्या वेळेस मी वाचले होते, की टेरिटरी हक्क आणि मानधन मिळून रजनीकांतला वीस कोटी रुपये मिळतात. सात वर्षांत त्याची किंमत घटण्याऐवजी वाढलीच आहे. मात्र सोळा कोटींचे तुणतुणे वाजविणाऱ्यांचे खरे दुखणे वेगळेच होते. त्यांच्या दृष्टीने खरे कलावंत ते बॉलिवूडचेच आणि जे काय पैसे, महत्त्व मिळणार ते त्यांनाच! त्यामुळे रजनीकांतला एवढे पैसे मिळतात म्हणून लगेच अनेकांना कंठ फुटला. मराठी प्रेक्षकांच्या दृष्टीने तर ही फारच मोठी गोष्ट होती. मराठी पडद्यावर तीस तीस वर्षे “अभिनय’ करणारे कलावंत पैसा मिळतो म्हणून हिंदी मालिकांमध्ये नोकर-चाकरांची भूमिका करताना पाहणाऱ्यांसाठी तर हा अकल्पनीय फटका होता. रजनीच्या सोळा कोटींची पराकोटीची चर्चा करणाऱ्या कुठे माहित असणार, की तो चित्रपटासाठी मानधन आधी घेत नाही. प्रत्येक चित्रपटासाठी तो फक्त एक हजार रुपये “टोकन अमाऊंट’ घेतो. त्यानंतर चित्रपटाला यश मिळाले, की वितरणाच्या हक्कांतून आपला वाटा मिळवितो. त्याच्या “मुथु’ने (1995) जपानमध्ये 35 ते चाळीस कोटींचा धंदा केला होता. म्हणजे बघा, तमिळनाडू आणि तेलुगुत तो किती कमावत असेल. जितका यशात सहभागी तितकाच अपयशातही, हा नियमही पाळणारा रजनीच! म्हणूनच “बाबा’ (2003) चित्रपटाला अपेक्षित यश मिळाले नाही, तेव्हा त्याने सर्व वितरकांना त्यांचे पैसे परत केले होते. (रजनीचा चित्रपट म्हणजे वितरकांनाही मोठीच रक्कम गुंतवावी लागते. “शिवाजी’च्याच बाबतीत बोलायचे, तर केरळमधील केवळ पलक्काड जिल्ह्यासाठी त्याच्या वितरणाचे हक्क सतरा कोटींना विकले गेले. आंध्रातील एका -एका भागासाठी साठ-साठ कोटींची बोली लागल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वीच वाचनात आल्या होत्या.)
“शिवाजी’ चित्रपटाला आलेला खर्च शंभर कोटी रुपयांच्या घरात आला असल्याचे बोलले जाते. त्यातही दम नाही. “शिवाजी’चा निर्देशक शंकर आहे. शंकर हा खर्चिक, भव्य आणि फॅंटसीमय चित्रीकरणासाठी आणि सामाजिक महत्त्वाच्या मुद्यांवर व्यावसायिक चित्रपट काढणारा प्रतिभावान निर्देशक म्हणून ओळखला जातो. “जंटलमन’ या त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून त्याने स्वतःची आगळी ओळख उभी केलेली आहे. भारतीय चित्रपटांना संगणकीय करामतींची ओळख शंकरच्याच “कादलन’ (1994-हिंदीतील “हमसे है मुकाबला’) या चित्रपटातून झाली. त्यानंतर कमल हासनला वयोवृद्ध स्वातंत्र्यसैनिकाच्या वेशभूषेत त्यानेच सादर केले होते. “इंदियन’ (1996-हिंदीतील “हिंदुस्तानी’) नावाच्या या चित्रपटात कमल हासन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची भेट झाल्याचे एक “स्पेशल इफेक्‍ट’चे दृश्‍य होतेच. त्यानंतर “जीन्स” (1998) या त्याच्या चित्रपटात एका गाण्याचे चित्रीकरण जगाच्या सात आश्‍चर्यांच्या पार्श्‍वभूमीवर करून त्याने खळबळ उडवून दिली. “मुदलवन’ (1999-हिंदीत “नायक’ (2002)) हाही चित्रपट त्यावेळचा “बिग बजेट’ चित्रपटच होता. “शिवाजी’च्या अगोदरचा शंकरचा लेटेस्ट चित्रपट म्हणजे “अन्नियन’ (2005-हिंदीत अपरिचित). हा चित्रपट अठरा कोटींच्या खर्चाने काढला होता. या चित्रपटात तर त्याने संगणकीय करामतींची बरसातच केलेली! “ब्लॉकबस्टर’ म्हणून समाविष्ट झालेला हा चित्रपट फ्रेंच भाषेत डब झालेला एकमेव भारतीय चित्रपट आहे.
“शिवाजी’ची आणखी एक खासियत म्हणजे त्याला संगीत ए. आर. रहमानचे आहे. रजनीच्या चित्रपटाला संगीत देणे म्हणजे एक मोठी सन्मान असल्याचे तमिळ चित्रपटसृष्टीत मानले जाते. रहमानला “95 सालीच “मुथु” आणि त्यानंतर “99 साली “पडैयप्पा’ व नंतर “बाबा’मधून ही संधी मिळाली. मात्र “चंद्रमुखी’ (2050) या रजनीच्या सर्वाधिक यशस्वी चित्रपटाला संगीत विद्यासागरचे होते. त्यामुळे “शिवाजी’साठी त्याला पुन्हा संधी मिळणे, ही त्याचे तमिळ चित्रपटसृष्टीतील पुनरागमन मानले जाते. दक्षिण भारतीय चित्रपटांतील (खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीतीलच) तीन बडी नावे एकत्र आल्याने “शिवाजी’ची बाजी मोठी झाली. मात्र या तिघांच्याही विशिष्ट कर्तृत्वाबाबत माहिती नसणारी माणसंच त्यांच्याबाबत बोलत असल्याने “कोटी’चीच बात मोठी झाली. नही सुवर्णे ध्वनीस्तादृक यादृक कांस्ये प्रजायते…
आता “शिवाजी’च्या कथेबाबत…तमिळ चित्रपटांमध्ये ज्यांनी रजनीकांत पाहिला आहे, त्यांना रजनीच्या चित्रपटात कथा कितपत महत्त्वाची असते, हेही माहित असतं. प्रसिद्ध क्रिकेटपटू डब्लू. जी. ग्रेस यांचा एक किस्सा आहे…ग्रेस हे मैदानावरील त्यांच्या दांडगाईबद्दल प्रसिद्ध होते. एकदा ते फलंदाजीसाठी मैदानावर उतरले असताना लवकरच बाद झाले. पंचांनी ग्रेस यांना बाद दिल्याचा इशारा केला, मात्र ग्रेस जागेवरून हटले नाहीत. त्यावेळी पंच म्हणाले, “”तू बाद आहेस, मी निर्णय दिला आहे.” त्यावर ग्रेस म्हणाले, “”तो निर्णय मागे घे. हे लोकं (प्रेक्षक) माझी फलंदाजी पहायला आहे आहेत, तुझे निर्णय पहायला नाही.” रजनीच्या चित्रपटांची “कथा’ वेगळी नाही…रजनी म्हणजे हवेत सिगारेटी फेकून तोंडात झेलणारा व मरतानाही ती तोंडातून न काढता (गिरफ्तार), बंदुकीच्या गोळीमागे पळणारा (त्यागी) किंवा तत्सम माकडचेष्टा करणारा अभिनेता (?) असे काही चित्रपटरसिक मानतात. “प्रागैतिहासिक’ किंवा “अश्‍मयुगातील’ चित्रपट पाहून त्यावर मते बनविणारी ही मंडळी असतात. रजनी म्हणजे स्टाईल, हे कितीही खरं असलं तरी असं म्हणतात, की “Rajni don’t do thing stylishly, but what he does becomes style.’ रजनीकांत याच्या चित्रपटाबाबत एका शब्दात वर्णन करायचे झाल्यास असं म्हणता येईल, “पूर्ण मनोरंजन.’ साठ-साठ वर्षांच्या म्हाताऱ्या चार चार तास रांगेत उभं राहून चित्रपटाचं तिकिट काढतायत, असं दृश्‍य एरवी दिसत नाही अन्‌ ते रजनीकांतच्या चित्रपटालाच दिसते याचं कारण हे आहे. रजनीकांतच्या प्रत्येक चित्रपटात थोडीसा कौटुंबिक, थोडासा हास्याचा, थोडासा मारामारी आणि त्याची नेहमीची “स्टाईल’, हा सर्वच मसाला भरलेला असतो. त्यामुळेच त्याच्या चित्रपटात पूरेपूर मनोरंजन मिळणार, याची खूणगाठ मनाशी बांधूनच, तसा विश्‍वास मनी बाळगूनच प्रत्येक प्रेक्षक त्याच्या चित्रपटाला जातात, हे त्याच्या प्रदीर्घ यशाचं कारण आहे. अन्‌ त्याहूनही महत्त्वाचं, मोठं कारण म्हणजे….
त्या विश्‍वासाला क्‍वचितच तडा जातो…!

शोधू कुठे मी “शिवाजी

आता काय करावे, कुठे जावे…काय वाचावे…काही सुचत नाहीये! सकाळपासून तीन पेप्रं वाचून झाली…आठ चॅनेल रिमोटवर फिरवून झाले. त्यातील सर्व जाहिराती आणि अधून-मधून बातम्याही पाहिल्या…अनेकांना विचारले, “”तुम्ही पाहिले का?” सर्वांनी नकारार्थी माना वेळावल्या. असं घडलंच कसं?
मुंगीने मेरुपर्वत तर गिळला नाही ना…
एक्‍सप्रेस रेल्वे वेळेवर तर धावली नाही ना…
“पीएमटी’ रिकामी येऊन स्टॉपवर योग्य जागी तर थांबली नाही ना…
नाही ना?? मग हे सर्व सुरळीत होत असताना असं का व्हावं…?
माझी प्राणप्रिय बातमी आज का छापून आली नाही…गेल्या वर्षीपासून पेप्रांमध्ये वाचतोय…त्यातही रजनीकांतचे जुने फोटोच पाहतोय…”शिवाजी’ येतोय…”शिवाजी’ येतोय…कालपर्यंत तर येत होत्या बातम्या…आता का नाही आल्या…पहिल्यांदा वाचलं होतं…रजनीकांतला सोळा कोटींची बिदागी मिळालीय…मला किती पराकोटीचा आनंद झाला…त्यानंतर कितीदा तरी कोटी म्हणजे किती शून्ये, याचा अंदाज घेत होतो…त्यानंतर काही दिवस तर काहीच छापून आलं नाही…
मात्र तेव्हा “शिवाजी’च्या बातम्यांची सवय नव्हती, त्यामुळे फारसे चुकल्यासारखे वाटत नव्हते. त्यानंतर वाहिन्यांवर रजनीच्या चाहत्यांची हलती चित्रे दिसू लागली. तेव्हा मला त्याचा लळाच लागला ना! नंतर मीही “शिवाजी शिवाजी’ करायला लागलो. मला आपलं वाटलं रजनीकांतनं शिवाजी महाराजांचं कामच केलंय.. महाराजांवर महाराष्ट्राचा कॉपीराईटच ना! त्यामुळे दुसरं कोणी त्यांचं नाव वापरू शकतं, ही कल्पनाच नाही! हवेत तलवार फेकून महाराज गनीमांना “हातोहात’ लोळवतायेत, अशी दृश्‍येही मला दिसू लागली. गेल्या महिन्यांपासून मात्र चोहीकडे “शिवाजी’ न्‌ “शिवाजी’च दिसू लागले. मला तर काय करावे न्‌ काय करू नये, असं झालं.
तेव्हाच कळालं रजनीकांत “शिवाजी’ आहे मात्र “शिवाजी’ नाही…. म्हणजे झालं काय, का मित्रांसोबत बोलताना आपण सोळा कोटींचीच बात काढली ना (एक मराठी माणूस दुसऱ्या मराठी माणसाच्या फक्त पैशाबद्दलच दिलखुलास बोलतो), तर कोणीतरी म्हणालं, की तो मराठी आहे…हे आणखी काही विपरीतच. तमिळ, म्हणजे एकूणच मराठी आणि हिंदी सोडले तर आपल्याला सगळे हिरो “कोंगाडी’च…नाही म्हणायला तो आपल्या अमिताभच्या काही पिच्चरमध्ये दिसला होता, पण “अमिताभ के सामने रजनीकांत की क्‍या औकात…’ इंटरनेटवर त्याच्या स्टाईलबद्दलचे जोक फॉरवर्ड करण्यापुरते त्याचा फार फार तर संबंध! सांगायचं म्हणजे काळ्या काळ्या ढूऽऽसमधला एक, आपण नेहमी टिंगल करतो तो कोंगाडी हिरो मराठी आहे, तो तिकडे एवढा पैसा कमावतो म्हटल्यावर माझ्या तर पोटातच ढवळायला लागलं. अन्‌ त्याचं नाव शिवाजी गायकवाड आहे म्हटल्यावर तर एवढा हेवा वाटला…आयला, आपण एवढे गोरे, अर्धवट हिंदी बोलणारे अन्‌ इथं खितपत पडलोय. तो तिकडे खऱ्याने पैसा ओढतोय.
गेल्या महिन्यापासून तर बाबा “शिवाजी’बाबत खूपच ऐकायला आलं…त्यात पुन्हा सोळा कोटींचीच बात होती. आणखीही काही बाता होत्या. आमच्या दोस्त तर ते तमिळनाडूतील रसिक पाहून “खी खी’ हसायलाच लागले. त्यांना कळेचना हे खूळ म्हणायचं का वेड? इकडं मी टीव्ही आणि पेपरमध्ये रोज “शिवाजी’च्या बातम्या वाचत होतो. औरंगजेबाने “शिवाजी’वर ठेवली नसती अशी पाळत मी “शिवाजी’च्या बातम्यांवर ठेवली होती. चॅनेल आणि टीव्हीच्या सौजन्याने मलाही रोज काहीतरी खुराक मिळत होता. पण मला एक कळत नव्हतं, रजनीसाठी एवढी किंमत मोजायला त्याच्या मागच्या पिच्चरमध्ये असं काय होतं? त्याबाबत मात्र कोणीही बोलत नव्हतं. मी मात्र रोज बातम्या वाचायचो. मजा यायची. इतकं की, “इट शिवाजी, स्लीप शिवाजी’ अशी माझी अवस्था झाली. रोज बातम्या, रोज आलटून पालटून फोटो…
माझा एक मित्र होता. तो रजनीकांतला रजनी म्हणायचा…त्याच्या पिच्चरच्या गमती सांगायचा…आम्ही त्याला हसायचो. त्यातच काल ती बातमी आली…”शिवाजी’ची दोन आठवड्यांची तिकिटे विकली गेली आहेत. इतकं बरं वाटलं. आता तर चॅनेल आणि बातम्यांचा पाऊस सुरू झाला म्हणा ना…रजनीकांत असा आणि रजनीकांत तसा…रजनीकांत आणि अमिताभ…रजनीकांत आणि त्याचे मानधन…रजनीकांत आणि त्याची स्टाईल…अशा कितीतरी बातम्या, रिपोर्ट…एका चॅनेलवर तर “आय ऍम रजनीकांत’ नावाची स्पर्धाच सुरू केली होती…मलाही त्यात भाग घ्यावासा वाटला…असं सगळं छान छान “शिवाजी’चे “रजनी साम्राज्य’ स्थापित झाले होते. काल तो पिच्चरही रिलीज झाला….अन्‌ आज? आज मात्र कोणीही बातमी देत नाहीये…
अरे झालं काय…दोन वर्षांपूर्वीसारखं पुन्हा रजनीकांत गायब? मग आम्ही काय करायचं? आता कुठं माहिती घ्यायची? कुठं जाऊ? कुठं माझी तल्लफ भागवू? आता टक्कल पडलेल्या रजनीकांतचे फोटो कुठं पहायचे? त्याच्या पिच्चरसाठी आलेल्या खर्चाची चर्चा कुठं करायची? हा अन्याय आहे. दररोज “शिवाजी’ची एकतरी बातमी वाचली किंवा ऐकली पाहिजे.
मग एकच बातमी रोज छापली तरी चालेल!!!